आरमाेरी तालुक्यातील शेकडाे वयाेवृद्धांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:33+5:30
विलास चिलबुले लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ कोरोनाग्रस्तांनी ...
विलास चिलबुले
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. सकारात्मक विचार व हिंमत ठेवून उपचार घेतल्यास कोरोनामधून बरे होता येते, अशी प्रतिक्रिया बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे.
आरमोरी येथील रहिवासी असलेले माजी आमदार हरिराम वरखडे (वय ७७ वर्षे) हे गृहविलगीकरणात राहून तर ताराबाई जगन्नाथ बेहरे (वय ७४ वर्षे) या कोविड केअर सेंटरमधून उपचार घेऊन कोरोनावर मात करून घरी परतलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरण्याची गरज नसल्याचे मत डाॅक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. थोडीफार लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना तपासणी करून योग्य ते उपचार करून घ्यावे, जेणेकरून घरच्यांना कोरोना होण्यापासून थांबविता येईल, असे आवाहन डाॅक्टरांनी व्यक्त केले आहे.
ऑक्टोबर २०२० पासून आरमोरी कोविड केअर सेंटरमधून ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ नागरिकांनी काेराेनावर मात केली आहे. यामध्ये १६८ महिला तर २२७ पुरुष आहेत. ८० च्या वर वय असलेले ५ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. १८ ते ५० वय असलेले ६७० कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
काेराेना झाल्यानंतर अनेक नागरिक धास्तावून जातात. त्यामुळे राेगप्रतिकारक क्षमता कमी हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मक विचार करून हिमतीने काेराेनाविराेधात लढा देण्याचा निर्धार केल्यास शरीरात ॲटीबाॅडी तयार हाेतात. या ॲटीबाॅडी व्यक्तीला काेराेनावर विजय मिळविण्यास मदत करतात. एखाद्या व्यक्तीला काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतर कुटुंबिय, नातेवाईक व मित्रांनी धीर व हिंमत देण्याची गरज आहे.
लसीकरणाचे प्रमाण वाढण्याची गरज
कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. लसबाबत अनेक ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे. गैरसमज काढण्याकरिता शहरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, गावातील सरपंच, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे.
आतापर्यंत फक्त ६ हजार ४६ नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे. यामध्ये ४ हजार ५१७ नागरिकांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. १ हजार ५२९ नागरिकांनी दुसरा लसीकरण डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयाेगटातील ९१८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
- डॉ. आनंद ठिकरे, तालुका आराेग्य अधिकारी, गडचिराेली
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता तपासणी करणे आवश्यक आहे. काेराेना झाल्यानंतर घाबरण्याचे कारण नाही. मला खोकला व ताप आल्याने मी तत्काळ तपासणी केली. त्यात मी पाॅझिटिव्ह आल्याने मी सकारात्मक विचाराने उपचार प्रक्रिया केली व आज मी बरा झालो. सकारात्मक विचाराने काेणीही बरा हाेईल.
- हरीराम वरखडे, माजी आमदार
माझे वय ७४ वर्षे आहे. माझी तब्येत बिघडत गेली होती. ताप, खोकला येत होता, श्वास घेताना त्रास होऊ लागला. लगेच मुलाने कोरोना तपासणी करून मला काेविड केअर सेंटरमध्ये ठेवले. तेथे योग्य प्रकारे उपचार झाल्याने आज माझी प्रकृती ठणठणीत आहे.
- ताराबाई जगन्नाथ बेहरे