कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. सगळे उद्योगधंदे बंद असल्याने सरकारला मिळत असलेले टॅक्स देखील बंद झालेले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने दारूची दुकानं सुरू करण्याचा नुकताच निर्णय घेतला. पण दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर तळीरामांनी वाईन शॉपजवळ गर्दी केली. एवढेच नव्हे तर कित्येक किलोमीटरच्या रांगा देखील लावल्या.
वाईन शॉपसमोर लोकांनी लावलेल्या रागांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या तळीरामांविरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.अनेक सेलिब्रेटींनी देखील सोशल मीडियाद्वारे लोकांच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मलायका अरोराने इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिले आहे की, काय गरज होती एवढ्या लवकर दारूची दुकानं उघडण्याची... यामुळे घरगुती हिंसेत वाढ होणार आहे.
दारू खरेदी करताना काही ठिकाणी हिंसा देखील झाली. त्याबाबत कपिल शर्माने सोशल मीडियावर लिहिले आहे की, या मुर्ख लोकांनी सोशल डिस्टंसिंगची पूर्णपणे वाट लावली आहे. दारूने कोरोनाचा खात्मा होईल असे यांना वाटतंय का...
अभिनेता करण वाहिने ट्वीट केले आहे की, मी सरकारला निवेदन करतो की, दारूची दुकानं बंद करावीत... या गर्दीमुळे लोकांना तर नुकसान होणार... पण ही गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना देखील यामुळे नुकसान होऊ शकतं...गरजच असेल तर दारूची विक्री ऑनलाईन पद्धतीने करावी...