rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:12 AM2021-04-02T01:12:38+5:302021-04-02T01:14:36+5:30

Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award : या अभिनेत्याला ‘नेता’ व्हायचे नाही. रजनीकांतने ‘आपण बरं, आपलं काम बरं’, हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा!

rajinikanth : Ann Vashi, Tasni Vashi ... Mind it! | rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

Next

- सुकृत करंदीकर
(सहसंपादक,  लोकमत, पुणे) 

संकुचितपणाचा दोष पत्करून म्हणता येईल की, मराठी माणसाच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार मराठी माणसालाच मिळण्याचा आनंद महाराष्ट्रानेही साजरा करावा. शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे सिनेसृष्टीतल्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पारितोषिकाचे मानकरी ठरले. (Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award) भाषा, प्रांताच्या सीमा ओलांडून कर्तबगारी गाजवणारी मराठी माणसं तशीही दुर्मीळ. रजनीकांत म्हणजे अचाट लोकप्रियता. ज्ञात विश्वातली कोणतीही गोष्ट लीलया करू शकणारा ‘हिरो’ म्हणजे रजनीकांत. गुंडाच्या पिस्तुलातून सुटलेली गोळी सहजपणे एका हातात झेलायची, दातांनी तिचे दोन तुकडे करायचे आणि हेच दोन तुकडे समोरच्या दोन गुंडांना मारून त्यांचा खात्मा करायचा- हा तद्दन ‘विनोदी सीन’ रजनीकांत ज्या त्वेषाने पडद्यावर साकारतो तेव्हा तर्कबुद्धी खुंटीला टांगून प्रेक्षक आ वासतो. 

दक्षिण भारतातल्या गेल्या दोन-तीन पिढ्यातली काही लाख पोरं-पोरी रजनीकांतच्या ‘डान्सिंग स्टेप्स’वर फिदा झाली. पिस्तूल, गॉगल, सिगारेट अशा वस्तूंसोबतची रजनीकांतची हातचलाखी कॉपी करण्याचा प्रयत्न देशातल्या काही हजार नटांनी आजवर केला. त्याच्या अनोख्या ‘डायलॉग डिलिव्हरी’वर वेब सिरीजच्या आजच्या जमान्यातही पडद्यासमोर नोटानाण्यांची उधळण होते. पडद्यावर अतर्क्य कारनामे साकारणारा रजनीकांत माणूस म्हणून अगदी साधा आहे. कित्येक हिरोंचा उतारवयातला वेळ टक्कल लपवण्यात जातो. रजनीकांत त्याच्या टकलासह रसिकांसमोर त्याच आत्मविश्वासानं जातो आणि त्यांना आरपार जिंकतो. फाळके पुरस्कार मिळवणारे रजनीकांत हे तिसरे तामिळी. गेल्या ४५ वर्षात रजनीकांत यांनी कोट्यवधी प्रेक्षकांना रिझवले. या कर्तृत्वाचा योग्यवेळी सन्मान झाला. सन २०१८ मध्ये याच पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन होते. पाठोपाठ २०१९ साठी रजनीकांत. लोकप्रियता आणि कोट्यवधी रुपयांची इंडस्ट्री उभी करण्याची एकहाती ताकद या अनुषंगाने हा क्रम अगदी सार्थ आहे. 



स्वाभाविकपणे रजनीकांतच्या पुरस्काराच्या ‘टायमिंग’ची चर्चा ऐरणीवर आली. तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. यात उतरण्याचा मानस स्वतः रजनीकांतनेच गेल्यावर्षी जाहीर केला होता.  भाजपसोबत जायचे की स्वतंत्र पक्ष काढायचा याचा निर्णय होत नव्हता. वयाच्या सत्तरीतल्या या ‘हिरो’ला त्यात आजारपणाने गाठले. शून्यातून कमावलेली पैसा-प्रसिद्धीची आयुष्यभराची कमाई राजकीय पटावर पणाला न लावण्याचे रजनीकांत यांनी अखेरीस ठरवले. यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केला नसेल असे ठामपणे सांगणे अवघड आहे. तरीही रजनीकांत यांना सन्मान देऊन भाजपची मतांची झोळी भरेल असे मानणेही भाबडेपणाचे ठरावे. दाक्षिणात्यांचे चित्रपटप्रेम फार टोकाचे. रजनीकांत यांची देवळं त्यांनी पूर्वीच उभारली. आपल्या ‘हिरो’च्या राष्ट्रीय सन्मानाचा आनंद चाहत्यांना नक्की होईल; पण त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नाही. रजनीकांत यांनीच भाजपला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले असते तर गोष्ट वेगळी होती. 

गरिबीतून वर आलेले रजनीकांत कधीकाळी बस कंडक्टर होते. त्यावेळी त्यांच्या अभिनयाला दाद देणारा ड्रायव्हर मित्र राज बहाद्दूर त्यांना आठवला. सत्यनारायण या भावाची याद आली. पहिल्या सिनेमात संधी देणाऱ्या दिग्दर्शकांप्रति ऋण व्यक्त केले. मग पंतप्रधानांपासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि कमल हसन यांच्यापासून स्टॅलिनपर्यंत सर्वांचे आभार त्यांनी मानले. रजनीकांतची ही राजकीय समानता लक्षात घेण्याजोगी आहे. या अभिनेत्याला ‘नेता’ व्हायचे नाही. ‘नेत्यां’च्या जाळ्यातही तो सापडू इच्छित नाही. दाक्षिणात्य सिनेमाचा निर्विवाद ‘थलैवा’ म्हणजेच ‘बॉस’ असणाऱ्या रजनीकांतने ‘आपण बरं, आपलं काम बरं’, हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा. रजनीचा एक खूप लोकप्रिय डायलॉग आहे - ‘एन्न वाशी, तान्नी वाशी’...म्हणजे ‘मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार’. पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही हे जगलाय हा माणूस...माइंड इट्ट !

Web Title: rajinikanth : Ann Vashi, Tasni Vashi ... Mind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.