कोरोनाच्या अनुषंगाने शहरात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. त्यात काही कडक निर्बंध लागू आहेत. सकाळी ११ वाजेपर्यत केवळ अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंदचे आदेश आहेत. गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. अशाही परिस्थितीत अत्यावश्यक नसलेली दुकानेही बिनधास्तपणे उघडली जात आहेत. परिणामी नागरिक सुध्दा खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सुध्दा वेळोवेळी कारवाई केली जात आहे. असे असताना देखील कोणीही घाबरत नसल्याचे दिसून येते. विनामास्क फिरणाऱ्यांवर देखील कारवाई होत असते. असे असूनही शहरात जैसे थे चे चित्र आहे.
मंगळवारी अचानक सकाळी ११ वाजेनंतर शहर पाेलीस निरीक्षक नितीन देशमुख हे पथकासह रस्त्यावर उतरले. महापालिकेसमोरील दुकान सुरु असलेल्या १० व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. शिवाय तेथे असलेल्या ग्राहकांना देखील ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, विनाकारण फिरु नये, मास्कचा वापर करावा, गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.