भाऊ आणि वडिलांना गमावलं, गरिबीत गेलं बालपण; आता ती भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी झालीय सज्ज!

भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात समाविष्ट असलेली फिरकी गोलंदाज अर्चना देवी हिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गरिबीवर मात करून स्वप्नं कशी पूर्ण होतात याचं ती मूर्तीमंत उदाहरण आहे.

भारतीय महिला संघाने शुक्रवारी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात पार्श्वी चोप्राने सर्वाधिक विकेट घेतल्या असल्या तरी अर्चना देवीनं सामन्यातील सर्वात महत्त्वाची विकेट घेतली. किवी संघाकडून सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या प्लिमरला तिनं बाद केलं. या संपूर्ण स्पर्धेत अर्चना संघासाठी खूप महत्त्वाची ठरली आहे. (Getty Images)

अर्चना देवीचं देशासाठी विश्वचषक खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. उन्नावमधील एका छोट्या गावातून आलेल्या अर्चना देवी अतिशय गरीब कुटुंबातील आहे, पण तिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं आणि आता देशाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची जिद्द तिनं बाळगली आहे. (Getty Images)

अर्चना अवघ्या चार वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. तर २०१७ मध्ये तिच्या भावाचाही सर्पदंशामुळे मृत्यू झाला.

आईनं मोठ्या कष्टानं कुटुंबाचं पालनपोषण केलं. कधी ती शेतात काम करायची तर कधी घरोघरी दूध विकायची. अर्चनाला शाळेत पाठवायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. ती सरकारी शाळेत शिकायची. (Getty Images)

सरकारी शाळेतील पीटी शिक्षिका पूनम गुप्ता यांनी अर्चनाची प्रतिभा ओळखली. त्यांनी अर्चनाच्या क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली आणि नंतर तिला कानुपरच्या क्रिकेट अकादमीत पाठवले जिथं कुलदीप यादवच्या प्रशिक्षकानं अर्चनाच्या प्रतिभेला ओळखलं. येथूनच तिचा खरा प्रवास सुरू झाला. टीम इंडियाचे दरवाजे उघडले. (Getty Images)

अर्चना आता रविवारी आयसीसी अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळताना दिसेल. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची ती पूर्ण प्रयत्न करेल.

त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात अर्चनावर अनेक फ्रँचायझींच्या नजरा असतील. (फेसबुक)