विराट कोहली अन् रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला मिळवून दिलं यश, पण या पाच चुकीच्या निर्णयांनी बसले मोठे फटके!

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाविरुद्धचा सामना हा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण निर्माण करणारा ठरला. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तर विराट कोहलीचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून तो अखेरचा सामना होता.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाविरुद्धचा सामना हा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण निर्माण करणारा ठरला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत पराभूत केलं. वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेत निर्भळ यश मिळवलं आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. पण, याच पाच वर्षांच्या कार्यकाळात रवी शास्त्री व विराट कोहली यांनी घेतलेल्या पाच निर्णयांचा टीम इंडियाला खूप मोठा फटका बसला.

विराट व शास्त्री या जोडीला अद्यापही टीम इंडियात नंबर ४ साठी सक्षम पर्याय शोधता आलेला नाही. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत या जोडीनं अंबाती रायुडूवर अविश्वास दाखवला आणि त्याला संघाबाहेर केलं. रायुडूच्या जागी विजय शंकरला संधी दिली. त्यानंतर दिनेश कार्तिक, रिषभ पंत या फलंदाजांचीही कसोटीत त्या क्रमांकावर चाचपणी केली गेली. श्रेयस अय्यरला संधी मिळाली, परंतु दुखापतीमुळे त्यानं संघातील स्थान गमावले.

विराट व शास्त्री हे संघाला हार्दिक पांड्याचा पर्याय देऊ शकले नाहीत. दोन वर्षांपूर्वी हार्दिकला दुखापत झाली होती आणि संघाकडे अजूनही मध्यमगती गोलंदाज- ऑलराऊंडर नाही. शिवम दुबे, विजय शंकर आले आणि गेले. हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नसूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाली. पण, त्याचा काहीच उपगोय झाला नाही आणि स्पर्धेत टीम इंडियाला फटकाच बसला.

विराट व शास्त्री ही जोडी प्रोफेशनल काम करताना दिसली, परंतु त्यामुळे भारतानं अनेक स्टार्स खेळाडू गमावले. हनुमा विहारी, मयांक अग्रवाल यांनी आपले कौशल्य दाखवले, परंतु कसोटीत आपली जागा पक्की आहे की नाही, हेच त्यांना माहित नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव-युझवेंद्र चहल चांगली कामगिरी करत होती, त्यांनाही विभक्त केले. आता ही दोघंही संघाबाहेर आहेत.

संघातील सीनियर खेळाडूंमध्ये असुरक्षितता आहे. कसोटीत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचे स्थान संकटात होते, तर इंग्लंड दौऱ्यावर आर अश्विनला बाकावरच बसवून ठेवले गेले. वन डे व ट्वेंटी-२०त त्याची निवड करणेच बंद करून टाकले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून चार वर्षांनी अश्विननं ट्वेंटी-२० संघात पुनरागमन केलं.

पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्याकडे घातक डावखुरे जलदगती गोलंदाज आहेत आणि त्यांच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे. भारताला असा डावखुरा जलदगती गोलंदाज तयार करता आला नाही. खलील अहमद, टी नटराजन हेही आत बाहेर होत आहेत.

Read in English