कंगना केवळ बहाणा, महाविकास आघाडीच निशाणा; राज्य सरकारविरोधात भाजपचा कावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 07:19 PM2020-09-12T19:19:49+5:302020-09-12T19:24:00+5:30

शिवसैनिकांनी हिंसेचा मार्ग पत्करला तर राष्ट्रपती राजवट लागू करुन महाविकास आघाडीचा प्रयोग चिरडण्यास केंद्र सरकार मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे उद्धव यांना कोरोना, बेरोजगारी यासारख्या मूळ समस्यांना भिडतानाच अधिक धोरणीपणे पुढील वाटचाल करावी लागेल.

bjp trying to destabilize mahavikas aghadi government with the help of kangana ranaut issue | कंगना केवळ बहाणा, महाविकास आघाडीच निशाणा; राज्य सरकारविरोधात भाजपचा कावा

कंगना केवळ बहाणा, महाविकास आघाडीच निशाणा; राज्य सरकारविरोधात भाजपचा कावा

googlenewsNext

- संदीप प्रधान

कोरोनाने होणारे मृत्यू दिवसागणिक वाढत आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बेरोजगारीमुळे दररोज कुणी ना कुणी आत्महत्या करीत आहे. कामाचा ताण व अस्थैर्य यामुळे अनेकजण मानसिक आजारांचे शिकार झाले आहेत. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप व राज्यातील शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडी सरकार हे वरील गंभीर समस्यांच्या तुलनेत क्षुल्लक विषयांवरुन परस्परांवर चिखलफेक करीत आहेत. या चिखलफेकीत बॉलिवुडच्या तारका उतरलेल्या असल्याने वृत्तवाहिन्यांना त्यांचे टीआरपीचे आर्थिक गणित सुटत असल्याचे दिसत असल्याने त्या दिवसभर तेच दाखवत आहेत. तिकडे सोशल मीडियावरही तेच ट्रेन्ड एकतर मॅनेज केले जात असून लॉकडाऊनमुळे घरी असलेले रिकामटेकडे त्या कृत्रिम ट्रेन्डच्या लाटेवर स्वार होत आहेत.

लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन - कंगना राणौत

सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या हत्येच्या संशयावरुन सुरु झालेला वाद सध्या अमली पदार्थांच्या सेवनापाशी अडखळला आहे. काहींच्या मते बिहार निवडणुकीपर्यंत हा विषय केंद्रातील भाजप सरकारला व त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बिहारमधील सत्ताधारी जनता दल (युनायटेड) पक्षाला तापवायचा आहे. बिहारमध्ये दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या नितीशकुमार सरकारला अँटी इन्कम्बन्सीची भीती वाटत आहे. यापूर्वी बिहारमधील गुंडागर्दीच्या विरोधात उभे राहिलेले, विकासाभिमुख नेते अशी नितीशकुमार यांची प्रतिमा होती. मात्र आता तीच प्रतिमा टिकवून ठेवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे बिहारी जनतेचे लक्ष मूळ समस्यांवरुन विचलित करण्याकरिता नितीशकुमार व भाजपला काहीतरी हवे होते. सुशांतसिंह प्रकरण हाती लागताच नितीशकुमार यांना दिलासा लाभला. हे प्रकरण महाराष्ट्राशी निगडीत असल्याने आपले नाक कापून येथे सत्ता स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची ही संधी लाभताच भाजपचे नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. महाविकास आघाडीचे प्रयोग अन्य राज्यांत झाले व सर्व पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले तर भाजपला मात देता येते हा संदेश महाराष्ट्रातील या प्रयोगाने दिला आहे. नेमकी हीच बाब भाजपच्या नेत्यांना खुपत आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणातून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले गेले. कंगना रनौत या सध्या फारशा चर्चेत नसलेल्या अभिनेत्रीचे बुजगावणे पुढे करुन भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरु केल्या. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेवर बदनामी, ट्रोलिंग, अफवाबाजी करण्याकरिता सर्वप्रथम भाजपने पगारी हुजरे नेमले. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही त्यांचे अनुकरण केले आहे. त्यामुळे मग कंगनाने ट्वीट केल्यावर लागलीच भाजपच्या पगारी नोकरांनी त्यावर समर्थनाच्या संदेशांचा पाऊस पाडायचा. लागलीच शिवसेना, राष्ट्रवादीने बसवलेल्या पगारी नोकरांनी तिच्यावर पिचकाऱ्या मारायच्या असा खेळ सुरु झाला. सोशल मीडियावर असलेली देशातील पाच-दहा टक्के जनता दिवसभर जे विषय चघळते तेच संपूर्ण राष्ट्राचे प्रश्न आहेत, असे दुर्दैवाने पण हेतूत: भासवले जाते. कारण सोशल मीडियावर असलेला हा वर्ग मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय आहे. तोच साबण-तेलापासून मद्यापर्यंत अनेक वस्तूंचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे मग त्याला हवे ते दाखवून जाहिराती मिळवण्याकडे वृत्तवाहिन्या व काही वृत्तपत्रांचाही कल आहे. फेसबुक, टिष्ट्वटर वगैरेंना अशा राजकीय मोहिमा राबवण्याकरिता मोठ्या रकमा मोजल्या जातात. अफवा पसरवणारे मेसेज ट्वीटरवर सातपट जास्त वेगाने पसरतात. बदनामीकारक मजकूर असाच वेगाने पसरतो. त्यामुळे गेले काही दिवस कोरोनापासून आर्थिक समस्यांकडील लक्ष विचलित करण्याकरिता दोन्ही सरकारे हा खेळ खेळत आहेत.

