समृद्ध जीवनाची गृरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:19 AM2020-06-05T00:19:18+5:302020-06-05T00:19:25+5:30

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमीन, पाणी आणि शुद्ध हवेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर जिल्ह्यात धामणी, सूर्या, वैतरणा, वांद्री, करवाळे, कुर्झे आदी धरणे असून सूर्या, पिंजाळ, वैतरणा, कवडास, तानसा आदी प्रमुख नद्या वाहत आहेत.

The key to a prosperous life | समृद्ध जीवनाची गृरुकिल्ली

समृद्ध जीवनाची गृरुकिल्ली

Next

हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/बोर्डी : पर्यावरणाचे रक्षण व संरक्षणासाठी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये जागतिक पातळीवर पर्यावरणाबाबत राजकीय व सामाजिक प्रबोधन करण्याची घोषणा केली.


५ जून १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असून पर्यावरण हीच समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली मानली जाते. मात्र प्रत्येक वर्षी पर्यावरणाचे रक्षण करून ते टिकविण्याच्या दृष्टीने आणाभाका घेतल्या जात असल्या, तरी विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात येऊ घातलेले प्रकल्प पर्यावरणाची राखरांगोळी करणार असल्याने जिल्ह्यात या प्रकल्पांना मोठा विरोध होत आहे.


मुंबईच्या नजीकच्या पालघर जिल्ह्यात पूर्वेला पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेला सुमारे ११० किमी लांबीचा विस्तीर्ण सागरकिनारा लाभल्याने येथे समृद्ध पर्यावरणाचा प्रत्यय येतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चार लाख ६९ हजार ६९९ हेक्टर आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई आणि तलासरी या तालुक्यांतील एकूण वनांचे क्षेत्र (राखीव ७४१.४२ चौ.किमी./संरक्षित २६४.०० चौ.किमी. आणि संपादित ३३.१ चौ.किमी.) १०३८.५९ चौ.किमी. असून त्याची टक्केवारी ३५ आहे. वन विभागाकडून वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्र वाढविण्याचे कार्य सुरू असून २०११ ते २०१९ या नऊ वर्षांच्या काळात ७७८१.५९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.


परंतु, केवळ संख्यात्मक वाढ, लाकूडचोरी व अवैध वाहतूक अशा विविध कारणांनी गुणात्मक परिणाम म्हणावा तेवढा दिसत नाही. पालघर, डहाणू व तलासरी येथे २८६३.७४१६ हेक्टर कांदळवनासाठी राखीव वनक्षेत्र अधिसूचित झाल्यानंतर महसूल विभागाकडून वन विभागाने २८४९.३७१ हेक्टर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यालगत व खाजण परिसरातील या हिरव्या तटबंदीला बेकायदेशीररीत्या संपवण्याचा घाट घातला जात आहे.

सन 2000 ची स्थिती
1. पूर्वी घरं, गृहसंकुलांतील कचºयाची घरच्याघरी विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे कचºयाचा प्रश्न निर्माण होत नव्हता.
2. तलाव, समुद्रकिनारे, पाणवठे, वनं मानवी हस्तक्षेपापासून दूर होती. त्यामुळे वनसंपदा मनमोहक वाटत होती.
3. वृक्षारोपण कार्यक्रमातून पूर्वी झाडे वाढण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे वनसंपदेत सातत्याने वाढ होताना दिसत होती.
4. जिल्ह्यात धामणी, सूर्या, वैतरणा, वांद्री, करवाळे, कुर्झे आदी धरणे आहेत, मात्र या धरणांतील पाणी शहरांकडे वळवले आहे.
5. पालघर जिल्हा हा निसर्गसंपदेने नटलेला आहे. डोंगर, नद्या, समुद्रकिनारा यामुळे येथील जीवन संपन्न होते.

सध्याची स्थिती
1. आता गावोगावी कचरा संकलन करून तो डम्पिंग केला जातो. मात्र त्याच्या योग्य व्यवस्थापनाअभावी ढिगारे निर्माण होत आहेत.
2. आता पर्यटन आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे मानवी हस्तक्षेप वाढून समृद्धता लोप पावत आहे.
3. आता लागवडीच्या संख्येत वाढ होत असली तरी झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण मात्र खालावले आहे, ही चिंतेची बाब आहे.
4. मुंबई तसेच वसई-विरार या शहरांकडे पाणी वळविल्याने ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी अवस्था स्थानिक जनतेची आहे.
5. आता जिल्ह्यातील तारापूर हे देशातील सर्वात प्रदूषण करणारे औद्योगिक क्षेत्र असल्याचे शासनाला जाहीर करावे लागले आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...
1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.
2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
3. वस्तू खरेदी करताना तिचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
काय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
9. बायोडिझाइन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.

Web Title: The key to a prosperous life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.