वाळवंटी टोळीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:53+5:30
वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात थैमान घातलेली वाळवंटी टोळ (नाकतोडे) महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहून या किडीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सोनापूर तसेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.बी.उंदीरवाडे यांनी केले आहे.
वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद्धा या किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
यावर्षी या किडीने मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच १५ दिवसानंतर खरिपाच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. या कालावधीत सदर वाळवंटी टोळ जिल्ह्यात आल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांतच खरीप हंगामातील धान पऱ्हे टाकण्याच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाळवंटी टोळचा जीवनक्रम
अंडी अवस्था :-
वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये १० ते १५ सेमी खोलात टाकते. एक मादी जवळपास १५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी हा तापमान व आद्रतेवर अवलंबून राहते. साधारणपणे १० ते १२ दिवसांत अंडी उबवतात.
पिल्ले :-
अंडी उबवल्यानंतर यातून पिल्ले बाहेर पडतात. सुरूवातीच्या अवस्थेत पिल्ल्यांना पंख नसतात. या पिल्ल्यांच्या पाच अवस्था आढळतात. तापमान जर ३७ अंश सेल्सिअसच्या जवळपास असले तर २२ दिवसांत पिल्लांची अवस्था पूर्ण होते. तापमान कमी असेल तर ७० दिवस लागतात.
प्रौढ :-
पाचव्या अवस्थेतील पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. हीच अवस्था सर्वाधिक नुकसानकारक ठरते. थंड वातावरणात ही कीड जवळपास आठ महिन्यांपर्यंत जिवंत राहते. अन्नाच्या शोधात प्रौढ टोळ हवेच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत जातात. त्यामुळे अधिकाधिक शेतातील पिकांपर्यंत पोहोचून ते पीक फस्त करतात. प्रौढ टोळ मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असते.
टोळ किडीचे व्यवस्थापन
शेतात टोळ आल्यास शेतकऱ्यांनी वाद्य वाजवावे. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुपूपांवर टोेळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवाव्या. टायर जाळून धूर करावा. पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भातामध्ये फिप्रोनील ५ एससी, ३ मिली मिसळावे. त्याचे ढीग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. सदर अन्न खाल्ल्यानंतर कीड मरण पावते. टोळांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी टोळ विश्रांतीसाठी झाडाझुडूूपांवर बसून राहते. या कालावधीत फवारणी केल्यास टोळीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांनी फवारणी करू नये.