शेकडो हेक्टरवरील धानपिकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:32+5:30
अहेरी तालुक्यात धानपिकाचे जवळपास १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी सुध्दा एवढ्या हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली. यंदाच्या खरीप हंगामात अहेरी उपविभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज काढून शेतात धानपिकाची लागवड केली. धानपीक डौलात असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव बुज. : दिवाळीच्या पूर्वी धानपीक डौलात असताना अचानक परतीच्या वादळी पावसाने अहेरी तालुक्यासह महागाव बुज. भागात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उभे धानपीक आडवे पडले. हलक्या प्रतीच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले. कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले. परतीच्या पावसाने महागाव बुज. परिसरातील शेकडो हेक्टरवरील धानपिकाला जोरदार तडाखा बसला.
अहेरी तालुक्यात धानपिकाचे जवळपास १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी सुध्दा एवढ्या हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली. यंदाच्या खरीप हंगामात अहेरी उपविभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज काढून शेतात धानपिकाची लागवड केली. धानपीक डौलात असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले. पावसामुळे महागाव परिसरातील २० ते ३० गावालगतच्या शेकडो हेक्टर शेतजमिनीतील धानपिकाचे नुकसान झाले. शेतजमिनीतील उभे धानपीक आडवे पडले. महागाव बुज परिसरात हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतीच्या धान पिकाची लागवड केली जाते. परतीच्या पावसाने या तिन्ही प्रतीच्या धानपिकांना तडाखा दिला. यावर्षी उत्पादन कमी होणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. सरकारने जाचक अटी न लावता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सर्वेक्षणाचे काम सुरूच, सरपंचांकडूनही पत्र व्यवहार
परतीच्या वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाºयांमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण सुरूच आहे. कर्मचारी थेट बांधावर पोहोचून पंचनामे करीत आहेत. तसेच सरपंचांकडूनही प्रशासनाकडे पत्र व्यवहार सुरू असून मदतीची मागणी आहे.