Jai Bhim: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…”; ‘जय भीम’ चित्रपटावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:54 PM2021-11-09T14:54:58+5:302021-11-09T14:56:21+5:30
Jai Bhim: जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. एका सत्यघटनेवर हा चित्रपट आधारलेला असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी हा चित्रपट पाहिला. जय भीम हा चित्रपट पाहून अस्वस्थ व्हायला झाले, अशी पहिली प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
अनेक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. हा जय भीम चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा चित्रपट पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…, असा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जय भीम हा एक ऊर्जास्रोत
मला आठवत नाही की, मी माझ्या भाषणाच्या शेवटी जय भीम कधी म्हणायला लागलो. ही घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक ऊर्जास्रोत आहे. जे तुम्हांला अन्यायाविरुद्ध, स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
दरम्यान, जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवले आहे. हा चित्रपट १९९३ मधील कुडलोर घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.८ रेटिंग मिळालं आहे. चित्रपट निर्मात्या टीमचं अभिनंदन. जय भीम हा उत्कृष्ट चित्रपट आहे. दाक्षिणात्य सिनेमांना अधिक ताकद मिळो, अशी प्रतिक्रिया राजदचे आमदार प्रल्हाद यादव यांनी दिली आहे.