निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्ष कुठे दिसलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:25 AM2019-10-27T01:25:35+5:302019-10-27T01:26:07+5:30

मला आठवते १९७७ साली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधींवर सत्तेकडून चौफेर प्रहार करण्यात आले होते. त्या काळात काँग्रेस मोडून पडली होती

Article on The Congress party did not appear anywhere in the election field | निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्ष कुठे दिसलाच नाही

निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्ष कुठे दिसलाच नाही

googlenewsNext

मला राजकारण समजू लागले तेव्हापासून आतापर्यंत मी अशी निवडणूक बघितली नाही ज्या निवडणुकीत काँग्रेसने संघर्ष करणे सोडून दिले आहे! महाराष्ट्रात काँग्रेसने यंदाची निवडणूक लढवलीच नाही. काँग्रेसजवळ ना कोणते नियोजन होते, ना कोणता जोम होता. काँग्रेस पक्ष पूर्णपणे हतोत्साह झालेला दिसून आला. वास्तविक याहून वाईट अवस्थेत काँग्रेसने संघर्ष केल्याचा इतिहास आहे.

मला आठवते १९७७ साली निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधींवर सत्तेकडून चौफेर प्रहार करण्यात आले होते. त्या काळात काँग्रेस मोडून पडली होती आणि इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्थिती खूपच कमकुवत झाली होती, शिवाय काँग्रेसची आर्थिक
अवस्थादेखील वाईट होती. साधनसंपत्तीचा अभाव होता. त्याच काळात १९७८ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार होत्या. पण त्या काळात इंदिराजींनी आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी कमालीच्या धैर्याचा आविष्कार दाखवून दिला. त्यांनी झपाटल्यागत साऱ्या
महाराष्ट्रभर दौरा केला, त्यामुळे निवडणुकीचे निकाल चांगले दिसून आले. निवडणुकीनंतर बंडखोर गटासोबत समझोता होऊन वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.

Image result for maharashtra congress

त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. पण यावेळच्या निवडणुकीत कुठेही संघर्ष पाहायला मिळाला नाही. काँग्रेसच्या दुर्दशेविषयी मी याच स्तंभातून अनेकदा लेखन केले आहे. माझे मत आहे की, काँग्रेस जर क्रियाशील झाली तर परिस्थितीत बदल होऊ शकतो. गरज आहे ती हिंमत आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा जो माहोल निर्माण केला, त्यामुळे काँग्रेस पक्ष गोंधळून गेला. या तिघांनी काढलेल्या निवडणूक प्रचाराच्या यात्रांमुळे भयभीत होऊन काँग्रेस पक्ष आत्मविश्वास गमावून बसला आणि निवडणुकीत त्याने अगोदरच पराभव मान्य
केला.

वास्तविक सत्तारूढ पक्षातील उणिवांवर बोट ठेवण्याचे काम काँग्रेसला करता आले असते. समाजापुढे आज अनेक ज्वलंत प्रश्न
आहेत. अनेक प्रश्न दडलेले आहेत. लोकांमध्ये सत्तारूढ पक्षाविषयी सुप्त असंतोष आहे. त्यामुळे काँग्रेसला आक्रमक पद्धतीने प्रचार करता आला असता, पण तसे घडू शकले नाही. जे काँग्रेसला करता आले नाही ते शरद पवारांनी करून दाखवले. प्रचार करताना त्यांनी उन्हाची पर्वा केली नाही. पावसाची तमा बाळगली नाही. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले आणि शिवाजी महाराजांची तलवार हातात घेऊन एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते निवडणूक रणांगणात उतरले आणि संपूर्ण ताकदीने हल्ले करीत सुटले. त्यांनी साताºयाच्या गादीला हलवून सोडले आणि त्याचा लाभ त्यांना झाला.

Image result for maharashtra congress

याउलट काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवून त्याजागी बाळासाहेब थोरातांना बसवून पाच कार्याध्यक्ष त्यांच्या सोबतीला दिले. त्यांनी निवडणुकीचे योग्य नियोजन करावे, यासाठी हे करण्यात आले. त्यातून काँग्रेस चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात हीच माणसे स्वत: निवडणूक लढवीत होती. त्यामुळे ती आपल्या मतदार संघापलीकडे जाऊच शकली नाही. वास्तविक त्यांना पद कशासाठी देण्यात आले होते? विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार, अशोक
चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे मोठे नेते आपल्या मतदारसंघाबाहेर पडलेच नाहीत. ज्यांना स्टार प्रचारक करण्यात आले होते, त्यांनी केवळ स्टार उमेदवारांचाच प्रचार केला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जवळजवळ २०२५ जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराचा दोन- चार हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. तेथे हे स्टार प्रचारक आणि मोठे नेता गेले असते तर हे उमेदवार विजयी होऊ शकले असते. राहुल गांधींच्या एक-दोन सभा जरूर झाल्या. पण काँग्रेसचे इतर मोठे नेते प्रचारासाठी उतरले असते तर चांगले वातावरण निर्माण होऊ शकले असते.

