उकाड्यामुळे क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:43+5:30
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासनामार्फत या नागरिकांना जेवनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. विलगीकरण कक्षात कुलरची सोय नाही. त्यामुळे गर्मीमुळे नागरिक हैराण आहेत. उकाड्यामुळे कोरोनाशिवाय इतर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासनामार्फत या नागरिकांना जेवनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
विलगीकरण कक्षाच्या सर्वच इमारती स्लॅबच्या आहेत. तापमानाचा पारा जवळपास ४५ अंशावर पोहोचला असल्याने स्लॅबच्या खोलीत झोपणे कठीण झाले आहे. काही खोल्यांमध्ये पंख्याची व्यवस्था आहे. तर काही ठिकाणचे पंखे बिघडले आहेत. तापमानामुळे स्लॅब गरम होऊन खोलीमध्ये थांबणे कठीण होत आहे. उकाड्यामुळे रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही. दिवसा तर आग अंगावर यावी, अशी गरमी होत आहे. रात्री झोप होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांना अशक्त वाटणे, डोक दुखणे, अंगावर घामोळ्या तयार होणे, आदी आजार होत आहेत.
विलगीकरण इमारतीच्या एका कक्षात चार ते पाच नागरिकांना एकत्र ठेवले जाते. त्यातील काही नागरिकांचे कुटुंब विलगीकरण कक्षात कुलर लावण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना कुलर लावू देण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र अशी परवानगी दिली जात नसल्याने उकाडा सहन करावा लागत आहे. ज्या गादीवर झोपतात, ती गादीही गरम होत असल्याने झोप येत नाही असे काही लोकांनी सांगितले. त्यामुळे शारीरिक आजारांबरोबरच मानसिक आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.