ना सत्तेसाठी घालमेल, ना पक्ष बदलाचा मोह!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 11:54 AM2022-07-02T11:54:13+5:302022-07-02T11:55:24+5:30

संपूर्ण राजकीय जीवनात बाबूजींनी कधी कोणाचाही द्वेष केला नाही. स्वतःच्या  लाभासाठी, कोणाचे चारित्र्यहनन करण्यासाठी त्यांनी आपले वृत्तपत्र वापरले नाही.. ना मुलांना वापरू दिले, ना त्या-त्या वेळच्या संपादकांना!

Sushilkumar Shinde article Jawaharlal Darda No restlessness for power, no temptation to change party | ना सत्तेसाठी घालमेल, ना पक्ष बदलाचा मोह!

ना सत्तेसाठी घालमेल, ना पक्ष बदलाचा मोह!

Next


सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री -

वाहरलालजी दर्डा राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी ते हाउसिंग फायनान्सचे चेअरमन होते आणि फोर्टमध्ये एका जुन्या इमारतीत ते बसत असत.  कुठल्यातरी हाउसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स संबंधातील विषय घेऊन मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. पहिल्याच भेटीमध्ये जवाहरलालजी मला खूप आवडले. त्यांचा स्वभाव आवडला आणि ‘हा माणूस वेगळा आहे’, याची खात्री पटली. नंतर १९७४ साली मी आमदार म्हणून निवडून आलो. नंतर तेही आमदार झाले, मंत्री झाले आणि मग आम्ही अतिशय जवळ आलो. १९८१-१९८२च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते. मुख्यमंत्री अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. आम्ही सगळेच त्यांना सुरुवातीला मदत करत असू. पण, कोट्या करण्याच्या नादात एकदा त्यांनी आम्हा आमदारांना षंढ, पुंड, गुंड असे शब्द वापरले. आम्ही  फार चिडलो आणि त्यांना पदावरून हटवण्याची मोहीम सुरू झाली. 

१९८२-१९८३ सालच्या या ‘भोसले हटाव’ मोहिमेत जवाहरलालजी दर्डा, रामराव आदिक, औरंगाबादचे बाळासाहेब पवार असे अनेक लोक सामील झाले होते. बाबासाहेबांनी हे अपशब्द वापरल्यावर आमच्या ‘भोसलेविरोधी गटा’ने ठरवले की, विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मी मांडायचा, नानाभाऊ एम्बडवार यांनी अनुमोदन द्यायचे आणि विधान परिषदेत हा प्रस्ताव जवाहरलालजी दर्डा यांनी मांडायचा. त्या काळात बाबूजींच्या  घरी जवळजवळ रोज बैठक असायची. त्यांचं ‘लोकमत’चं छान ऑफिस होतं, त्या ठिकाणीही बैठक होत असे.  मी विधानसभेत मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाचा ठराव मांडला. विधान परिषदेत दर्डाजींनी हाच ठराव मांडला, त्याची खूप मोठी प्रसिद्धी देशात आणि देशाबाहेर झाली. ‘काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्याच आमदारांनी हक्कभंग मांडल्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. बाबूजी शांतपणे हे सगळं करत होते.  पुढे सरकार बदललं. भोसले गेले, वसंतदादा आले. नवीन सरकारमध्ये बाबूजी मंत्री झाले, मी मंत्री झालो. महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचं काम सुरू झालं. पण, एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा बाबासाहेब भोसले आणि आमच्यात कधी कटुता आली नाही. 

त्यांची दोन्ही मुलं- विजय, राजेंद्र यांनी बाबूजींच्या ‘लोकमत’ने सुरू केलेलं काम थेट अंगावर घेतलं आणि बाबूजींच्या अपेक्षेप्रमाणे अत्यंत प्रभावीपणे हे वर्तमानपत्र महाराष्ट्रभर लोकप्रिय करून दाखवलं. बाबूजींच्या नंतर विजयबाबू राज्यसभेचे सदस्य झाले, राजेंद्रबाबू महाराष्ट्रात मंत्री झाले. हे सगळं करत असताना बाबूजींनी जो काँग्रेसचा विचार मांडला, तोच या दोन्ही सुपुत्रांनी बाबूजींच्या मार्गदर्शनानं ‘लोकमत’मार्फत दशदिशांना पोहोचविला. 