स्वास्थ्याच्या कारणासाठी सोनिया गांधी प्रचारासाठी येऊ शकल्या नाहीत, हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्रात काही क्षेत्रात प्रियांका गांधी यांचे रोड शो जरी झाले असते तरी २०-२५ जागा अधिक जिंकता आल्या असत्या. काँग्रेसचे दोघे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे नागपूरचेच आहेत. पण तेदेखील काही बड्या नेत्यांना प्रचारासाठी आणू शकले नाहीत. इतकेच काय पण विदर्भाचे अनेकदा प्रतिनिधित्व करणारे गुलाम नबी आझाद जरी प्रचारासाठी आले असते तरी खूप फरक पडला असता. याउलट भाजपचे सारे नेते प्राण पणाला लावून निवडणुकीत उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य अनेक नेते प्रचारासाठी आले होते. नेत्यांनी उत्साह दाखविला तर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारत असतो. भाजपचे कार्यकर्ते उत्साहात होते तर काँग्रेसचे कार्यकर्ते हतोत्साह दिसत होते. या परिस्थितीत जे आमदार निवडून
आले आहेत ते सगळे स्वत:च्या प्रयत्नांनी निवडून आले आहेत, असे म्हणता येईल. त्यांचा स्वत:चा करिश्मा त्यांच्या उपयोगी पडला. काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचारासाठी काही निधी दिला एवढेच, याहून अधिक पक्षाने काहीच केले नाही. वास्तविक काँग्रेसचे कार्यकर्ते आजसुद्धा गावागावात आहेत, शहराशहरात आहेत, गल्लीबोळात आहेत, नोकरशाहीत आहेत. पण त्यांना हिंमत देणारा कुणी नव्हता, ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. शरद पवार यांनी ज्या तºहेचा जोश दाखविला तसाच जोश काँग्रेसच्या नेत्यांनी जर दाखवला असता आणि प्रचारात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ताळमेळ राखला गेला असता तर दोन्ही पक्षांना जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून कितीतरी अधिक जागा ते मिळवू शकले असते. काही ठिकाणी तर योग्य व्यक्तीला तिकीट दिले गेले नाही. आश्चर्य म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवारच उभा केला नाही. वास्तविक त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जोर लावायला हवा होता. पण यावेळी प्रथमच काँग्रेसने मनसेच्या उमेदवाराला समर्थन प्रदान केले.

Image result for maharashtra congress

भाजपच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपण कोणत्या मैदानात उतरलो आहोत, याची जाणीव फडणवीसजींना होती. राज्यातील शेतकऱ्यांची दुरवस्था झालेली होती. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे सोपे नव्हते, तरीसुद्धा त्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ
ठेवण्याचे आणि क्रियाशील राहण्याचे काम केले. यावेळी भाजपची घोषणा होती ‘अबकी बार २२० के पार’. सुरुवातीला मला वाटले
की, भाजपला १२० आणि शिवसेनेला ८० जागा मिळू शकतील. पण माझ्या प्रवासाच्या काळात मला प्रत्यक्ष स्थिती काय आहे, ते
पाहायला मिळाले. मी फडणवीसजींना सांगितलेसुद्धा की भाजपाला ११० जागांपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. तसेच शिवसेनासुद्धा ६०-६५ जागांच्या आसपास राहील. भाजपाला कमी जागा मिळण्याचे एक कारण चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न मिळणे हेही आहे. त्यामुळे समाजाचा मोठा गट भाजपवर नाराज झाला होता.

हरियाणाच्या निकालाच्या संदर्भात सांगायचे झाले तर काँग्रेसचे वरिष्ठ नेता भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवायला हवी होती. तसेच कुमारी शैलजा यांना योग्यवेळी आणण्यात आले असते तर तेथेदेखील काँग्रेस पक्ष निश्चितपणे सरकार स्थापन करू शकला असता. येथेदेखील काँग्रेसने निर्णय घेण्यात नेहमीप्रमाणे उशीर केला. त्यामुळे हरियाणात काँग्रेसला मतदारांनी स्वीकारूनही तेथे काँग्रेसला सत्ता मिळू शकली नाही!

विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड)
लोकमत समूह
(vijaydarda@lokmat.com)

 

Web Title: Article on The Congress party did not appear anywhere in the election field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.