महत्त्वाचा कालावधी सुरू; लॉकडाऊन यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:22+5:30
नागरिकांनी जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची माहिती द्यावी, जेनेकरून त्यांना विलगीकरणात ठेवता येईल. सद्या वेगवेगळया ठिकाणाहून प्रवास करून आलेल्या लोकांची प्रशासनाकडून माहिती घेवून लक्षणे असल्यास तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हयात ३४ नमुने तपासणी केले. त्यातील २६ निगेटीव्ह आले आहेत. तर ८ अहवाल अजून येणे बाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सध्या एकही कोरोना रूग्ण नसला तरी राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. लॉकडाऊन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
नागरिकांनी जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची माहिती द्यावी, जेनेकरून त्यांना विलगीकरणात ठेवता येईल. सद्या वेगवेगळया ठिकाणाहून प्रवास करून आलेल्या लोकांची प्रशासनाकडून माहिती घेवून लक्षणे असल्यास तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत जिल्हयात ३४ नमुने तपासणी केले. त्यातील २६ निगेटीव्ह आले आहेत. तर ८ अहवाल अजून येणे बाकी आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनूसार प्रशासन नमुने तपासणीसाठी पाठवित असते. या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध लक्षणे असलेल्या ३४ लोकांचे आत्तापर्यंत नमुने घेणेत आले.
राज्यभरात आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले गेले. यातील बाधित रूग्ण समोर आले. आता त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना व प्रवासात त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. यातून प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात नमुने पॉझीटीव्ह येत आहेत. अशा प्रकारे पॉझीटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक जर बाहेर पडले तर संसर्ग होण्याची शक्यता नाकरता येत नाही. जिल्हयात अजून पॉझीटीव्ह रूग्ण नसला तरी बाधित व्यक्तीच्या प्रवासातील संपर्कात आलेली व्यक्ती क्वारंटाईनमध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जिल्हयात संचारबंदी परिणामकारक राबविण्यात येत आहे. जिल्हयातील जनतेनेही यासाठी सहकार्य करून अकारण गर्दी टाळावी. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभागाबरोबर लोकांचीही नजर असणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
गरज असेल तरच बाहेर पडा
किराणा दुकाने, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून वेळेची मर्यादा सकाळी ७ ते दुपारी १ अशी करण्यात आली आहे. याचे कारण जिल्हयात संचारबंदी लागू करूनही अकारण फिरणा-यांची संख्या मोठया प्रमाणात होती. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या जात आहेत. याबाबत कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. तसेच संचारबंदी यशस्वी करून सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जर आपण लॉकडाऊन यशस्वी केले तर निश्चितच संसर्गावर विजय मिळवू. प्रशासन संचारबंदी यशस्वी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत आहे. कोणतेही कारणे सांगून अकारण बाहेर फिरणे टाळावे अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती द्या
विविध कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन परत आलेले व लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातच अडकलेल्या १६ हजार ५४४ लोकांची नोंदणी झालेली आहे. यातील सर्वच लोकांना होम तसेच संसथात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील ५३० लोकांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्णही झाला आहे. मात्र उर्वरीत सर्व लोकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये. आरोग्य विषयक गरज असल्यास प्रशासनाला कळवा असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद प्रशासनाला देणे गरजेचे आहे. यासाठी जनतेने आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तातडीने कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.