काँग्रेसची स्वबळाची चाचपणी, महाआघाडी की एकला चलो रे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:26+5:30

जिल्ह्यात चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा या ९ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील अनेक नगर पंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी ते पुन्हा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे तर भाजपकडे असलेल्या नगर पंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी इतर विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. एकत्रित लढण्यास त्याचा फायदा या पक्षांना होण्याची शक्यता आहे.

Congress's test of self-reliance, grand alliance or let's go alone? | काँग्रेसची स्वबळाची चाचपणी, महाआघाडी की एकला चलो रे?

काँग्रेसची स्वबळाची चाचपणी, महाआघाडी की एकला चलो रे?

Next

मनाेज ताजने
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगर पंचायतींसाठी नामांकन दाखल करण्याची तारीख आली तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकत्र लढण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. विशेषत: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे स्वबळाची भूमिका घेतली असल्याने जिल्ह्यात काँग्रेस ‘एकला चलो रे’वर कायम राहाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर शक्य तिथे आघाडी कायम ठेवून लढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यात चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा या ९ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील अनेक नगर पंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी ते पुन्हा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे तर भाजपकडे असलेल्या नगर पंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी इतर विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. एकत्रित लढण्यास त्याचा फायदा या पक्षांना होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येण्यास तयार असली तरी काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सात वर्षांपासून काँग्रेसचे आमदार नाही

-    जिल्ह्यात २०१४ च्या निवडणुकीपासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. लोकसभेची जागा गमावल्यानंतर तीनपैकी एकाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसला विजय मिळवता आला नाही.
-    २०१९ च्या निवडणुकीतही लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला फटका बसला. या निवडणुकीत अहेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडून खेचली; पण काँग्रेसला यश मिळाले नाही.

चार पंचायत समित्यांवर सत्ता

-    जिल्ह्यात १२ पंचायत समित्या आहेत. त्यापैकी अवघ्या ४ नगर पंचायतींमध्ये काँग्रेस सत्तेत वाटेकरी आहे. 
-    कुरखेडा, आरमोरी, मुलचेरा, एटापल्ली, धानोरा या भागात काँग्रेसला यश मिळण्याची आशा आहे.

आज महत्त्वपूर्ण बैठक
-   जिल्ह्यातील नगर पंचायतींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्रित लढायचे की वेगवेगळे, किंवा काही ठिकाणी एकत्र आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढायचे अशा मुद्यांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी तीनही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे. त्यात यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो.

काँग्रेसची सर्व जागा लढण्याची तयारी
प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार काँग्रेसने नगर पंचायतींच्या सर्व जागा लढण्याची तयारी दर्शविली आहे. निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यांचा संधी न मिळाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आघाडी करताना सद्य:स्थितीत आमचे जेवढे सदस्य आहेत त्यापेक्षा जास्त जागा आमच्या वाट्याला याव्यात, अशी आमची भूमिका आहे. आघाडी झाली तर ठीकच, नाही झाली तर स्वतंत्रपणे सर्व उमेदवार उभे करण्याचीही तयारी आहे.
- महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

जिल्हा परिषदेत ५१ पैकी काॅंग्रेसचे १५ सदस्य
-    जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १५ सदस्य असून दोन समर्थित सदस्य आहेत. आदिवासी विद्यार्थी संघही काँग्रेससोबत आहे, मात्र त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्वही कायम ठेवले आहे. शिवसेना वगळता महाआघाडीतील दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. ५१ पैकी १५ सदस्य ही स्थिती खूप चांगली अशी नसली तरी काँग्रेस स्वतंत्र लढण्याची हिंमत दाखवत आहे.

-    काॅंग्रेसने काही दिवसांपूर्वीच केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या विविध गटांचे ज्येष्ठ पदाधिकारी एका मंचावर वावरताना दिसत आहेत. हा सकारात्मक बदल मतात परिवर्तीत हाेताे का, हे आता पाहायचे आहे.

 

Web Title: Congress's test of self-reliance, grand alliance or let's go alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.