Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचं असं का होतं?... राष्ट्रवादी का वाढते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:16 AM2022-01-21T05:16:58+5:302022-01-21T05:20:03+5:30

तळातला शिवसैनिक कडवा आहे; पण आपल्या गावात राष्ट्रवादीवाल्यांना निधी मिळतो, असं तो पाहतो तेव्हा त्याचं मन खट्टू होतच असणार!

Nagar Panchayat Election Result 2022 Why Shiv Sena gets less seats than ncp | Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचं असं का होतं?... राष्ट्रवादी का वाढते?

Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचं असं का होतं?... राष्ट्रवादी का वाढते?

Next

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात ज्या ठळक गोष्टी समोर येतात, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली दिसते. सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. चार पक्षांच्या तुलनेत भाजप अव्वल क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये सत्ता असतानाच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होणे साहजिक आहे. तरीही तीन पक्षांचे सरकार असताना विरोधी पक्षात राहूनही इतर तिघांपेक्षा अधिक यश मिळविणे ही भाजपची उपलब्धी आहे. तीन तगडे पक्ष सत्तेत असल्यानं भाजप अगदीच माघारला असं आतापर्यंत बहुतांश निवडणुकांत झालेलं नाही. भाजपकडे स्वत:ची मोठी यंत्रणा आहे. गावोगावचं संघाचं नेटवर्क त्यांच्या दिमतीला असतंच. एखाद‌्दोन  पराजयांनी नाउमेद न होता कार्यकर्ते काम करत राहतात. एखाद्या झाडाला एका वर्षात फळ लागतं, एखाद्या झाडाला पाच वर्षांनी लागतं, असं समजत ते फळाची वाट पाहत राहतात. एखाद्या जागेवर हरले तरी मतदान गेल्या वेळेपेक्षा दुपटीनं वाढलं असं सांगत पराभवातही अनेक वर्षे समाधान शोधणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. त्यांची पराभवाची परंपरा ४०-५० वर्षांची आहे, विजय अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांत दिसायला लागला. त्यांच्याकडे संयम भरपूर आहे. 



चंद्रकांतदादा यादी बदलतील? 
भाजपला यावेळी जे यश मिळालं ते इतरांपेक्षा जास्त दिसत असलं तरी तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीपुढे फारच कमी आहे. समाधान कशात शोधायचं हा प्रश्न आहे. कालच्या निकालात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार तीन पक्षांना मिळून ९४४ तर भाजपला ३८४ जागा मिळाल्या. भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याचं जे स्वप्न पाहत आहे त्याला बळकटी देणारं हे यश नक्कीच नाही. खूप मोठी मजल मारावी लागेल. कुणाचं नाव घेण्याचं कारण नाही, कारण असे नेते जळगावपासून भंडाऱ्यापर्यंत आहेत. पक्षात खूप मिरविणाऱ्या नेत्यांना आपापले प्रभावपट्टे टिकवता आले नाहीत.  चंद्रपूरसारखा हक्काचा जिल्हा काँग्रेसनं पळवला. साईडलाईन केलेल्यांनी किंवा योग्यता असूनही ज्यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही त्यांनी चांगलं यश मिळवलं. बडबोले, चमकेश कोण आणि कामाचे कोण याची यादी चंद्रकांतदादा नव्यानं तयार करतील तर पक्षाचं भलं होईल, अशी एक भावना आहे.



सत्तेच्या लाभाचं राष्ट्रवादीतंत्र 
प्रश्न आहे तो राष्ट्रवादी का वाढली अन् शिवसेना का माघारली याचा. शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर राहावं लागलं. काही ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादीची युती होती. काँग्रेस बहुतेक ठिकाणी स्वबळावरच लढली. आज यश कमी मिळालं; पण या निमित्तानं पंजा सगळीकडे पोहोचला, त्याचा भविष्यात फायदा होईल. निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेची फरफट झाली अशी जी टीका आज निकालानंतर होत आहे ती काँग्रेसच्या बाबतीत तर नाही झाली! प्रश्न हा ‘व्होट ट्रान्सफर’चादेखील आहे. जितक्या सहजतेनं शिवसेनेची मतं भाजपकडे अन् भाजपची शिवसेनेकडे ट्रान्सफर होत असत, तितक्या सहजतेनं राष्ट्रवादी-शिवसेनेत ‘व्होट ट्रान्सफर’ होऊच शकत नाही. शेवटी हिंदुत्व हेच शिवसेनेचं बलस्थान आहे, ते सत्तेसाठी बोथट होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावीच लागेल. 



काँग्रेसचं आपलं वेगळंच चाललेलं असतं. त्यांचे नेते आपापल्या प्रभावक्षेत्रातील गड टिकविण्यासाठी धडपड करतात.  गड टिकविले की गुलाल उधळून खुश होतात. आपण जिंकलो याच्या आनंदापेक्षा आपल्या पक्षांतर्गत विरोधकाला त्यांच्या जिल्ह्यात फटका बसला यात अधिक आनंद मानणाऱ्या नेत्यांची मोठी संख्या आजही काँग्रेसमध्ये आहे. ‘मी नांदेड राखलं, मी अमरावती राखलं, मी चंद्रपूर जिंकलं असं सांगणारे आहेत; पण आम्ही महाराष्ट्र राखला’ असं सांगणाऱ्या आणि त्यासाठीचा अधिकार असलेल्या नेत्यांची कमतरता ही काँग्रेसची डोकेदुखी आहे. ‘मोदींना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’, असं आधी म्हणायचं नंतर सारवासारव करत मी गावगुंड असलेल्या मोदींबाबत बोललो म्हणायचं, असं केल्यानं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत:चं उगाच हसं करून घेतलं. काँग्रेसच्या इतर नेत्यांना ते बरंच वाटलं असणार. पटोलेंचं अध्यक्षपद जावं यासाठी टपून बसलेल्यांना पटोलेच कधी कधी बळ देतात. (त्यांच्या वक्तव्याच्या गदारोळात भंडाऱ्यातील यश झाकोळलं.)

राष्ट्रवादीचं तसं नाही, पक्षाबाबत राज्याचा एकत्रित विचार करून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे रिमोट कंट्रोल पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांना उत्तरदायी करत त्यांच्याकडून कामं करवून घेतात. पक्षविस्तारासाठी साम, दाम, दंड, भेद वापरतात. पक्षानं तुम्हाला पदं दिली, तुम्ही पक्षाला किती आणि काय देता याचा हिशेब विचारणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. सत्तेचा उपयोग पक्षासाठी करवून घेणारी सिस्टीम आहे. त्यामानाने शिवसेनेत एक-दोन मंत्र्यांवरच सगळा भार येऊन पडतो. सगळे जबाबदारी घेताना दिसत नाहीत. एकटे एकनाथ शिंदे कुठेकुठे पुरणार?  बहुतेक मंत्री लवकर भेटत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीमुळे फारसे उपलब्ध होत नाहीत. आमदार, जिल्हाप्रमुखांची कामं मार्गी लावण्यासाठीची यंत्रणा दिसत नाही. खालचा शिवसैनिक कडवा आहे; पण आपल्या गावात राष्ट्रवादीवाल्यांना बरोबर निधी मिळतो, असं तो पाहतो, तेव्हा त्याचं मन खट्टू होतच असणार. भाजपसोबत राहून इतकी वर्षे सडली, असं वाटणाऱ्या शिवसेनेला उद्या राष्ट्रवादीबाबतही तसंच वाटू नये एवढंच.

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 Why Shiv Sena gets less seats than ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.