आणखी चार जवानांना कोरोनाने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:21+5:30
कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरणाबाबतच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज येथील कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १९१ बटालियनच्या चार जवानांचे कोरोना अहवाल सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आले आहेत, तर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षातील तीन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात ५६ सक्रिय रूग्ण शिल्लक आहेत. त्यापैकी ४८ रूग्ण जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १११ वर पोहोचला आहे.
१८ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढतच गेली. मात्र रूग्ण वाढीचा दर अतिशय संथ होता. १८ मे ते ४ जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७३ होती. मात्र ५ जुलै रोजी एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली. त्यातील ८ जणांची नोंद इतर जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३३ असल्याचे प्रशासनाकडून संध्याकाळी सांगण्यात आले. सोमवारी पुन्हा चार सीआरपीएफ जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच कोरोनावर उपचार घेत असलेल्या आरमोरी, चामोर्शी व कुरखेडा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे पुनर्तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ६२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ८ रूग्णांची नोंद दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरणाबाबतच्या सूचना केल्या.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनामार्फत केलेल्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा संबंधिातांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच दुसºया जिल्ह्यातून विनापरवानगीने प्रवेश करणाऱ्यांवरही दंड ठोठावला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
ब्रह्मपुरीतून येणाºयांना ई-पास देऊ नका
देसाईगंज : ब्रह्मपुरी उपविभागात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय, मयत, अतितातडीचा विषय वगळता इतरांना ब्रह्मपुरी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवास करण्यास ई-पास देऊ नये, अशी मागणी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाºयांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
189 जवान आले सुटीवरून परत
देसाईगंज येथे सध्या मुख्यालय असलेल्या सीआरपीएफच्या बटालियन क्रमांक १९१ चे १८९ जवान सुटीवरून परतले आहेत. त्यापैकी ४ जणांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले तर गेल्या दोन दिवसात आलेल्या ६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. उर्वरित सर्व १७९ जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती बटालियन कमांडर प्रभाकर त्रिपाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॉझिटिव्ह आलेले ४ जवानांपैकी २ जण पश्चिम बंगालमधील, तर दोघे झारखंड व दिल्ली येथील आहेत. आलेले सर्वच जवान संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
सहा ठिकाणे
प्रतिबंधित
क्षेत्र घोषित
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी गडचिरोली, देसाईगंज, भामरागड व अहेरी येथील काही भाग तसेच चामोर्शी तालुक्यातील मच्छली हे संपूर्ण गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.