Ind Vs Nz Test Series : पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयर अय्यरचं अर्धशतक; रोहितपासून धवनपर्यंत सर्वांनी ठोकला कडक सॅल्युट

१९७० नंतर पदार्पणात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

Ind Vs Nz Test Series : कानपूर कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीकडे साऱ्यांच्या नजरा होत्या, परंतु या अनुभवी जोडीला फार प्रभाव पाडता आला नाही.

पण, शुबमन गिल व पदार्पणवीर श्रेयस अय्यर यांनी दमदार खेळ केला. अष्टपैलू रवींद्र जडेजाही मस्त खेळला. भारतानं पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवले, विशेषतः तिसरे सत्र भारताच्याच नावावर राहिले. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ८४ षटकानंतर थांबवण्यात आला. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरनं पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक ठोकत सर्वांची मनं जिंकली.

श्रेयस अय्यरनं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ७५ धावा केल्या. त्यानं रविंद्र जडेजासोबत मिळून टीम इंडियाला १५४/४ च्या स्कोअरवरून २५० च्या पार पोहोचवलं. यानंतर रोहित शर्मा, शिखर धवन आणि अन्य दिग्गज खेळाडूंनी त्याच्या या खेळाचं कौतुक केलं.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरच्या हाती टेस्ट कॅप सोपवली. या सामन्यात श्रेयस अय्यर हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यावेळी भारतानं १०६ धावांवर तीन गडी गमावले होतेय त्यानं अजिंक्य रहाणेसोबत मिळून धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली.

या सामन्यात राहाणेला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यास अपयश आलं. परंतु श्रेयस अय्यरनं आपला खेळ सुरू ठेवत १३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ७५ धावा केल्या. यामध्ये सात चौकारांसह दोन षटकारांचादेखील समावेश आहे.

यानंतर रोहित शर्मानं त्याच्या खेळाचं कौतुक करत टेस्ट करिअरची उत्तम सुरूवात केल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे शिखर धवननंही त्याचं कौतुक केलं. टेस्टमधील पदार्पण आणि पहिल्या अर्धशतकासाठी अभिनंदन, तुझ्या कठोर मेहनतीचं हे फळ आहे, असं तो म्हणाला.

तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यानंही श्रेयस अय्यरचं कौतुक केलं आहे. टेस्ट करिअरची जबरदस्त सुरूवात. कठोर मेहनतीमुळेच आज त्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे, असं तो म्हणाला.

पदार्पणवीर श्रेयस अय्यर आणि अनुभवी रवींद्र जडेजा या जोडीनं किवी गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी सुरेख भागीदारी करताना भारताची धावसंख्या दोनशेपार नेली. १९७० नंतर पदार्पणात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा अधित धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. मोहम्मद अझरुद्दीन यानं १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि २०२०मध्ये एस बद्रीनाथनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

भारतानं पहिल्या दिवसाच्या खेळात ८४ षटकांत ४ बाद २५८ धावा केल्या आहेत. श्रेयस १३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद असून रवींद्र जडेजानंही १०० चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावा केल्या आहेत. किवींच्या कायले जेमिन्सननं ३ विकेट्स घेतल्या.