Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:14 AM2020-10-08T06:14:59+5:302020-10-08T06:15:17+5:30

Sushant Singh Rajput Case:

Sushant Singh Rajput Case Mumbai Police should teach lesson to cyber mafia | Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच!

Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांनी सायबर माफियांना धडा शिकवावाच!

googlenewsNext

- श्रीमंत माने । कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरची सगळी लढाई लढवण्यात आली ती सोशल मीडियावरच! भाजपसह ‘एनडीए’मधील काही घटकपक्षांनी हा ‘बिहारी’ अस्मितेचा मुद्दा बनवणे, मुंबईऐवजी पाटण्यात नोंदवलेला पहिला एफआयआर, मग सीबीआय चौकशीची मागणी, त्याआधीच ‘ईडी’ने स्वत:हून तपास सुरू करणे हे सारे आता सर्वांना पाठ आहे. रिया चक्रवर्ती, सुशांतची आर्थिक लूट, मादक द्रव्याचे सेवन व व्यापार, दिशा सॅलियनच्या मृत्यूप्रकरणातील संशय अशा सगळ्या कंड्या पिकविण्यात आल्या, त्या प्रामुख्याने सोशल मीडियावरच. रोज नवी स्टोरी, विविध वृत्तवाहिन्यांवर रोज आक्रस्ताळ्या चर्चा ! या सगळ्यांमागे एक सुनियोजित षडयंत्र असावे, असा संशय व्यक्त होत होताच. आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या डॉक्टरांचा ‘सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत’ हा अहवाल आणि सीबीआयने त्याला दिलेला दुजोरा, यामुळे हा मधला लटका जनाक्रोश केवळ कल्पनाविलास होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोज ही आक्रमणे होत असताना कमालीचा संयम दाखविणारे मुंबई पोलीस अन् झालेच तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. ठाकरे पिता-पुत्र अजून व्यक्त झालेले नाहीत. परंतु, मुंबई पोलिसांनी मात्र षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी पावले उचलली आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीची मोहीम चालविण्यासाठी, आयुक्त परमवीरसिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्यासाठी सोशल मीडियावर जवळपास ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आली. केवळ भारतातून नव्हे तर जगातल्या अन्य देशांमधूनही त्या खात्यांवरून बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आल्या. टिष्ट्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत काही महिने सुशांतसिंहला न्याय मागणारे हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले. मुंबई पोलिसांची पद्धतशीर बदनामी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आता गुन्हे दाखल करून या षडयंत्राचे सूत्रधार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियावरील बनावट खाती हे खरेच डोकेदुखीचे प्रकरण आहे. ही बनावट खाती विशिष्ट हेतूंनी तयार केली जातात. हेतू पूर्ण झाला, की ही औटघटकेची खाती बंद होतात. यात दोन प्रकार आहेत. एक ‘ट्रोलिंग’! दुसºया प्रकारात ते खाते ‘इन्फ्लुएन्शियल’ असल्याचे दाखविण्यासाठी फॉलोअर्स, लाईक, एंगेजमेंट हे सारे कृत्रिम पद्धतीने पैसे मोजून फुगवले जाते आणि सोशल मीडियावरील जाहिरातींसाठी त्या नसलेल्या प्रभावाचा वापर केला जातो. ‘ट्रोल’ म्हणता येईल अशा पहिल्या प्रकाराचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी संबंध आहे. जस्टीस फॉर सुशांत सिंह, वुई आर वुईथ एसएसआर, सुशांत ट्रूथ एक्सपोज्ड असे हॅशटॅग ट्रेंड करण्यासाठी अशा हजारो बनावट खात्यांचा साधार संशय आहे. ही खाती ओळखणे तितकेसे अवघड नाही. उदा. ट्विटरवरील अशा खात्यांना फॉलोअर्स अजिबात नसतात, ते कुणाला फॉलो करीत नाहीत, तरी ट्विर्ट्सची संख्या मात्र हजारोंच्या घरात असते. अशी काही खाती व्हेरिफाइड म्हणजे ‘ब्लू टिक’ वाली असतात अन् तरीही सतत विद्वेष पसरविणाºया, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाºया पोस्ट टाकत राहतात.
 



सुशांत प्रकरणात अशा खात्यांचा अगदी ‘वॉररूम’सारखा वापर करण्यात आला, असा संशय आहे. आदित्य ठाकरे हे या बदनामीच्या मोहिमेचे मुख्य लक्ष्य होते. महाराष्ट्रातील बदलते राजकारण व त्यातील शिवसेनेची भूमिका मुंबई महानगरावरील सेनेची सत्ता, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी असे राजकीय कांगोरे या मोहिमेला होते व आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काहीतरी संदिग्ध बोलत राहायचे, संभ्रमाचे वातावरण तयार करायचे अन् सायबर माफियांनी पूर्ण त्वेषाने मुंबई पोलीस, ठाकरे कुटुंबावर तुटून पडायचे, अशी ती व्यूहरचना होती. यात मुंबईची, बॉलिवूडची यथेच्छ निंदानालस्ती करण्यात आली, सोशल मीडियाचा वापर करून सत्याचा आधार नसलेले ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न झाला. आता मुंबई पोलिसांनी हे षडयंत्र मुळातून खणून काढायला हवे. रोज चौफेर हल्ले होत असताना संयम दाखविला, सत्यावर विश्वास ठेवला, हे चांगलेच झाले. आता मात्र आक्रमकपणे त्या सोशल मीडियाच्या गैरवापराचा पर्दाफाश करायला हवा. त्यामुळे केवळ पोलीस दलाचीच प्रतिमा उंचावेल, असे नाही तर नव्या, खुल्या माध्यमांच्या रूपाने सामान्य जनतेला अभिव्यक्तीचा जो अपारंपरिक मार्ग गवसला आहे, त्यातही पारदर्शकता येईल, विश्वासार्हता वाढेल. अंतिमत: अशा प्रकरणांमध्ये तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था आणि खोटा, लटका जनाक्रोश यांमधील फरक स्पष्ट होईल. पोलीस असो की सीबीआय किंवा अन्य कोणत्या तपासयंत्रणा, त्या कसल्याही प्रभावाशिवाय त्यांना नेमून दिलेली कामे करू शकतील.

Web Title: Sushant Singh Rajput Case Mumbai Police should teach lesson to cyber mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.