IND Vs NZ : भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

IND Vs NZ Test Series: मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. परंतु सामन्यांपूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे.

केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वानखेडे मैदानावर ठराविक प्रमाणातच प्रेक्षकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर एकूण क्षमतेपैकी केवळ २५ टक्केच प्रेक्षकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, ही संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं एमसीएकडून सांगण्यात आलं.

सद्यस्थितीत वानखेडे स्टेडियमवर ३० हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. परंतु सामन्यादरम्यान, यापैकी केवळ २५ टक्के प्रेक्षकांनाच मैदानावर सामना पाहता येणार आहे. ही मर्यादा वाढवून ५० टक्के करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

"राज्य सरकारच्या निर्देशानुसार वानखेडे स्टेडियमवर २५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५० टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांना येण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा आहे," असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

वानखेडे स्टेडियमवर अंतिम कसोटी सामना २०१६ मध्ये इंग्लंडविरोधात खेळवण्यात आला होता. या सामन्यामुळे वानखेडेवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांची सुरूवात होईल. गेल्या वर्षी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणताही सामना खेळवण्यात आला नव्हता.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत. प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे.

रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक

सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल. मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड, दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड, राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड, भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती, अशी काही नवी नियमावली राज्य सरकारनं जारी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा, असे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे.