नेत्यांचं पक्षांतर... जनतेचं स्थलांतर !

By सचिन जवळकोटे | Published: August 27, 2019 12:20 PM2019-08-27T12:20:45+5:302019-08-27T12:23:28+5:30

सोलापूर जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर : सर्वांत मोठं धरण असूनही तोंडचं पाणी पळालं!

Transfer of Leaders ... People's Migration! | नेत्यांचं पक्षांतर... जनतेचं स्थलांतर !

नेत्यांचं पक्षांतर... जनतेचं स्थलांतर !

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ होण्यासाठी लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यानं सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलासध्या जिल्ह्यात ईन-मीन भाजपचे दोनच आमदार. विशेष म्हणजे दोघेही मंत्री. अशा परिस्थितीत प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेता त्यांच्या पक्षात यायला उत्सुक बनलायसर्वाधिक क्षमतेचं ‘उजनी’ धरण सोलापूर जिल्ह्यात असूनही निम्म्याहून अधिक तालुके आजही पाण्यासाठी तडफडतात.

सचिन जवळकोटे

सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यती’ अशी अत्यंत विचित्र राजकीय परिस्थिती प्रथमच उद्भवलीय. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेता आपल्या जुन्या पक्षाची लक्तरं बाजूला सारून सत्ताधाºयांचा उंबरठा झिजवू लागलाय. ‘कार्यकर्त्यांची इच्छा’ म्हणत बहुतांश नेते ‘सत्ताकामना’चं स्वप्न पूर्ण करत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा मात्र कोनाड्यात धूळ खात पडल्या आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत साडेतीन लाखांपेक्षाही अधिक सोलापूरकरांनी पोटापाण्यासाठी पुण्याकडं ‘स्थलांतर’ केलं असलं तरी स्थानिक नेते मात्र ‘पक्षांतर’ करण्यातच गर्क झाले आहेत.

‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ होण्यासाठी लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यानं सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेही भाजपवासी झालेत. याच राष्टÑवादीच्या रश्मी बागलांनी नुकतंच ‘शिवबंधन’ बांधलं. बार्शीचे आमदार दिलीप सोपलही लवकरच सेना प्रवेश करतील. त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांच्याकडून ‘आगामी पक्ष कोणता?’ ही भूमिका लवकरच सांगोल्यातील कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करू शकते. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे अन् आमदार भारत भालके येत्या काही दिवसांत सत्ताधाºयांच्या स्टेजवर अधिकृतपणे दिसू शकतील. माढ्याचे आमदार बबनराव शिंदेही कदाचित ‘भाजप की सेना?’ याचा अंतिम निर्णय घेतील. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलेत. केवळ सुशीलकुमार शिंदे यांचं घराणं सोडलं तर जिल्ह्यातील सारेच प्रमुख नेते पक्षांतराच्या प्रक्रियेत मोठ्या हिरिरीने सहभागी झालेत. प्रशांत परिचारक, राजाभाऊ राऊत, विजयराज डोंगरे अन् उत्तम जानकर ही मंडळी तर अगोदरच सत्ताधाºयांसोबत राहिलीत.

सध्या जिल्ह्यात ईन-मीन भाजपचे दोनच आमदार. विशेष म्हणजे दोघेही मंत्री. अशा परिस्थितीत प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेता त्यांच्या पक्षात यायला उत्सुक बनलाय. खरंतर, राज्यात जिल्ह्याची राजकीय ताकद वाढवायला भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख अन् सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी खूप मोठी संधी होती अन् आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत केवळ कुरघोडीच्या राजकारणातच दोन्ही देशमुख गट रमल्याने पक्षाची वाढ तर सोडाच जिल्ह्याचा विकासही जणू दुर्मीळ ठरतोय.

