मिशन ऑक्टोबर! निकाल लोकसभेचा... वेध विधानसभेचे!

By सचिन जवळकोटे | Published: June 2, 2019 10:42 AM2019-06-02T10:42:50+5:302019-06-02T10:58:54+5:30

लगाव बत्ती

Mission October! Take care of the sender. . They are not happy! | मिशन ऑक्टोबर! निकाल लोकसभेचा... वेध विधानसभेचे!

मिशन ऑक्टोबर! निकाल लोकसभेचा... वेध विधानसभेचे!

googlenewsNext

सचिन जवळकोटे

न दिसलेल्या मोदी लाटेच्या धक्क्यातून अद्याप ‘हातातलं घड्याळ’ सावरलेलं नसलं तरी गटबाजीच्या राड्यात उमललेल्या ‘कमळा’ला वेध लागलेत दिवाळीचे. लोकसभेच्या पदरमोड खर्चाची अन् मिळालेल्या मतांची आकडेमोड करण्यातच दोन्ही ‘शिंदेशाही’ व्यस्त असताना मुंबईचे ‘देवेंद्रपंत’ लागलेत जिल्ह्यात ‘मिशन आॅक्टोबर’ राबवायला. कोल्हापूरचे ‘चंदूदादा’ निघालेत विधानसभेलाही चमत्कार घडवायला.


जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपावेतो ‘भगव्या उपरण्याच्याच गवगवा’ अधिक होता. गावोगावी शाखा असलेल्या ‘सेनेत’ जेवढे गट होते, तेवढे कार्यकर्तेही कधीकाळी ‘भाजप’वाल्यांकडे नव्हते; मात्र यंदाच्या लोकसभेत ‘बाय वन-गेट वन’ची स्कीममध्ये सोलापूरसोबतमाढाही त्यांनी काबीज केलेलं. त्यामुळं ‘हाफचड्डी’वाल्यांच्या आकांक्षांना फुटलेत भलतेच घुमारे. जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी ‘संघ दक्ष’. आॅलरेडी ‘विजूमालकां’चं उत्तर अन् ‘सुभाषबापूं’चं दक्षिण त्यांच्याच ताब्यात. जुन्या कराराप्रमाणे अक्कलकोट अन् माळशिरसमध्येही त्यांचंच बुकींग. चार ‘कमळ’वाल्यांना तर सात ‘धनुष्यबाण’वाल्यांना अशी वाटणी २००९ साली झाली असली तरी २०१४ च्या फाटाफुटीनं सारीच समीकरणं बदललेली. त्यामुळे यंदा चारऐवजी सहा ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यासाठी ते मागतील सात जागा; म्हणजे तडजोडीत मिळतील किमान सहा तरी. ‘माढा, बार्शी, मोहोळ अन् पंढरपूर’वर ‘देवेंद्रपंतां’ची बारीक नजर.. लगाव बत्ती.

पंढरपूर : एक घाट.. चार पंत !

चंद्रभागेच्या घाटावर ‘कमळ’ फुलण्याचे चान्सेस अधिक, असं तब्बल चार पंतांना (मुंबईतले एक अन् परिचारक वाड्यातले तीन) वाटत असलं तरी छानऽऽछानऽऽ पत्रकबाजीतच रमलेल्या ‘शैलातार्इं’ना थोडंच रुचणार ? कारण जिल्ह्यात ख-या अर्थानं सैनिकांना बळ मिळालं होतं पंढरीतच. त्यात पुन्हा इथला विठुराया म्हणजे ‘उद्धों’च्या फोटोग्राफीचा आवडीचा विषय. पहावा विठ्ठलऽऽ टिपावा विठ्ठलऽऽ; परंतु  ‘विठ्ठल’ कारखान्याचे ‘भारतनाना’ काही कुणाच्याच हाती लागेना. ‘नानां’ची दाढी जेवढी टोकदार, तेवढीच त्यांची टोपीही बाकदार. मात्र, ‘पंतां’चं ‘कल्याण’ करण्यातच ‘समाधान’ मानणारे रोज नव-नवे गट या पट्ट्यात ‘कमळ’ हुंगू लागले तर ‘बाण’ कसं ठरू शकतं धारदार ? .. लगाव बत्ती.

मोहोळ : नेत्यांच्या सुपुत्रांची सवय झालेलीच..

कदमांच्या लाडक्या लेकी यात्रा अन् श्रमदानात भलेही पुण्याईचं काम करत असल्या तरी त्यांच्या पिताश्रीला बाहेरची मोकळी हवा मिळण्याची शक्यता निवडणुकीपर्यंत तरी नसावीच. त्यामुळे हुरुपलेल्या ‘लक्ष्मणरावां’ची जीभ लोकसभेत तळपलेली. नेहमीप्रमाणे थोडीफार घसरलेलीही, हा भाग वेगळा. ‘बनसोडेंचे शरद’ही आता ‘मोहोळ’चं स्वप्न बघत सोलापूर-मुंबई हेलपाटे मारू लागलेत; परंतु या ठिकाणी कुणाच्या हातात घड्याळ बांधायचं, हा निर्णय सर्वस्वी ‘अनगरकरां’च्या हाती !


