नागरिकांना मिळणार खड्ड्यातून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:30+5:30
चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या भंडारा उपविभागांतर्गत येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या काही वर्षात वारंवार खड्डेमय होत असलेल्या गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मार्गाच्या सिमेंटीकरणास वेळ असला तरी आधी खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरूस्ती होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शुक्रवारी खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या उपस्थितीत या कामाची सुरूवात झाली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणचे उपअभियंता आशिष आवळे, शाखा अभियंता प्रशांत खापरे, दीपक आंबुलकर, कनिष्ठ अभियंता लांजे, कंत्राटदार किशोर गायकवाड, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, अनिल पोहणकर, गोविंद सारडा, नंदकिशोर सारडा, सुधाकर येनगंधलवार, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे आदी अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
आरमोरी मार्गाचे काम केव्हा?
चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या भंडारा उपविभागांतर्गत येतो. वडसा ते गडचिरोलीपर्यंतच्या कामाचे अद्याप टेंडरही निघालेले नाही. त्यामुळे या मार्गावर गडचिरोली शहरात पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी कोण पुढाकार घेणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.