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

शिवसेनेच्या नेत्यांची शिवराळ भाषा, धमक्या यावरुन आता भाजपने नेते उरबडवेगिरी करीत आहेत. मात्र गेली तीन दशके याच शिवसेनेच्या ओंजळीतून भाजप नेते सत्तेचे तीर्थप्राशन करीत होते. मागील पाच वर्षांत शिवसेनेच्या शिवराळ शब्दांचे फटकारे भाजपने मुक्या जनावराप्रमाणे मार खाणाऱ्या बायकोसारखे सहन करुन सत्ता टिकवली. युतीच्या तीन दशकांच्या वाटचालीत शिवसेनेनी कधी संपादकांचे धोतर शिवाजी पार्कमध्ये फेडले तर कधी महानगरवर हल्ला केला. मात्र भाजप नेत्यांनी आता अर्णब गोस्वामी या छोट्या पडद्यावर ‘तांडवनृत्य’ करणाऱ्या पत्रकाराला धमक्या आल्यावर घेतली तशी कठोर भूमिका घेतली नाही. अण्णा हजारे, पुष्पा भावे, अ‍ॅलेक पदमसी, बी. जी. देशमुख अशा समाजातील अनेकांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत अत्यंत गलिच्छ भाषेत चिखलफेक केली तेव्हा भाजपचे हेच नेते शिवसैनिकांच्या मांडीला मांडी लावून हास्यकल्लोळात सहभागी होत होते. किंबहुना काँग्रेसपासून समाजातील पुरोगाम्यांना बाळासाहेब शिव्या देत आहेत यामध्ये पाहुण्याच्या काठीने साप मरत असल्याचा विकृत आनंद भाजपने घेतला. ‘ती बाळासाहेबांची स्टाईल आहे. त्यांना कोण काय सांगणार’, अशा शब्दांत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यापासून अनेक नेत्यांनी अंगावर पडलेली पाल झटकावी तशी जबाबदारी झटकली. आता जेव्हा तीच शिवसेना भाजपच्या नेत्यांना शिव्या देऊ लागली तेव्हा त्यांना राजकारणातील सोवळ्याची व नीतीमत्तेच्या जानव्याची आठवण झाली. त्यामुळे भाजपची शिवसेनेविरोधातील गळेकाढू प्रवृत्ती ही बेगडी आहे.

कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करून टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बॉलिवुड यांचे वर्षानुवर्षे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. किंबहुना जेव्हा देशातील व राज्यातील सत्ताधारी काँग्रेसजन बॉलिवुडकडे एक मनोरंजनाचे क्षेत्र म्हणून पाहत होते तेव्हा शिवसेनेनी तेथे राजकीय चंचुप्रवेश केला. सिनेकामगार, कलावंत यांची संघटना बांधली. एकेकाळी मुंबईत स्मगलिंग चालायचे व त्यातील काळा पैसा हा चित्रपटसृष्टीत ओतला जायचा. त्यावेळी आतासारखे बांधकाम व्यवसायापासून इतर मार्ग नव्हते. त्यामुळे मुंबईवर वचक बसवायचा तर बॉलिवुड ताब्यात हवे हे बाळासाहेबांनी हेरले होते. दिलीपकुमारपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेकांची मातोश्रीवर उठबस असे. महत्त्वाची बाब म्हणजे अनेक कलाकारांच्या चित्रपटांना शिवसेनेनी विरोध केल्यावर ते मातोश्रीची पायरी चढले व त्यानंतर त्यांचा बाळासाहेबांशी केवळ दोस्तानाच जमला नाही तर कौटुंबीक संबंध निर्माण झाले. देशाचे समाजमन संजय दत्तच्या विरोधात असतानाही बाळासाहेबांनी त्याची जाहीरपणे बाजू घेतली होती तर मुंबई दंगलीवरील ‘बॉम्बे’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरले होते. एका टी.व्ही. शो मध्ये बाळासाहेबांना त्यांच्या व दिलीपकुमार यांच्या दोस्तीबद्दल विचारले असता ‘आज भी मै बीअर पिता हूं, चने खाता हूं पर दिलीपकुमार मेरे साथ नही होते’, असे बोलले होते. दिलीपकुमार यांनी पाकिस्तानचा सर्वोच्च किमाब स्वीकारण्यास शिवसेनेनी विरोध केला होता. मूळ मुद्दा हाच आहे की, बॉलिवुडचे बडे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक हे बाळासाहेबांकडे येऊन त्यांचा पाहुणचार घेऊन गेले. दुर्दैवाने ठाकरे यांच्या तिसºया पिढीने आजोबांचा हा शिरस्ता कायम राखलेला नाही. ही नवी पिढी अनेक पार्ट्यांमध्ये स्वत: जात असल्याने व अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या काही कलाकारांसोबत तिची उठबस असल्याने भाजपला ठाकरे यांची ही पुढची पिढी ‘पार्टी अ‍ॅनिमल’ आहे, छछोर आहे, हे पर्सेप्शन निर्माण करण्याची संधी लाभली आहे.

सर्वात शेवटचा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशात जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या अत्यंत प्रभावशाली होत्या व त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती तेव्हा बाळासाहेबांसारखा डरकाळ्या फोडणारा नेता आणीबाणीच्या काळातील अनुशासन पर्वाचे कौतुक करीत होता. उद्धव ठाकरे हे ना डरकाळ्या फोडतात ना शिवसैनिकांना थेट हिंसेकरिता प्रोत्साहन देतात. त्यांनी आपली नेमस्त नेता अशी छबी निर्माण केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा करिष्मा व उपद्रवक्षमतेपुढे अनेकांनी गुडघे टेकले असताना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा प्रयोग करुन त्यांनी मोदींना आव्हान दिले आहे. बाळासाहेब व उद्धव यांच्यातील हा मोठा फरक आहे. त्यामुळे उद्धव यांच्यापुढील आव्हान अधिक मोठे आहे. शिवसैनिकांनी हिंसेचा मार्ग पत्करला तर राष्ट्रपती राजवट लागू करुन महाविकास आघाडीचा प्रयोग चिरडण्यास केंद्र सरकार मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे उद्धव यांना कोरोना, बेरोजगारी यासारख्या मूळ समस्यांना भिडतानाच अधिक धोरणीपणे पुढील वाटचाल करावी लागेल.

Web Title: bjp trying to destabilize mahavikas aghadi government with the help of kangana ranaut issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.