‘नक्षत्र’ प्रकरणात ‘मालकां’च्या एकवीस खोक्यांचं होणारं नुकसान थांबविलं म्हणून आजकाल बनसोडे अन् पाटलांमध्ये भलताच राजकीय जिव्हाळा उतू चाललेला; कारण ‘राजन मालक’ म्हणे भलतेच प्रोफेशनल. त्यांना पेट्या-बिट्यांची नव्हे, तर थेट खोक्यांचीच भाषा कळते. ‘सुशीलकुमारां’ना या तालुक्यातून लीड देण्यात त्यांचा नेमका किती ‘वाटा’ होता, हे बाहेर आलं नसलं तरी त्यांचा होल्ड साºयांनीच मान्य केलेला. म्हणूनच की काय ‘गौतमशेठ’ नामक उद्योजकाच्या घरातलं लग्न त्यांच्यासाठी म्हणे तास-दोन तास खोळंबलेलं. वाटल्यास पोखरापूरकरांना विचारा.
आता हे कमी पडलं की काय म्हणून केगावचे ‘विष्णू’ पैलवानही बारामतीचं तेल लावून मोहोळच्या मैदानात उतरू लागलेले. ‘पवारांचे राजेंद्रदादा’ हे त्यांचे वस्ताद. त्यामुळं हे ‘पैलवान’ मोहोळच्या प्रचारातही सवयीप्रमाणं आपल्या इवल्याशा लाडक्या लेकराला सोबत घेऊन फिरू लागले तर आश्चर्य नको. नाहीतरी मोहोळ तालुक्याला नेत्यांच्या सुपुत्रांची सवय झालेलीच.. लगाव बत्ती.

माढा : भाऊबंदकीचा भडका 

‘शिंदेशाही संपवायची तर मुळापासूनच...वरवरची नायऽऽ’ अशी प्रतिज्ञा केलेल्या ‘थोरले दादा अकलूजकरां’कडं असतील माढा विधानसभेची सूत्रं. ‘बबनदादां’च्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा, यावर पंतांसह सा-यांचीच भूमिका ठाम असली तरी यंदा ‘बबनदादा’ उभारणार की सुपुत्र ‘रणजितसिंह’ हेच अद्याप गुलदस्त्यातच. ‘दादां’नी आता केबीनमध्ये बसून निवांतपणे कारखाने सांभाळावेत. उगाच उन्हा-तान्हात फिरून दगदग करू नये, असा मतप्रवाह तरुण वर्गात; मात्र ‘रणजितसिंह’ हे त्यांच्या काकांना (म्हणजे मामांना!) चालतील का, हाही गूढ प्रश्न. नुकताच पेट्रोल पंपावर उडालेला भाऊबंदकीचा भडका अजूनही लोकांमध्ये चर्चेचा ठरलेला. लक्ष्मी एखाद्या घराण्याला जशी वर नेते, तशीच तिच्या पाठोपाठ येणारी अवदसाही म्हणे द्वेष उफाळून आणते, याचा प्रत्यय राजकारणात आलेला. असो. अजून ब-याच गंमती-जंमती सांगण्यासारख्या; मात्र एकाच भागात सा-या ओपन झाल्या तर पुढच्या ‘लगाव बत्ती’ला मजा येणार कशी ?

बार्शी : कमळाला हवं पाणी..

‘उतावळा नवरा...गुडघ्याला बाशिंग’ अन् ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशा कैक म्हणी लोकसभा निवडणुकीच्या काळात बार्शीत लयऽऽ चर्चिल्या गेल्या. स्वत:चा मतदारसंघ सोडून माढ्यात ‘फलटणकरां’च्या प्रचारासाठी गावोगावी फिरणा-या ‘राजाभाऊं’च्या कानावर या म्हणी पडल्या की नाही, माहीत नाही...परंतु इकडं संजयमामा अन् तिकडं राणा पडल्यानंतर त्यांचे सारे विरोधक चिडीचूप जाहले. मात्र ‘ओमराजें’च्या विजयात ‘रौतां’चा वाटा किती, हा भाग उस्मानाबादकरांसाठी संशोधनाचा असला तरी ‘देवेंद्रपंतां’च्या अति महत्त्वाच्या खूपऽऽ खूऽऽप विश्वासू कप्प्यात म्हणे त्यांचा शिरकाव झालेला. त्यामुळं बार्शीकरांना आगामी निवडणुकीत ‘ईव्हीएम’वर ‘बाणा’ऐवजी ‘कमळ’ दिसलं तर नवल वाटायला नको; परंतु ‘कमळ’ फुलायला लागतो चिखल. त्यासाठी हवं असतं पाणी...पण इथं तर बार्शीकरांना आठ-आठ दिवस मिळेना की घोटभर पाणी. त्यामुळंच धारदार बनत चाललीय ‘दिलीपरावां’ची वाणी.. लगाव बत्ती.

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Mission October! Take care of the sender. . They are not happy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.