T20 World Cup 2021 : टीम इंडिया दोन संघ मैदानावर उतरवण्यास तयार; प्रत्येक खेळाडूमागे तगडा पर्याय!

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कपची तयारी म्हणून पाहत आहेत. भारतीय खेळाडूंचा सध्याचा फॉर्मा पाहता वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान जेतेपदाच्या दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत. या स्पर्धेसाठी भारताची राखीव फळीही इतकी मजबूत आहे की टीम इंडिया दोन तगडे संघ मैदानावर उतरवू शकते. संघातील ११ खेळाडूंमागे एक तगडा पर्याय सध्या टीम इंडियाकडे उपलब्ध आहे..

शिखर धवन ( रोहित शर्मा) - लोकेश राहुल व रोहित शर्मा हे दोन सलामीवीर कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंती आहे. त्यामुळे शिखर धवनला अंतिम ११मध्ये स्थान मिळवणे अवघड आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात साजेशी कामगिरीही करता आली नाही. पण, त्याच्या नावावर ६५ ट्वेंटी-२० सामन्यात १६७३ धावा आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वात सध्या तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

इशान किशन ( लोकेश राहुल ) - इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून इशान किशननं टीम इंडियात पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच सामन्यात ३२ चेंडूंत ५६ धावा कुटून इतिहास घडविला. अजिंक्य रहाणेनंतर ट्वेंटी-२०त पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याची बिनधास्त फटकेबाजी सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यानं गतवर्षी दमदार खेळ केला होता.

सूर्यकुमार यादव ( विराट कोहली) - कर्णधार विराट कोहलीलाही तिसऱ्या क्रमांकाला बॅक अप म्हणून मुंबई इंडियन्सचा तगडा फलंदाज सूर्यकुमार यादवचा पर्याय आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्यानं टीम इंडियात पदार्पण केलं. आयपीएलच्या मागील मोसमात त्यानं १६ सामन्यांत ४८० धावा चोपल्या आहेत.

मनीष पांडे ( श्रेयस अय्यर ) - मनीष पांडेला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात सातत्यानं अपयश आलं आणि त्याची जागा श्रेयस अय्यरनं पटकावली. पण, अय्यर सध्या दुखापतीमुळे तीन महिने क्रिकेटपासून बाहेर आहे आणि मनीषला आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा टीम इंडियातील स्थान पक्के करण्याची संधी आहे. चौथ्या क्रमांकाची चिंता टीम इंडियाला नेहमी सतावत आली आहे. पण, आता उत्तम पर्याय आहेत.

संजू सॅमसन ( रिषभ पंत) - रिषभ पंत हा टीम इंडियाची पहिली पसंती असला तरी संजू सॅमसन त्याला तगडे आव्हान देण्यास सक्षम आहे. आयपीएल २०२१मध्ये संजूनं पहिल्या शतकवीराचा मान पटकावला. पण, संजूला त्याच्या खेळात सातत्य राखता येत नसल्यानं तो मागे पडतो.

शार्दूल ठाकूर ( भुवनेश्वर कुमार ) - शार्दूलनं फक्त ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळले असले तरी आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. भुवनेश्वर कुमारला तो पर्याय ठरू शकतो.

दीपक चहर ( मोहम्मद शमी) - चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर त्याच्या स्वींग गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींनी हतबल करतोय. मोहम्मद शमीला तो पर्याय ठरू शकतो.

टी नटराजन ( जसप्रीत बुमराह) - यॉर्कर किंग टी नटराजन टीम इंडियाचा नवा ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज ठरत आहे. त्याला आणखी अनुभव मिळाल्यास, त्याची कामगिरी उंचावू शकते.

वरुण चक्रवर्थी ( युझवेंद्र चहल) - युझी सध्या विकेट घेण्यासाठी धडपताना दिसत आहे, वरुण चक्रवर्थी त्याला पर्याय ठरू शकतो. फक्त वरूणनं फिटनेसवर लक्ष देणं गरजेचं आहे.

राहुल टेवाटिया ( हार्दिक पांड्या) - राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटियानं आयपीएल २०२०त कमाल करून दाखवली. हार्दिक पांड्याला बॅकअप म्हणून तो सक्षम पर्याय आहे.

वॉशिंग्टंन सुंदर ( रवींद्र जडेजा) - ट्वेंटी-२० पॉवर प्लेमध्ये प्रभावी गोलंदाजी करण्याचे कसब वॉशिंग्टन सुंदरकडे आहे आणि रवींद्र जडेजासाठी तो उत्तम बॅक अप ठरू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत वॉशीनं फलंदाजीतही कमाल करून दाखवली होती.