स्वकीयांचे बंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:55 AM2020-09-22T00:55:30+5:302020-09-22T00:56:20+5:30

एडिटर्स व्ह्यू

Rebellion of one's own! | स्वकीयांचे बंड !

स्वकीयांचे बंड !

Next

- मिलिंद कुलकर्णी

जनतेला फार काळ मूर्ख बनवता येत नाही, असे प्रसिध्द वचन आहे. त्याचा प्रत्यय नेहमी येत असतो. पण तरीही राजकीय मंडळींमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. अवास्तव आश्वासने देऊन सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेत आल्यावर आश्वासनांना तिलांजली द्यायची. जनतेने आश्वासनांची आठवण करुन दिली तर बहाणे करायचे ही प्रवृत्ती बनली आहे. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही.
थोडे इतिहासात डोकावले तर अशा घटना, प्रसंग अनेक दिसतील. काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्टÑात काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते राष्टÑवादीत सामील झाले होते. जळगावात तर काँग्रेसमध्ये मोजके नेते राहिले होते. मधुकरराव चौधरी, अरुणभाई गुजराथी, जे.टी.महाजन, अ‍ॅड.रवींद्र पाटील, वसंतराव मोरे, डॉ.सतीश पाटील अशा नेत्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काडीमोड घेऊनदेखील राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले. १५ वर्षे सत्ता राबवली. या काळात जळगावात काँग्रेस क्षीण होत गेली आणि राष्टÑवादी प्रबळ होत गेले. पालकमंत्रीपद राष्टÑवादीकडे राहिले. खासदार, आमदार, पालिका, पंचायत समितींमध्ये सत्ता मिळविली. भाजपचेही अनेक नेते त्याकाळात राष्टÑवादीत गेले. माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ.के.डी.पाटील असे दिग्गज राष्टÑवादीत गेले होते.
२०१४ मध्ये भाजप व शिवसेनेची सत्ता राज्यात आली. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात असल्याने अनेकांनी टोप्या फिरवल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तर पक्षांतराची मोठी लाट आली. नेते आले, तशा त्यांच्या संस्थांवर देखील पक्षाचे झेंडे बदलले. हे सगळे राजकीय नेत्यांच्या सोयीने घडले. पण जनतेचे काय? ज्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिले, त्या अपेक्षांचे काय? पाच वर्षानंतर जनतेला काय तोंड दाखवायचे, हा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेची चार वर्षे आटोपली आणि आता शेवटचे वर्ष सुरू झाले. तशी आयाराम - गयारामांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. अनेकांना पक्षांतर करताना दिलेली आश्वासने पाळली गेली नसल्याचा साक्षात्कार झाला. काहींना सत्ता उपभोगूनदेखील आता जनहिताची कळकळ जाणवू लागल्याचा आव आणला. गेल्या पाच वर्षांत भाजपमध्ये आलेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या संस्थांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. स्वकीयांचे बंड सुरु झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोतीलाल पाटील या ज्येष्ठ नेत्याने नगरपालिका निवडणुकीत अचानक भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. पी.के.अण्णा पाटील यांच्या गटाचे मकरंद पाटील यांचा पराभव करुन ते निवडून आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पी.के.अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मोतीलाल पाटील यांची कोंडी झाली. त्यांचे पुत्र अभिजित पाटील यांनी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपला निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय काही करता येत नाही.
धुळे महापालिकेत प्रथमच भाजपला बहुमत मिळाले. राजवर्धन कदमबांडे यांचे अनेक सहकारी या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले. नंतर कदमबांडेदेखील भाजपमध्ये आले. महापालिका आणि कदमबांडे हे समीकरण असताना भाजपकडून त्यांना सूत्रे सोपविली जात नसल्याचे चित्र आहे. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे महापालिकेची सूत्रे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या आठवडयात स्थायी समितीची सभा सुरु असताना नगरसेवक शीतल नवले यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला नगराध्यक्षांविरुध्द उपनगराध्यक्षांनी बंड पुकारले. खासदार आणि आमदार हे दोन्ही या शहरातले आहेत. दोघांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. खडसे यांचा गटदेखील प्रभावी आहे. त्यामुळे याठिकाणचा संघर्ष वेगळे वळण तर घेणार नाही, याची चिंता पक्षश्रेष्ठींपुढे आहे.
जळगाव महापालिकेत भाकरी फिरवूनदेखील भाजपमधील गटबाजी संपायचे नाव नाही. गटतट वाढत असून विरोधकांना पक्षांतर्गत मंडळीच खाद्य पुरवित असल्याची माहिती बाहेर येऊ लागल्याने अस्वस्थता वाढली आहे.
याचा अर्थ एकच आहे, सत्ता आणण्यासाठी कष्ट लागतातच, पण ती टिकविण्यासाठी दुप्पट मेहनत लागते. ते जमले नाही, तर स्वकीय नाराज होतात. बंडाचे झेडे हाती घेतले जातात.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Rebellion of one's own!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.