गांधीयुगाच्या प्रारंभाचे स्मरण; इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 06:27 AM2020-12-26T06:27:24+5:302020-12-26T06:27:47+5:30

Editorial : जुलमी ब्रिटिश राजवटीला एकेक हादरा बसत गेला. अठ्ठावीस वर्षांनंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. भारतातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा सुवर्णबिंदू, असे नागपूर काँग्रेसचे वर्णन करता येईल.

Commemoration of the beginning of the Gandhi era; Moments in history also bring something to tell | गांधीयुगाच्या प्रारंभाचे स्मरण; इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येतात

गांधीयुगाच्या प्रारंभाचे स्मरण; इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येतात

googlenewsNext

कोरोना संकटामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला हलवले गेले नसते, तर एव्हाना नागपूरच्या बहुचर्चित थंडीत हुरडा पार्टी नावाचे ते अधिवेशन आटोपलेही असते आणि कोणी सांगावे १९२० मधील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीलाही उजाळा मिळाला असता. अनेक कारणांनी हा उजाळा गरजेचा आहे. एकतर या शताब्दीचा संबंध केवळ काँग्रेस पक्षाशी नाही. कारण, पाच वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होईपर्यंत, हिंदू महासभेने स्वतंत्र राजकीय चूल मांडेपर्यंत आणि मुस्लीम लीगने १९३७ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सवता सुभा तयार करेपर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक, राजकीय, सामाजिक विचारांच्या मंडळींनी एकत्र येण्याचे, देशाच्या भल्याचा विचार करण्याचे सामाईक व्यासपीठ होते. किंबहुना सवत्या सुभ्याची बीजेही नागपूरमध्येच रोवली गेली, असे म्हणता येईल. इथेच हिंसा व अहिंसेच्या स्वतंत्र वाटा आखल्या गेल्या. अहिंसक असहकार आंदोलनाची खिल्ली उडवण्याची सुरुवात या अधिवेशनातच झाली होती. तरीही लाठ्याकाठ्या खाण्यासाठी लाखो नि:शस्त्र रस्त्यावर आले.

जुलमी ब्रिटिश राजवटीला एकेक हादरा बसत गेला. अठ्ठावीस वर्षांनंतर स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला.  भारतातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा सुवर्णबिंदू, असे नागपूर काँग्रेसचे वर्णन करता येईल. आधीच्या दहा-बारा वर्षांमध्ये फाटाफुटीमुळे विदीर्ण झालेल्या काँग्रेसचे ऐक्य इथे दिसले. जालियनवाला बाग नरसंहार आणि तुर्कस्थानशी संबंधित खिलाफत चळवळीमुळे असंतोषाने धुमसत असलेला ब्रिटिश इंडिया असहकार आंदोलनाच्या रूपाने आक्रमक वळणावर येऊन उभा राहिला होता. मर्यादित राजकीय हक्कांसाठी स्थापन झालेल्या काँग्रेसचे अंतिम ध्येय ‘स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य’च असेल, हे येथेच अधोरेखित झाले. बॅरिस्टर, वकील, डॉक्टर, रायबहादूर व मालगुजारांची काँग्रेस हे  सामान्य देशवासीयांचे हक्काचे व्यासपीठ बनावे यासाठी चार आण्याचे स्वस्त सदस्यत्व नागपूरमधून सुरू झाले. महत्त्वाचे म्हणजे पुढे संपूर्ण जगाला मोहिनी घालणारे सहस्रकाचे जननायक महात्मा गांधी यांच्या युगाचा प्रारंभ नागपूरमधूनच झाला.

सेवाग्राम आश्रमामुळे हाच परिसर त्यांची कर्मभूमी बनला. चार महिने आधी राष्ट्रीय नेते लोकमान्य टिळक यांचे निधन झाल्याने हा युगप्रारंभ वरवर अपघाती वाटणारा असला तरी पाच वर्षांआधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले मोहनदास करमचंद गांधी दरम्यान महात्मा बनले होते, हे विसरून चालणार नाही. हिंदू महासभेचे नेते डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्यापासून झाडून सगळे आयोजक टिळकपंथी आणि पंधरा हजारांच्या आसपास प्रतिनिधींवर मात्र महात्मा गांधींची मोहिनी, असे चित्र विसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाच्या अखेरच्या आठवड्यात नागपूरमध्ये होते. सन्माननीय अपवाद एकच, गांधींनी ज्यांना पाचवे पुत्र मानले ते उद्योजक सेठ जमनालाल बजाज यांचे स्वागताध्यक्षपद. केवळ गांधीयुगाचा प्रारंभ म्हणूनच नागपूर अधिवेशनाचे स्मरण करायला हवे, असे नाही. शंभर वर्षे उलटली तरी स्थिती फार बदललेली नाही. विशेषत: धार्मिक सौहार्द, सहिष्णुता, सर्वधर्मसमभावाची गरज, धार्मिक कट्टरता, हिंसा, त्यातून मागे पडणारे दुबळ्या वर्गाचे जगण्यामरण्याचे प्रश्न आदी तेव्हाच्या व आताच्या स्थितीत काही मूलभूत बदल झाला असे नाही.

तेव्हा ब्रिटिशांची फोडा व राज्य करा, ही नीती कारणीभूत होती, तर आता आम्ही स्वत:च धार्मिक पायावर देश दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरलो आहोत. एक विचित्र विषारी वातावरण सगळीकडे पसरले आहे. प्रामुख्याने हिंदू व मुस्लीम हे धर्म कट्टरतावाद्यांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. मध्यममार्गी, मवाळ भूमिका घेणाऱ्यांची, सहिष्णुता व सर्वधर्मसमभाव जपणाऱ्यांची प्रचंड कुचंबणा सुरू आहे. परिणाम म्हणून सामान्य माणसाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न मागे पडले आहेत. कष्टकरी, शेतकरी, कामगार, अशा दुबळ्या समाजघटकांच्या वेदना ऐकून घेण्यामध्येही राजकारण सुरू आहे. संसदेत प्रचंड बहुमत असलेले सत्ताधारी आणि कमजोर विरोधक जणू एकमेकांचे शत्रू बनले आहेत. विरोधी सूर ऐकून घ्यायला सत्ताधारी तयार नाहीत. राजकीय धोरणे, निर्णयाचा विरोध देशद्रोह ठरवला जात आहे. विरोधकांच्या मागे तपासयंत्रणांचा ससेमिरा लावला जात आहे. सुडाची भावना इतकी टोकाला पोहोचली आहे की या संघर्षाला विचारधारांची लढाईदेखील म्हणता येत नाही. तेव्हा लक्षात ठेवायला हवे की, इतिहासातील क्षणही काही सांगावा घेऊन येत असतात. भविष्याचे संकेत देतात. काय स्वीकारायचे व काय नाकारायचे, याचा मार्गही दाखवतात.

Web Title: Commemoration of the beginning of the Gandhi era; Moments in history also bring something to tell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.