T20 World Cup 2022 : सुपर १२ साठी 'या' संघांची जागा पक्की; वेस्ट इंडिज, श्रीलंकेला मोठं नुकसान

T20 World Cup : सध्या सुरू असलेली टी २० विश्वचषक स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात आलेल्या संघांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेली टी २० विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2021) ही आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. लवकरच यावर्षी कोणता संघ विश्वचषक पटाकवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक सामन्यासाठी आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

पुढील वर्षी विश्वचषक स्पर्धेसाठी आता एका वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. पुढील वर्षी टी २० विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी थेट क्वालिफाय झालेल्या आठ संघांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे.

यापैकी अनेक संघांच्या नावांचे तर्क आधीपासूनच वर्तवले जात होते. परंतु विश्वचषक पटकावलेल्या वेस्ट इंडिजच्या आणि श्रीलंकेच्या संघाला मोठा फटका बसला आहे. त्यांना आता सुपर १२ मध्ये प्रवेश करण्यासाठी फर्स्ट राऊंड मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. यादरम्यान, ४ क्वालिफायर टीम्सदेखील या मोठ्या टीम्सचा सामना करताना दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर पुढील वर्षी खेळवण्यात येणाऱ्या टी २० स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेल्या टीम्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघांना पहिल्या राऊंडचे सामने खेळावे लागणार आहेत. यादरम्यान चार क्लालिफायर टीम्स या दोन मोठ्या संघांसोबत सामने खेळतील.

आयसीसीनं १५ नोव्हेंबर ही कट ऑफ तारीख निश्चित केली होती. १५ नोव्हेंबर रोजी आयसीसीच्या टी २० रँकिंगमध्ये आठव्या क्रमांकापर्यंत राहणाऱ्या संघांना ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला.

तर दुसरीकडे अन्य संघांना क्वालिफिकेशन राऊंडमधील सामने खेळल्यानंतर सुपर १२ मध्ये स्थान देण्यात येणार आहे. टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बांगलादेशचा संघ एकही सामना जिंकला नाही. परंतु त्यांनादेखील पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी थेट एन्ट्री मिळाली आहे.

बांगलादेशला संधी मिळण्याचं कारण बांगलादेशचा संघ हा आठव्या स्थानावर आहे. तर १५ नोव्हेंबरपर्यंत हा संघ आठव्याच स्थानावर राहणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन संघांना मोठं नुकसान झालं आहे. हे दोन्ही संघ आयसीसी टी २० च्या रँकिंगमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत १५ व्या स्थानावर राहणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या टी २० स्पर्धेमध्ये 'ए' गटात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेत सुपर १२ मध्ये पहिल्यापासून ग्रुप ए ला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं जात आहे. ग्रुप ए. मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि बांग्लादेशच्या संघांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्याप्रमाणेच अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत.

सुपर १२ मध्ये ग्रुप ए. मधील ३ संघ मोठ्या पराभवामुळे उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत. तर, उर्वरीत ३ संघ उपांत्य सामन्याची लढाई लढत होते. मात्र, अखेर उपांत्य सामन्यांतील प्रवेश हा हार-जीतने होणार नसून नेट रेटने झाला आहे.

ग्रुप १ मधून दोन संघांना उपांत्य सामन्यात प्रवेश देण्यात येणार होता. मात्र, तीन संघांनी ४-४ विजयांसह ८ गुण प्राप्त केले आहेत. मात्र, नेट रेटमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघानेच उपांत्य सामन्यांत प्रवेश मिळवला आहे. तर, तितकेच सामने जिंकणारी दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

इंग्लंडने पहिले ४ सामने जिंकल्यामुळे नेटरेटमध्ये द. आफ्रिकेपेक्षा इंग्लंडचा संघ सरस ठरला आहे. उपांत्य सामन्यासाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत अंतिम लढाई झाली. त्यामध्ये, द. आफ्रिकेनं १९० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, नेटरेटमधील फरकामुळे इंग्लंडला १३१ धावांतच रोखणे आवश्यक होतं. मात्र, ते शक्य न झाल्याने द.आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

Read in English