महाराष्टÑातील सर्वाधिक क्षमतेचं ‘उजनी’ धरण सोलापूर जिल्ह्यात असूनही निम्म्याहून अधिक तालुके आजही पाण्यासाठी तडफडतात. मुक्या जनावरांच्या हंबरड्यानं शेकडो छावण्या गजबजून जातात. पाणी उपलब्ध असूनही केवळ त्याच्या वाटपाचं नियोजन शेवटच्या टोकापर्यंत झालेलं नाही. अनेक तालुक्यात कालवे पूर्ण झालेच नाहीत. सुमारे सव्वाशे टीएमसी पाणी जिल्ह्याच्या अंगणात खेळत असतानाही बारा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहराला आजही तीन-चार दिवसांआड पाणी मिळतं. यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू केलं जाणार होतं; मात्र ‘पाईपातील शुक्राचार्य’ अद्याप कुणालाच सापडलेले नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून भीमा नदीत वारंवार पाणी सोडण्यात येतं. मात्र, बाष्पीभवनात उडून अन् उसाच्या फडात जिरून शिल्लक राहिलेलं पाणी कसंबसं सोलापूरकरांच्या तोंडी पडतं. हे सारं माहीत असूनही बहुतांश लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्पच. कारण, याच पाण्यावर फुललेला ऊस त्यांच्या साखर कारखान्यांमध्ये गाळपाला जातो. याच कारखानदारीच्या जीवावर आमदारकीही टिकते.

‘हायवे’चं जाळं... तरीही गावं ओसाड!
पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक वेगानं कोणती कामं झाली असतील तर महामार्गांची. पुणे-सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-येडशी, सोलापूर-सांगली, सोलापूर-अक्कलकोट अन् सोलापूर-विजयपूर या राष्टÑीय महामार्गांच्या रुंदीकरणाचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं. बहुतांश तयारही झाले. 

दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे प्रमुख मार्ग सोलापुरातूनच गेल्याने रोज दहा हजारांपेक्षाही जास्त अवजड वाहने जिल्ह्यातून ये-जा करतात. नव्वदपेक्षाही जास्त रेल्वेगाड्या इथूनच अप-डाऊन होतात. मात्र केवळ इथं नव्या उद्योगांची निर्मिती न झाल्यानं अन् जुने उद्योग बंद पडत गेल्यानं रोजगारासाठी रोज शेकडो तरुणांचा लोंढा पुण्या-मुंबईकडं वळतोय. 

विकासासाठी तयार केले गेलेले रस्ते आता स्थलांतरासाठीच कामी येऊ लागलेत. ग्रामीण भागात घरटी एकतरी तरुण पुण्या-मुंबईकडे वास्तव्याला गेल्याचं भीषण चित्र कैक गावांमध्ये दिसून येऊ लागलंय.

 झालेली कामं...

  • - सोलापूर शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ७०० पैकी १५० कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात शहरात होम मैदान सुशोभीकरण, स्मार्ट रंगभवन चौक, मलनिस्सारण, कचरा प्रक्रिया अन् गावठाण भागात ड्रेनेज-पाणी सुविधा.
  • - पंढरपुरात तुळशी वृंदावन अन् भक्तनिवास पूर्णत्वास.
  • - यंदा प्रथमच उजनी धरणातील पाणी पाईपद्वारे हिप्परगा तलावात.
  • - मंगळवेढ्यात ३३ केव्हीच्या तीन उपकेंद्रांची उभारणी.
  • - सोलापूर-दौंड दुहेरी रेल्वेमार्ग शेवटच्या टप्प्यात.

 रखडलेली कामं...

  • - बोरामणी विमानतळ, शहरातील नियोजित उड्डाणपूल अन् सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग कागदावरच.
  • - देगाव जलसेतू काम शेवटच्या टप्प्यात किरकोळ कारणासाठी रखडलं.
  • - पंढरपुरात ‘नमामि चंद्रभागा’अंतर्गत घाटांची कामे अर्धवटच.
  • - संत विद्यापीठाची घोषणा अद्याप हवेतच, पालखी मार्गांच्या कामांनाही वेग नाही.
  • - करमाळ्याच्या मांगीसह अनेक प्रमुख औद्योगिक वसाहती कागदावरच.

Web Title: Transfer of Leaders ... People's Migration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.