इतिहासात जाऊन ‘काय’ वेचून आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:42 AM2021-10-20T05:42:31+5:302021-10-20T05:43:11+5:30

सावरकरांची ब्रिटिशांच्या विरोधातली धैर्यशीलता असामान्य खरीच, पण हिंदू राष्ट्रनिर्मितीचा त्यांचा आग्रह मात्र वर्तमानात धोकादायक!

Mahatma Gandhi asked Savarkar to file mercy petitions what will we take from history | इतिहासात जाऊन ‘काय’ वेचून आणणार?

इतिहासात जाऊन ‘काय’ वेचून आणणार?

Next

- पवन वर्मा, राजकीय विषयाचे विश्लेषक

इतिहासाकडे पश्चातबुद्धीने पाहणे केव्हाही उचित नाही. कारण जो तसे पाहतो त्याला सोयीचे तेवढेच उचलून घेण्याची मुभा मिळते. तुम्ही ब्रिटिशांची माफी मागा, असे  महात्मा गांधी यांनी वीर सावरकरांना सांगितले होते का, असा प्रश्न उपस्थित करून निर्माण करण्यात आलेल्या वादामुळे मला हे आठवले. सावरकरांनी माफीची याचना केली, हे खरे होते. त्यांच्या खटल्याची स्थिती लक्षात घेऊन गांधींनी त्यांना तसे सुचवले, हेही वास्तव होय. या दोन भिन्न; पण वास्तव बाबी एकत्र आणणे हा मात्र शुद्ध खोडसाळपणा होतो.

पहिल्यांदा सावरकरांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. त्यांची देशभक्ती अर्थातच वादातीत होती. ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झालेला पाहणे हा त्यांचा ध्यास होता. त्याची फारच मोठी किंमत त्यांनी मोजली. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकरच होते. २० व्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी गेले असता सशस्त्र क्रांतीच्या संग्रामात ते उतरले. या कारणाने त्यांना अटक करून भारतात पाठवण्यात आले. वाटेत त्यांना घेऊन येणारे जहाज मार्सेलिस बंदरात थांबले असता, सावरकरांनी धाडसाने बोटीतून उडी मारली. त्यांचा हा प्रयत्न फसला आणि त्यांना अटक झाली. पुढे त्यांची रवानगी अंदमानात करण्यात आली. केवळ गांधीजी नव्हेत; तर सरदार पटेल आणि बाळ गंगाधर टिळक यांनीही सावरकरांच्या सुटकेसाठी ब्रिटिशांकडे प्रयत्न केले होते. सावरकरांनी स्वत:ही तसे प्रयत्न चालवले होतेच. त्या काळात कैद्यांना तसे करण्याची मुभा असायची आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी जे केले तेच सावरकरांनी केले. या विनंतीमुळे त्यांच्या देशभक्तीला कोठे खोट येते, असे मानण्याचे काही कारण नाही. एकतर त्यावेळी कॉंग्रेस ब्रिटिशांना देशाबाहेर काढण्याच्या मागे नव्हती. ब्रिटिश आमदानीतच अधिक स्वायत्तता मिळावी, असा पक्षाचा प्रयत्न होता. सावरकरांच्या स्मृत्यर्थ इंदिरा गांधी यांनी १९७० मध्ये टपाल तिकिटाचे प्रकाशन केले, हेही अनेकांना आठवत असेल.



२००२ साली भाजपा सत्तेवर आल्यावर अंदमानातील विमानतळाला सावरकरांचे नाव देण्यात आले. २००३ साली संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. भारताचे अंगभूत बहुविधत्व आणि सर्वसमावेशकता यावर विश्वास असणाऱ्यांनी मात्र स्वाभाविकपणे सावरकरांना लक्ष्य केले. १९२३ साली सावरकरांचे ‘इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी मांडलेल्या विचारांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण गरजेचे आहे. पुरातन काळापासून हिंदू ही संज्ञा वापरात आहे. या त्यांच्या म्हणण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. या शब्दाशी एक संस्कृती जोडलेली आहे. अंतर्गत वैविध्य असूनही ती एकसंघ आहे. अनेक जातीपाती असूनही तिच्यात वैचारिक एकता आहे. एका ठराविक भूभागावर ही संस्कृती नांदली. प्राचीन काळी त्याला भारत वर्ष म्हटले गेले. हिंद स्वराज हे गांधींचे पुस्तक वाचले तर असे लक्षात येईल, की त्यांनीही हेच म्हटले आहे.



