लढा अन्यायाविरोधात हवा, निसर्गाविरोधात नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:44 AM2021-11-13T08:44:55+5:302021-11-16T15:18:45+5:30

आपल्यावर जे काही ‘आदळतं’ ते अटळ आहे असं समजून पचवायला हवं. सावरण्याचं बळ त्यातूनच कळत-नकळत येतं. ते अंगीभूत व व्यक्तिगत आहे.

The fight is against injustice, not against nature | लढा अन्यायाविरोधात हवा, निसर्गाविरोधात नव्हे!

लढा अन्यायाविरोधात हवा, निसर्गाविरोधात नव्हे!

Next

- चंद्रकांत काळे

गेली पन्नास वर्ष तुम्ही अभिनय, संगीत, सादरीकरणात प्रयोगशील आहात... मात्र ‘ऑनलाइन’ परवलीचा शब्द झाला तेव्हा काय करता आलं? 

जिवंत सादरीकरणाला पर्याय नाही याबद्दल मी आग्रहीच आहे. मला खरं तर, ती दुधाची तहानही वाटत नाही. ज्याचं सामर्थ्यच मुळी जिवंत सादरीकरणात आहे त्याला तुम्ही बाकीची कोंदणं लावली की, त्याचा फॉर्मच बदलतो. एखाद्याचं लाईव्ह गाणं ऐकणं, नाटक बघणं, अभिवाचन ऐकणं आणि तेच स्क्रीनवर बघणं यात माध्यमच बदलल्यामुळे प्रचंड फरक पडतो. तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळं प्रचंड बदल घडत आहेत हे खरंच आहे, बदल असाही आहे की, पूर्वी आपण अभिमानानं सांगायचो, माझ्याकडं अमुक गायकाचं इतकं कलेक्शन आहे वगैरे. आता यू ट्यूबवर असे दुर्मीळ साठे सहजच उपलब्ध होऊ लागल्यावर आपल्याकडची पुंजी अचानक अडगळच झाली नाही का?, ‘लाईव्ह’ची मजा अपलोड केलेल्या मैफिलीत येऊ शकत नाही. उगीच तुलना करण्यात अर्थ नाही. तरीही, कोविड काळातली नवीन पिढीची तडफड मी समजू शकतो.

मी इतक्या सलगपणे क्रिएटिव्ह काम करत आलोय की, एकदोन वर्षं गप्प राहाण्यानं माझं विशेष काही बिघडत नाही. सारखं करत राहावं हा माझा स्वभावही नव्हे. मात्र, अनुभवाने काही ‘प्रयोगां’मधला फोलपणा कळतो. काहींनी नाटकं, संगीत असे ऑनलाईन कार्यक्रम तिकिटं लावून केले. पहिल्या वर्षी नवेपणात जितके ते यशस्वी झाल्यासारखे वाटले तसं पुढच्या टप्प्यात घडलं नाही. अशी धाडसं मग, कमी होत गेली. शिवाय ‘ऑनलाइनमुळे आमचा कंटेंट जगभर उपलब्ध झाला’ याला काही विशेष अर्थ आहे असं मला वाटत नाही. जगाच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यात शंभरभर तिकिटं खपली तर, ‘जगभरपणा’चं गणित काय?, त्यामुळे लाईव्ह, थेट कार्यक्रम सुरू होतील तेव्हा लोक निर्भयपणे तेच पाहतील असा जिवंत सादरीकरणाबाबतीत माझा विश्वास आहे.

सक्तीच्या विलगीकरणात माणसांनी आपल्या भवतालाकडे बघायची नजर बदलली...

तसं त्या त्या काळात वाटतं आपल्याला, की, शेजाऱ्यांवरचं प्रेम व विश्वास वाढेल, लोकांना काटकसरीची सवय लागेल, निसर्गानं माणसाला कोविडच्या उद्रेकातून अशी चपराक दिलीय की, ते निसर्गाविषयी सजग होतील वगैरे वगैरे! माझ्या मते काहीही परिणाम उरणार नाही. कोरोनाविषयक बंधनं नाही पाळली तर, जीवावर बेतणार होतं, म्हणून लोकांचा नाईलाजच होता. त्या अडकलेपणातून लोकांनी सुचलं ते केलं. दिवाळीत सगळं खुलं झाल्यावर बाजारपेठा, मॉल्स, देवळं सगळीकडे तितकीच गर्दी होती. फार चांगल्या गोष्टी आपण फक्त कल्पनेत बघतो, प्रत्यक्षाशी त्याचा सुतराम संबंध नसतो असं मला अनुभवांती म्हणता येतं. तात्कालिक आदर्श भावना हे अळवावरचं पाणी.

