छत्तीसगडच्या सीमाबंदीचा कोरची तालुक्यातील गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:39+5:30
कोरची-कोटगूल हा जवळपास ३० किमीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गात मध्येच छत्तीसगड राज्यातील गावे येतात. लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने स्वत:च्या सीमा सील केल्या आहेत. त्यानुसार छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूलच्या दरम्यान असलेल्या गावांमध्ये चेक पोस्ट बसविले आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूल मार्गावरील सीमांवर चेकपोस्ट बसवून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांची अडचण वाढली आहे.
कोरची-कोटगूल हा जवळपास ३० किमीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गात मध्येच छत्तीसगड राज्यातील गावे येतात. लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने स्वत:च्या सीमा सील केल्या आहेत. त्यानुसार छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूलच्या दरम्यान असलेल्या गावांमध्ये चेक पोस्ट बसविले आहे. त्यामुळे कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे कठीण झाले आहे. कोरची तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांना विविध कामे व अत्यावश्यक सेवांसाठी कोरची येथे यावे लागते. मात्र छत्तीसगड राज्याने चेकपोस्ट उभारल्याने कोटगूल परिसरातील नागरिकांना कोरची येथे येणे अशक्य झाले आहे. खुराणा गावावरून दुसरा मार्ग जातो. मात्र सदर मार्ग सुध्दा बंद करण्यात आला आहे. सरकारमार्फत ग्रामीण भागात राशन पुरविले जात आहे. मात्र रस्त्यावरच झाडे पाडून ठेवल्याने राशनचा पुरवठा करणारी वाहने नेण्यास अडचण जात आहे. कोटगूल परिसरातील कार्यरत असलेले डॉक्टर, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना सुध्दा या मार्गाने जाऊ देण्यास गावातील नागरिक तसेच छत्तीसगडचे अधिकारी तयार नाहीत.
गावकऱ्यांनी झाडे कापून अडविला मार्ग
कोरची-कोटगूल मार्गावर छत्तीसगड राज्यातील भुरकुंडी, पाटण, बंजारी आदी गावे येतात. कोरोनाचा प्रसार आपल्या गावात होऊ नये, यासाठी या गावांमधील नागरिकांनी कोरची-कोटगूल मुख्य मार्गावरच मोठमोठी झाडे कापून मार्ग अडविला आहे. रस्त्यावर लाकडे पडली असल्याने रूग्णवाहिका सुध्दा कोरची येथे आणणे कठीण झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी कोटगूल परिसरातील नागरिकांनी केली आहे.