उजनीचं पाणी..  ..‘मामां’ची कहाणी !

By सचिन जवळकोटे | Published: April 25, 2021 08:14 AM2021-04-25T08:14:02+5:302021-04-25T08:14:46+5:30

लगाव बत्ती...

Ujani's water .. .. The story of 'Mama'! | उजनीचं पाणी..  ..‘मामां’ची कहाणी !

उजनीचं पाणी..  ..‘मामां’ची कहाणी !

Next

- सचिन जवळकोटे

तब्बल अकरा आमदार असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या छाताडावर बाहेरचा पालकमंत्री आणून बसविला; तरीही वर्षभर इथली भोळी जनता ‘मामा’ला डोक्यावर घेऊन नाचली. जिल्ह्याचा विकास तर सोडाच, इथल्या लोकांचं हक्काचं पाच टीएमसी पाणीही पळविण्याचा घाट घातला गेला. इंदापूरचे ‘मामा’ आपल्या भूमीला जागले. आता माढ्याचे ‘मामा’ मात्र स्वभूमीला जागतात की राजकीय निष्ठेला, याकडं साऱ्यांचं लक्ष. 
म्हणे ते ‘मामा’ जाणार..   ..अन‌् हे ‘मामा’ येणार !

   ‘पंढरपूर’ची  ‘बारामती’ करू, अशी स्वप्नं दाखविणाऱ्या ‘दादां’ची भाषणं अजूनही ताजी.. निवडणुकीचा निकालही  अद्याप न लागलेला; तोपर्यंत ‘उजनी’चं ‘वाळवंट’ बनविण्याचा कट पूर्वीच शिजल्याचा वास लागलेला. मुळात ‘उजनी’ धरण बांधलं पिण्याच्या पाण्यासाठी. दर उन्हाळ्यात मायनसमध्ये जाणारं हे धरण सोलापूरकरांसाठी आजपावेतो केवळ मृगजळच. या धरणापायी शेकडो गावं उद्‌ध्वस्त झाली. हजारो धरणग्रस्त बेघर झाले, निर्वासित बनले. एकीकडं महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्ठं धरण म्हणवून शेखी मिरवायची, दुसरीकडं पाच दिवसांआड येणाऱ्या नळाच्या पाण्याला गुपचूप मोटार बसवायची. आता हे कमी पडलं की काय म्हणून याच धरणाचं पाच टीएमसी पाणी  शेतीला वळविण्याचा (की पळविण्याचा?) डाव साधला गेला.

  ही कल्पना कुणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून आली असावी, हे इथल्या स्थानिक ‘घड्याळ’वाल्यांना माहीतच असणार. मात्र, सत्तेची दोरी तोंडाला बांधलेली. कोण तोंड उघडणार अन्‌ रागीट ‘दादां’चा राग विनाकारण ओढवून घेणार ? असो. इंदापूरचे ‘मामा’ आपल्या भूमीला जागले. आता माढ्याचे ‘मामा’ मात्र भूमीला जागतात की, राजकीय निष्ठेला, याकडं साऱ्यांचं लक्ष. 

  अजून एक चर्चा. मंत्रिमंडळाच्या नव्या बदलात कदाचित त्या ‘मामां’चं पालकत्व जाणार.. अन्‌ या ‘मामां’ना लालदिव्याची गाडी लाभणार.. पण ‘मोहोळ’च्या ‘यशवंतरावां’ना ‘पालकत्व’ देण्याबाबत म्हणे ‘बळीरामकाका’ अन्‌ ‘अनगरकर’ आग्रही. मंत्रिपद मतदारसंघातच राहतं अन्‌ सुंठेवाचून दोन्ही  ‘मामां’चा खोकलाही जातो, हा दोघांचा होरा. असं झालं तर मात्र जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा इंदापूरचीच गाडी. लगाव बत्ती..