एकावेळी अनेक गोष्टींत असायचं हे आजच्या पिढीचं जगणं. तुम्ही एकाग्रता कशी साधता? 

अनेक ठिकाणी असण्यानं मला सुचतच नाही, हा सवयीचा परिणाम आहे. पिढी बदलण्याचा काळ अडीच तीन वर्षाइतका कमी झाला आहे. त्यातून अलीकडच्या पिढीला कशातून काय मिळेल याचा अंदाज येणं कठीण झालं आहे. या झपाट्यात वाहून न जाणारे व स्वत:च्या मर्जीला जगणारे तरूण एखाद दोन टक्केच असतील. मध्ये एक मुलाखत पाहिली, त्यात तरूण गायिका म्हणत होती, ‘मी जे सादर केलं ते यापूर्वी कधीही केलं गेलेलं नाही. हा प्रयोग अनोखा आहे.’ अशा दाव्यांवर माझा भरवसा नाही. तुम्ही जे करता ते तुमच्या कलाकृतीतून, तुमच्या म्हणण्यातून, वागण्यातून, निवडीतून सिद्ध होऊ दे ना ! आमच्या पिढीला एकाग्रतेशिवाय पर्याय नव्हता. जे करायचं ते समोर आलं की त्यावरच एकचित्त व्हायचं, आपोआपच. इतक्या पर्यायांची उपलब्धताही नव्हती. आता सोयीप्रमाणे लोकांच्या एकाग्रतेला फांद्या फुटल्यात असं म्हणावं लागेल, पण, दुसऱ्या बाजूला मला वाटतं, त्यांच्या मुख्य कामात ते एकाग्र असतात व बाकीचं ‘चालसे’ असेल. 

अलीकडं गाण्यातले शब्द गायबच झाले आहेत...

अलीकडची फार गाणी ऐकली नाहीत. गाण्यांचे कार्यक्रम असतात तेव्हा अगदीच मोजके अपवाद वगळता लोक जुन्या गाण्यांचेच कार्यक्रम करत राहातात. नवं दिलं तर, लोक स्वीकारतात हा ‘शब्दवेध’च्या माध्यमातून तीस वर्षांचा आमचा अनुभव. गजानन वाटवेंसारखा माणूसही त्या काळात नव्या रचना सतत सादर करायचा. भावगाणी, देवगाणी.. अशा कुठल्या कुठल्या स्मरणरंजनात रमायला लोकांना फार आवडतं. किंवा मग, नवं करतोय म्हणून यूट्यूबसारख्या सोप्या झालेल्या माध्यमातून ‘करा व विसरा’ या खात्यात भर टाकत राहायची ! हे कलेनं जगणं नव्हे. हिट्स व फॉलोअर्स पलीकडे गंभीर कलाकार म्हणून त्यातून काही साध्य होत नाही.

खूप अस्वस्थता आली की कलेची सोबत वाटते?

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा दणका खूप परिचयाची, परिघातली जिवाभावाची माणसं घेऊन गेला. काही जण झगडून आजारातून उठलेही. सगळंच निराशाजनक नव्हतं. तरी हतबलता आलीच. येऊन जे आदळलं आहे ते अटळ आहे व गळून गेल्यासारखं झालं तरी पचवायला हवं. मला नाही वाटत की, अशावेळी कलेचा विचार करायची पातळी उरते ! जो तीव्र अनुभव मला आलेला असतो तो मला खात असतो व त्यातूनच सावरण्याचं बळ कळत-नकळत मी कमवत असतो. अंगावर येतंय त्याचं स्वरूप, पातळी, प्रमाण सगळ्याचा अंदाज बुद्धीनं घेण्याइतकं भान मला उरतं. त्रास सहन करणं व बाहेर पडणं हेच मला लागू पडतं. ते अंगीभूत व व्यक्तिगत आहे. कोविडमध्ये स्पर्श दुरावल्याचं स्तोम माजवलं गेलं... माझ्याबाबतीत म्हणाल तर, सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत किती स्पर्श असतात किंवा अनिवार्य असतात हेच मला कळलेलं नाही. ज्याला कारण असतं ते मी पटवून घेतलं तर, मला त्रास होत नाही. त्यामुळेच मग ‘नाही घालायचे दोन वर्ष गळ्यात गळे, शेकहँड नाही करायचा !’ हे पटतं. विषय संपला!, लढा अन्यायाविरोधात द्यायचा, निसर्गाविरोधात नव्हे ! 
शब्दांकन : सोनाली नवांगुळ

Web Title: The fight is against injustice, not against nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.