पुढे “ज्यांची ही पितृभूमी आहे, ज्यांचे पूर्वज इथले होते, ज्यांची ही पवित्र भूमी आहे, त्यांनाच येथे राहण्याचा अधिकार आहे”, अशीही भूमिका सावरकरांनी घेतली. धर्मांतरित मुस्लीम किंवा ख्रिश्चन हे भारतीय असू शकतात;  पण त्यांची  पवित्र भूमी ही नाही, कारण त्यांच्या धार्मिक निष्ठा या भूमीशी बांधलेल्या नाहीत. म्हणून त्यांना येथे राहू देऊ नये. त्यांच्या निष्ठा मक्का किंवा व्हॅटीकनला वाहिलेल्या आहेत - या जातीय भूमिकेचे समर्थन होऊ शकत नाही; पण चिंतेची बाब अशी, की भाजपा आणि रास्व संघ सावरकरांच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून चालले. त्यावरच त्यांची श्रद्धा राहिली. ती भूमिका सबळपणे उभी करण्यासाठी त्यांनी त्यावर अनेक तात्विक मुलामे चढवले. सावरकरांच्या विचारप्रणालीचा पहिला दृश्य परिणाम म्हणजे १९२५ साली झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म. दीर्घकाळ सरसंघचालक राहिलेल्या माधव सदाशिव गोळवलकर यांनी सावरकरांचा विचार आणखी पुढे नेला. ते लिहितात.‘आम्ही आणि आमचे भारतीयत्व सुनिश्चित आहे. हिंदुस्थानातील बिगर हिंदू लोकांनी एकतर हिंदू धर्म, संस्कृती, भाषा स्वीकारावी, हिंदू धर्माचा आदर करायला शिकावे, त्याचाच उदो उदो करावा...त्यांनी परकेपणाने राहू नये. राहायचे तर हिंदुना श्रेष्ठत्व देऊन राहावे, दुय्यम स्थान घ्यावे, कशावर दावा सांगू नये, विशेष हक्क अगदी नागरिकत्वाचा अधिकारही मागू नये!”

- भारतासारख्या देशात जेथे हिंदू बहुसंख्येने असले तरी इतर धर्मीयही बऱ्यापैकी आहेत,  तेथे बाहेरच्यांनी येथे राहू नये,  हे सांगणारे सावरकरांचे विचार चिंताजनक आहेत. विशेषत: सावरकर आणि संघाचे सिद्धांत विद्यमान सरकार फेटाळत नाही किंवा हिंदू राष्ट्राची कल्पना मान्य नाही, असे जाहीर करत नाही, त्यामुळे चिंतेत भरच पडते. आजच्या भारतात हे उद्दिष्ट किती अव्यवहार्य, गैरलागू आहे, हे भाजपा समजूनही घेऊ शकत नाही, हे अधिक गंभीर आहे. इथले रहिवासी असोत वा नसोत, अन्य धर्मियांचा आदर करणारी, समावेशक घटना स्वीकारली जाऊन आता ७० वर्षे झाली आहेत, तरी भाजपच्या डोक्यात हे शिरत नाही. हिंदू राष्ट्र निर्माण करायचे तर संख्येने मोठ्या असणाऱ्या अल्पसंख्यांकांना बाहेर घालवावे लागेल. हे अशक्य आहे, त्यांना दुय्यम दर्जाचे ठरवून अवमानित करणारे आहे. त्यातून अनर्थच ओढवेल. यातून घटनेची चिरफाड तर होईलच शिवाय सामाजिक,धार्मिक असंतोष निर्माण होईल. शांतता, सलोखा बिघडेल आणि परिणामी प्रगती खुंटेल.

सावरकरांचे विचार यासंदर्भात तपासले पाहिजेत. त्यांचा हिंदू राष्ट्र सिद्धांत म्हणूनच जोरदारपणे फेटाळला पाहिजे. ब्रिटिशांची माफी मागण्यावरून त्यांची टिंगल करून हे कसे साध्य होऊ शकेल? सावरकर ब्रिटिशांसमोर  निर्भयपणे उभे राहिले होते. त्या निर्भयतेची जबर किंमत त्यांनी मोजलेली आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी इतरांचा राग धरायला शिकवणारे जे विचार मांडले ते हानिकारक आहेत. गांधीजींनी सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी धैर्यशीलतेचे कौतुक केले असते; पण हिंदू राष्ट्र निर्मितीच्या कल्पनेचा खरपूस समाचारही घेतला असता.  सावरकरांचे इतिहासातील नेमके स्थान हेच आहे.

Web Title: Mahatma Gandhi asked Savarkar to file mercy petitions what will we take from history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.