प्यार का झगडा फिफ्टी - फिफ्टी !

By सचिन जवळकोटे | Published: August 4, 2019 07:45 AM2019-08-04T07:45:12+5:302019-08-04T07:46:30+5:30

लगाव बत्ती..

FIFTY LOVE FIFTY - FIFTY! | प्यार का झगडा फिफ्टी - फिफ्टी !

प्यार का झगडा फिफ्टी - फिफ्टी !

Next

- सचिन जवळकोटे

सत्तेला जेव्हा धुमारे फुटतात, तेव्हा सुरू होते ‘फिफ्टी-फिफ्टी’ची भाषा. लगेच टवकारले जातात ‘आयाराम-गयारामां’चे तीक्ष्ण कान...कारण ‘युती’ मोडावी यासाठी अनेक बाहेरच्या मंडळींनी ठेवलेत देव पाण्यात. यदाकदाचित असं झालंच तर आपल्या जिल्ह्यात अकराच्या अकरा ठिकाणी होईल निकराचा सत्तासंघर्ष. कुठं ‘हातात धनुष्य’ तर कुठं ‘घड्याळ्याचं कमळ’ घेऊन उतरतील ‘आयाराम-गयाराम’च एकमेकांच्या विरोधात. याचा अर्थ एकच...आपसात युद्ध करतील ‘हात’ अन् ‘घड्याळ’वालेच...परंतु गळ्यात भगवं उपरणं घालून म्हणतील ‘प्यार का झगडा फिफ्टी-फिफ्टी’ !

...अन् अकलूजकर माढ्यात उभारले !

स्थळ : अरण. गावच्या यात्रेसाठी पंचक्रोशीतील अनेक नेत्यांसोबत ‘धाकले दादा अकलूजकर’ही इथं आलेले. गेल्या चार-पाच वर्षांत ते कधी इथल्या यात्रेला उपस्थित राहिल्याचं ऐकिवात नाही. आता यंदाच का ते आले, याचा शोध घेताना माढ्यातल्या कैक कार्यकर्त्यांचं डोकं भणभणलंय.. कारण अकलूजच्या पिता-पुत्रांची वर्दळ माढा पट्ट्यात वाढलीय, हे सा-यांनाच जाणवलंय. असो. एका पत्रकाराच्या घरी हे ‘रणजितदादा’ अन् ‘भारतआबा’ गप्पा मारत बसलेले असतानाच बाहेर ‘बबनदादां’ची गाडी आली. ‘आतमध्ये अकलूजचे दादा हायतीऽऽ तुमीबी येताव का चहाला ?’ असं विचारलं असता, तेही लगेच त्या घरी प्रवेशले. ‘बबनदादा’ आत येताच ‘रणजितदादा’ तत्काळ उठून उभारले. ते समोर स्थानापन्न झाल्यानंतरच स्वत:ही खुर्चीवर बसले. चहा-पाणी झाल्यानंतर बाहेर पडतानाही ‘रणजितदादां’नी मोठ्या आदरानं अगोदर ‘बबनदादां’ना जाऊ दिलं. म्हटलं तर ही गोष्ट खूप साधी. छोटी...म्हटलं तर खूप वेगळी. मोठी...‘अकलूजकरां’नी वडीलधा-यांबद्दल दाखविलेला हा आदर होता की झपाट्यानं बदलणाºया राजकीय समीकरणांचा ‘सॉफ्टकॉर्नर’ परिपाक होता, हे या दोघांनाच ठावूक. बाकी ‘धाकले दादा अकलूजकरांचा हा बदललेला अ‍ॅटिट्यूड म्हणे अलीकडं सगळ्यांनाच भावू लागलाय. ‘समोरच्याला वेळ देणं अन् त्यांच्याशी आपुलकीनं बोलणं’ पाहून त्यांच्यातली ‘राजकीय प्रगल्भता’ स्पष्टपणे जाणवू लागलीय. कृपया गैरसमज नसावा. ही चर्चा आपण ‘रणजितदादां’बद्दल करतोय. ‘रणजितभैय्यां’बद्दल नव्हे...लगाव बत्ती...

अकरापैकी सहा जागा कमळाला..

‘सध्याचे विद्यमान आमदार सोडून उरलेल्या जागांवर फिफ्टी-फिफ्टी ’चा बॉम्ब काल ‘चंद्रकांतदादां’नी फोडलाय. असं झालं तर जिल्ह्यात राडाच की राव. अकरापैकी ‘विजूमालक’ अन् ‘सुभाषबापू’ कमळाचे तर ‘नारायणआबा’ धनुष्यबाणाचे आमदार. अकरापैकी तीन जागांचा विषय पहिल्याच फटक्यात संपला. बाकी आठ जागांपैकी निम्म्या म्हणजे चार ठिकाणी ‘चंदूदादां’चा दावा; पण यातल्या पाच जागा तर ‘तानाजीरावां’नी आमच्याच म्हणून जाहीर केलेल्या. बघूया आता कोण भारी ठरतंय ते... कमळाचे निष्ठावंत की सेनेचे सावंत !

