...हे कसे विसरता यावे ?

By किरण अग्रवाल | Published: May 23, 2019 09:06 AM2019-05-23T09:06:06+5:302019-05-23T09:06:42+5:30

आज याच निवडणुकीचा निकाल येऊ घातला आहे, जो जनता जनार्दनाचा विश्वास तर व्यक्त करणारा असेलच; शिवाय देशाच्या यापुढील वाटचालीची दिशा काय असेल हे दर्शवून देणाराही ठरेल.

How can I forget this? | ...हे कसे विसरता यावे ?

...हे कसे विसरता यावे ?

Next

किरण अग्रवाल

लोकशाहीच्या उत्सवाची भैरवी ज्याला म्हणता यावे, ती मतमोजणी आज होत असल्याने संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेस पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सत्तेचा हा कौल असल्याने त्याकडे जगभराचे लक्ष लागून असणेही स्वाभाविक आहे. विविधतेत एकता व सर्वसमावेशकता जपून असलेल्या आपल्या देशाच्या या वैभवाला सुदृढ व संपन्नतेचा साज चढविला आहे तो या लोकशाही प्रक्रियेने, म्हणूनच देशाच्या सर्वोच्च सदनात जाऊन निर्णयकर्ते होण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे महत्त्व व मोल अनन्यसाधारण आहे. आज याच निवडणुकीचा निकाल येऊ घातला आहे, जो जनता जनार्दनाचा विश्वास तर व्यक्त करणारा असेलच; शिवाय देशाच्या यापुढील वाटचालीची दिशा काय असेल हे दर्शवून देणाराही ठरेल.

निवडणूक कोणतीही असो, त्यात एकमेकांसमोर उभे ठाकणारे किमान दोन पक्ष वा बाजू असतातच. त्यांच्यात प्रचाराच्या निमित्ताने परस्परांबद्दलच्या योग्य-अयोग्यतेचे रण माजते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात व अखेर मतदार आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून त्यात कोण योग्य, याचा मताधिकाराद्वारे फैसला करतात. ही संपूर्ण प्रक्रिया घडून गेल्यानंतर पुन्हा उभय पक्ष निवडणूक प्रचारकाळात झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून विकासासाठी हातात हात घालून लोकसेवेस लागतात. आजवर तसेच होत आले आहे व यापुढेही तेच होणे अपेक्षित आहे खरे; परंतु यंदाच्या या निवडणूक निकालानंतर होईल का तसे, याबद्दल शंकाच बाळगता यावी. कारण प्रश्न केवळ विकासाचा न राहता विचारांचाही बनून उभा ठाकतो तेव्हा प्रचारातील संघर्ष त्यापुढील वाटचालीतही टिकून राहण्याचीच शक्यता बळावते. मतभेद मिटवता येण्यासारखे असतात; मनभेद कसे दूर होणार? यासारखाच काहीसा हा प्रश्न आहे. पण सद्यस्थितीत तो अटळ ठरण्याचीच लक्षणे आहेत. यंदाची निवडणूक ज्या अहमहमिकेने लढली गेली व विजयासाठी ‘वाट्टेल ते’ या प्रकारात मोडणारा जो प्रचार केला गेलेला दिसून आला, त्यातून सदरचा प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित होणारा आहे. म्हणूनच निकालानंतर प्रचारकाळातील काय काय विसरता यावे, असा प्रश्नही अगदी स्वाभाविक ठरून गेला आहे.

सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या या निवडणुकीत यंदा सात टप्प्यात मतदान घेण्यात आले, ज्याकरिता तब्बल दोन महिने प्रक्रिया चालली व प्रचाराची रणधुमाळी उडाली. या रणधुमाळीत टोकाचे रण माजलेले दिसून आले. पंतप्रधानांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ म्हणण्यापासून ते ‘हिटलर’, ‘जल्लाद’, ‘दुर्याेधन’ आदी उपमा देण्यापर्यंत पातळी गाठली गेली. काँग्रेस अध्यक्षांची ‘पप्पू’ म्हणून अगोदरपासून खिल्ली उडवली जात होतीच, शिवाय  काही नेत्यांना ‘पाळीव कुत्रे’ म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. इतकेच नव्हे तर ‘नीच’सारखे शब्द वापरून शिव्या देण्यापर्यंतचीही हद्द गाठली गेली. इतक्या खालच्या स्तरावर प्रचाराची पातळी खालावलेली ही पहिलीच निवडणूक असावी. मतदारांमधील राष्ट्रवाद चेतवताना लष्करी कारवायांचे जसे भांडवल केले गेले, तसे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी दिवंगत नेत्यांवर आरोप करण्यातही कसर बाकी ठेवली गेली नाही. पक्ष राहिले बाजूला, व्यक्तिगत स्वरूपातच एकमेकांना जणू एखाद्या ‘दुष्मना’सारखे समजले गेले. अशा अतिशय टोकाच्या, हीन, असभ्य व व्यक्तिगत निंदा-नालस्तीच्या पातळीवर पोहोचलेल्या यंदाच्या प्रचारातले काय काय विसरता यावे, हा प्रश्न म्हणूनही महत्त्वाचा ठरणारा आहे.

निवडणुकीच्या प्रचार काळातले द्वंद विसरायला तशी निकोपता व पर-मताबद्दलच्या आदराची, सन्मानाची भावना असावी लागते; पण यंदा तीच पणास लागलेली दिसून आली. त्यामुळेच निवडणुकीचे निकाल काय लागतात हे पाहून कुणाला जेलमध्ये टाकण्याची, तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या राज्यातली सरकारे उलथवण्याचीही तयारी केली जात असल्याच्या वार्ता आहेत. हा खरे तर लोकशाहीचाच अनादर ठरावा; पण त्या टोकाला स्थिती पोहोचू पाहते आहे हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने फेसबुकवर अलीकडेच एक पोस्ट केली आहे, यात देशप्रेमाला नेताप्रेम केलेल्यांपासून सावध राहण्याची गरज प्रतिपादित करताना, ‘मतभेदाला गुन्हा किंवा अपमान मानण्याची मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते, म्हणून निवडणुकीत जे व्हायचे ते होईल; पण येणाऱ्या काळात समाजात द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे आहे’, असे म्हटले आहे. अतिशय स्पष्ट व परखड मुद्दा आहे हा. परंतु हेतुत:च जिथे असे केले गेलेले दिसते, तिथे लोकशाहीचा संकोच घडून येण्यापासून बचावणे कठीण ठरते. अर्थात, तरीही लोकशाहीच्या परिपक्वतेवर व प्रगल्भतेत विश्वास असल्याने, ‘झाले गेले ते गंगेला मिळो’ म्हणत भविष्यात चांगलेच घडून येण्याकरिता आशादायी राहूया.

Web Title: How can I forget this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.