रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:00 AM2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:50+5:30

सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Eliminate all barriers to job creation | रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार

रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार

googlenewsNext
ठळक मुद्देगृहमंत्र्यांची ग्वाही : प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य असल्याची पावती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीतून उद्योगाला चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून या कामातील सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ना.शिंदे रविवारी (दि.२२) पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पो.अधीक्षक मोहीत गर्ग, अजय बंसल, सुदर्शन या अधिकाऱ्यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.
सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गृहमंत्री शिंदे म्हणाले, नक्षल चळवळीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा प्रशासन सर्वंकष योजनांची अंमलबजावणी करुन विकास कामे गतीने करीत आहे. नक्षल चळवळीत येथील स्थानिक युवकांचा समावेश आहे. अशा भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी रोजगाराची निर्मिती करणे काळाची गरज असून याशिवाय युवक मुख्य प्रवाहात येणार नाही. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विद्युत, कृषीवर आधारित उद्योग यावर भर देण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.
जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देताना मोठ्या प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करण्याचा शासन विचार करीत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच शेतात उत्पन्न झालेल्या धानाला योग्य भाव मिळेल अशा आधारभूत किमती निश्चित करण्यात येतील, असे गृहमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात रस्त्यांची वाईट अवस्था आहे. कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा चांगला असावा आणि कामाचा वेग वाढावा, यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात बीआरओच्या कामाप्रमाणे प्रलंबित राहीलेल्या रस्त्यांची, पुलांची कामे प्राधान्याने पुर्ण करुन दळणवळण व्यवस्था चांगली करुन देणार असल्याचे ते म्हणाले.
पदभरतीमधील अडचणींसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार
जिल्ह्यात सुधारित बिंदूनामावलीचा आदेश आणि त्याला लगेच दिलेली स्थागिती यामुळे पदभरतीबाबत गोंधळ सुरू आहे. तो दूर करून पोलीस व इतर पदभरतीचा मार्ग दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे आश्वासन ना.शिंदे यांनी दिले. पोलीस विभागाला जे हवं ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

शहीद जवानांना आदरांजली
गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करु न शहीद जवानांना आदरांजली वाहीली. बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने गोडलवाही येथील उपपोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीही आले होते.

Web Title: Eliminate all barriers to job creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.