मालक..लक..अनलक !

‘शहर उत्तर’चे मालक अलीकडं भलतेच दिलदार झाल्याचं कार्यकर्त्यांना वाटू लागलंय. श्रावणात पूजापाठेत रमणारे ‘विजूमालक’ आषाढात मात्र गल्लोगल्ली जेवणावळी देण्यात म्हणे रंगले होते. पंगती उठविण्यात दंगले होते. ‘मालकांच्या विरोधात कुणीही उभारलं तरी फरक पडत नाही’ अशी दर्पोक्ती करणाºया कोळींच्या संजूनाही प्रश्न पडलाय की, ‘आपले मालक कधी नव्हे ते इतका खर्च का करू लागलेत..दिल्ली-मुंबईत सत्ता अन् घरात पालकमंत्रीपद. तरीही ‘विजूमालकां’नी एवढी सावधगिरी कशासाठी बाळगलीय ?’


...याचं उत्तर मिळू शकेल केवळ उत्तर कसब्यातच. कारण मालकांना मोठं केलं याच कसब्यानं, हे त्यांना ठावूक...अन् आता त्यांच्या विरोधात दमदार प्रतिस्पर्धी उभा केला जाऊ शकतो याच कसब्यातून, हेही त्यांना पुरतं कळून चुकलंय. कारण विजूमालकांच्या विरोधात ‘थोबडेंचे मिलिंद मालक, काडादींचे राजूमालक अन् पाटलांचे उदयमालक’ यांच्यापैकी एकाला मैदानात उतरविण्याची खेळी सुरू झालीय अत्यंत पद्धतशीरपणे... आता बघूया... कुणाचं लक...कुणाचं अनलक...व्हय नां मालक ?
   
   इकडं ‘दक्षिण’मध्येही ‘दिलीप मालक’ पुन्हा एकदा बाह्या सरसावून कामाला लागलेत. ‘तार्इं’चं स्थलांतर ‘मोहोळ’मध्ये शक्य नसल्याचं दिसल्यानं त्यांनी सुवर्ण‘मध्य’ साधण्याचा प्रयत्न सोडला अन् पुन्हा एकदा ‘दक्षिण’स्वारीची दिशा पकडली. मात्र ‘मध्य’च्या धनुष्यासाठी मालकांनी बरेच प्रयत्न केलेले. मुंबईत ‘मातोश्री’वर येणं-जाणं असलेल्या एका ‘मालिश’काराशीही म्हणे जवळीक साधलेली. मात्र त्यानंही नुसतं ‘बघूऽऽ करूऽऽ’चं तेल लावल्यानं मालकांनी सोडला नाद...अन् ‘दक्षिण’च्या ‘दूध भुकटी’त घातलाय हात. ‘बापूं’ना सळो की पिळो करत सोडण्यासाठी. लगाव बत्ती..

निष्ठावंतांची डरकाळी गुलू गुलू जाहली..

गेल्या आठवड्यात अक्कलकोटमधल्या कैक निष्ठावंतांना अकस्मातपणे कमळाच्या भवितव्याचा कळवळा आला. ‘आपल्यापेक्षाही जास्त सिद्रामप्पा अन् सचिनदादा कसे गद्दार,’ याचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी निष्ठावंतांचा मेळावाही आयोजित केलेला. योगायोगानं याचवेळी पार्टीच्या शक्ती केंद्रप्रमुखांचाही बुथ मेळावा घेतला गेलेला. बाहेरून आलेल्या नेत्यांच्या कानावर ‘निष्ठावंतांच्या बंडाची कहाणी’ टाकण्याचं काम मार्डीच्या ‘शहाजीं’नी ईमानेइतबारे केलं. (त्यांचं इमान फक्त ‘सुभाष बापूं’पुरतंच असतं, हा भाग वेगळा. त्यावर चर्चा नंतर कधीतरी)..मग काय...वरच्या नेत्यांनी अक्कलकोटचा कार्यक्रमच रद्द करण्याची स्पष्ट ताकीद दिली. मात्र याची पूर्ण तयारी झालेली. गाजावाजाही झालेला, त्यामुळं ‘रद्द करण्या’ऐवजी ‘निष्ठावंत’ शब्द न वापरण्याचा मधला पर्याय स्वीकारला गेला. हुश्शऽऽ अखेर मेळावा झाला. मोरेंचे बाळू सोडले तर सा-यांचीच भाषणं ‘गुलूऽऽ गुलूऽऽ’ झाली. ‘बापूं’च्या खेळीनं पालकमंत्री गटाची बत्ती ‘गूल’ झाली. लगाव बत्ती..

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: FIFTY LOVE FIFTY - FIFTY!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.