संपूर्ण आयुष्यात बाबूजींनी काँग्रेसनिष्ठा कधी सोडली नाही. नेहरू, इंदिरा, राजीव या तीन पिढ्यांचे महाराष्ट्र काँग्रेसमधले साक्षीदार केवळ जवाहरलाल दर्डा आहेत आणि बाबूजींनी शेवटपर्यंत या तीनही नेत्यांची खंबीरपणे साथ केली. बाबूजींची ना कधी सत्तेसाठी घालमेल झाली, सत्तेत आले, त्यावेळी ना ते हुरळून गेले.  एक अत्यंत समतोल वैचारिक राजकारणी म्हणून मी बाबूजींकडे पाहतो.  प्रत्येक विरोधी विचारांचा त्यांनी अत्यंत आदर केला. कधी कोणाचाही द्वेष केला नाही. हातातल्या वर्तमानपत्राचा त्यांनी  स्वत:साठी वापर केला नाही. कोणाचं चारित्र्यहनन करण्यासाठी त्यांनी आपलं वृत्तपत्र  ना मुलांना वापरू दिलं, ना संपादकांना वापरू दिलं. 

बाबूजींच्यात शिगोशिग भरलेली रसिकता आणि निसर्गाबद्दलची आत्मीयता, त्यामुळे त्यांचं जीवन समतोल वाटतं. ते ना सत्तेकरिता कधी धावले, ना कधी मंत्रिपद गेलं म्हणून शोक करीत बसले. त्यांना भरपूर कामे होती. याच आत्मीयतेतून त्यांनी यवतमाळची शेती समृद्धपणे उभी केली आणि यवतमाळचा बगिचा फुलवला. रायगड जिल्ह्यातही कर्जतजवळचा भिलवले येथील त्यांचा बगिचा पाहता ‘हा माणूस राजकारणात आकंठ बुडालेला आहे’, असं कधीच वाटलं नाही. माझ्यात आणि त्यांच्यात समान धागे खूपच होते. आम्हा दोघांनाही शेतीची आवड. मी त्यांचे बगिचे पाहिलेत, त्यांनी माझा बगिचा आणि शेती पाहिलीय. राजकारण जेव्हा नसेल तेव्हा आमच्या दोघांच्या वृत्ती अधिक आनंदी असत, हे आम्ही अनुभवलेलं आहे. 

 ज्या दिवशी जो विषय असेल, तो बाबूजींच्या त्या दिवशीचा सर्वस्व पणाला लावून काम करण्याचा दिवस असायचा. तो विषय संपला की, बाबूजी एका क्षणात त्यापासून वेगळे व्हायचे. ही अलिप्तता, स्थितप्रज्ञता साधनेशिवाय शक्य नाही. त्याकरिता चिंतन असावं लागतं. कोणता विषय अंगाला किती चिकटवून घ्यायचा, एखाद्या विषयाचा आनंद किती व्यक्त करायचा, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर ती मनाला किती लावून घ्यायची, याचं सगळं परिमाण बाबूजींच्या वागण्यात तंतोतंत दिसत असे. त्यामुळे मी त्यांना राजकारणातले एक आदर्श व्यक्तिमत्त्व  मानत आलो. राजकारणाच्या बाहेर जीवनाचा आनंद आहे आणि तो उपभोगता आला पाहिजे, हे आम्हा दोघांना समजलं होतं, असं मला वाटतं. पण, बाबूजी या गुणविशेषात कांकणभर माझ्यापुढेच  होते. 

मैत्रीला बाबूजी पक्के होते. वसंतराव नाईक आणि त्यांची मैत्री. पण, राजकीय कसोटीची वेळ आली तेव्हा नाईक साहेबांपासून अलग व्हायला बाबूजींना एका क्षणाचाही विचार करावा लागला नाही.  अलग होताना व्यक्तिगत मैत्रीमध्ये तसूभर अंतर निर्माण झालं नाही. अशावेळी निर्णय घेणं फार अवघड असतं. मलाही राजकारणात पवार साहेबांनी आणलं, पण राजकीय निर्णय करताना मला काँग्रेस पक्ष आणि इंदिराजी, राजीवजी आणि नंतर नरसिंहरावजी यांच्यापासून वेगळं होता आलं नाही.. मला वाटतं, माझ्या  या सगळ्या राजकीय पावलांच्या घट्ट वाटांच्या मागे जवाहरलाल दर्डा यांच्या त्या-त्या वेळच्या निर्णयक्षमतेची सावली सतत असली पाहिजे. जुनी माणसं निसर्गनियमांनुसार जरी आपल्यातून गेली, तरी त्यांच्या तत्त्वनिष्ठेने काळावर पावले उमटवून ती जातात. जवाहरलाल दर्डा काळावर पावले उमटवणारे नेते होते. माझी त्यांना भावपूर्ण आदरांजली.
 

Web Title: Sushilkumar Shinde article Jawaharlal Darda No restlessness for power, no temptation to change party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.