 ‘मामा इंदापूरकर’ गेल्या वर्षभरात ‘सोलापूरकरां’ना कधी आपले वाटलेच नाहीत. कुणाचाही कॉल न घेणं ही त्यांची जशी खासियत, तशीच सोलापूरचे कोणतेच प्रश्न वेळेवर गांभीर्यानं न घेणं हीही त्यांची स्पेशल स्टाईल. ‘आपण आता विरोधी पक्षात आहोत’ याची अजूनही जाणीव न झालेली सोलापूरची ‘देशमुख’द्वय मंडळी या ‘मामां’बद्दल कधीही ‘ब्र’ शब्द काढताना न दिसलेली. मात्र, धनुष्यवाल्या ‘बरडें’पासून ‘हात’वाल्या ‘प्रकाशरावां’पर्यंत अनेक सहकाऱ्यांनीच या ‘मामां’विरोधात उठाव          केलेला. आतातर हा ‘पालकमंत्री’च बदला,             अशी मागणी ‘पानीव’च्या या ‘पाटलां’नी केलीय.     का तर म्हणे, ‘उत्तम’पणे नियोजन करून त्यांना माळशिरस तालुक्याच्या एकाही मिटिंगला आजपर्यंत बोलावलं नाही. खरंतर गेली पाच वर्षे ‘जिल्हाध्यक्ष’ असलेल्या या ‘पाटलां’ना पक्षाची मिटिंग म्हणजे काय, हेच माहीत नाही, हा भाग वेगळा. लगाव बत्ती...

भाऊ रमले गल्लीबोळातच...

बाहेरचा पालकमंत्री आणून जिल्ह्याचा कारभार हाकू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या साठमारीत जिल्हा पातळीवर कणखर विरोधी नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय. नेहमी संधीची वाट पाहणारे बार्शीचे ‘राजाभाऊ’ मात्र अद्याप गल्लीबोळातल्या राजकारणातच अडकलेत. परजिल्ह्यातल्या रुग्णांना केवळ बार्शीच नव्हे, तर परराज्यातल्यांनाही अवघा जिल्हा बरा करतोय, ही भूमिका घेऊन ते पुढं सरसावले असते तर कदाचित बाकीच्या तालुक्यांमधूनही त्यांना उत्स्फूर्त सपोर्ट मिळाला असता. ‘फेसबुक’वरनं कौतुकाचं ‘लाइव्ह-बिइव्ह’ही नेहमीप्रमाणं वाजत-गाजत झालं असतं.
  असो. या ‘राजाभाऊं’ना परवा रात्री अकरा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरून थेट फोन आला, ‘काय राजाऽऽ काय चाललंय ?’ असं विचारत ‘सीएम’नी बराच वेळ चर्चाही केली. किती गंमत नां... एकीकडं ‘देवेंद्र नागपूरकरां’वर निष्ठा ठेवलेल्या ‘राजाभाऊं’ना आजही ‘उद्धो’ मोठ्या हक्कानं एकेरी हाक मारतात, दुसरीकडं याच ‘उद्धों’चं ‘धनुष्य’ घेऊन लढलेले ‘दिलीपराव’ मात्र पंढरपुरात ‘अजितदादां’च्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसतात. कायबी म्हणा.. बार्शीचं राजकारणच लय येगळं राऽऽव.

  स्टेजवरनं आठवलं. गेल्या आठवड्यात मंगळवेढ्याच्या भाषणात ‘दिलीपरावां’नी वाघाची गोष्ट सांगितली. ‘शिकार करायला चांगली बैठक असावी लागते,’ असं त्यांनी गालातल्या गालात हसत सांगितलं. हे ऐकून समोरची मंडळी गोंधळली. बार्शीच्या नेत्याची कोडवर्ड भाषा कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या कानी पडली असावी. संतांच्या नगरीतल्या एकानं दुसऱ्याला विचारलं, ‘ही बैठक कशी असते रं गड्याऽऽ’ दुसराही गडबडला. त्यानं थेट बार्शीतल्या पाव्हण्याला कॉल केला. तेव्हा लगेच विषय बदलत तो हुश्शाऽऽर पाहुणाही एवढंच बोलला, ‘नेत्यांच्या भाषेत बैठक म्हणजे शिकारीसाठी दबा धरून बसणं. यंदाच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये दिसेल बघा तुम्हाला ही बैठक.’  फोन खडाऽऽक. लगाव बत्ती...

Web Title: Ujani's water .. .. The story of 'Mama'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.