श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला; उंचावली मुंबईकरांची मान

श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला.

श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. पण, या शतकी खेळीमुळे त्यानं ४५ वर्षांचा दुष्काळ संपवला. पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा १६वा खेळाडू ठरला, परंतु १९७६नंतर एकाही भारतीय खेळाडूला न जमलेला पराक्रम त्यानं केला.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या या शतकाच्या आधी १९७६मध्ये भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकले होते. त्यानंतर आज श्रेयसनं हा पराक्रम करून दाखवला. श्रेयसनं पाचव्या विकेटसाठी रवींद्र जडेजासह १२१ धावांची भागीदारी केली.

अय्यरच्या आधी सुरिंदर अमरनाथ यांनी जानेवारी १९७६मध्ये ऑकलंड येथील इडन पार्कवर कसोटीत पदार्पण केले होते आणि १२४ धावांची खेळी केली होती. ४५ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकाणार अय्यर हा पहिलाच भारतीय ठरला. १९५५मध्ये एजी कृपाल सिंग यांनी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणात १०० धावा केल्या होत्या.

भारताकडून कसोटी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या यादीवर लक्ष टाकाल, तर अखेरची तीनही फलंदाज हे मुंबईकर आहेत. पृथ्वी शॉ यानं २०१८मध्ये राजकोट कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध १३४ धावा केल्या होत्या, तर रोहितनं त्याआधी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १७७ धावा केल्या होत्या.

भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

१९८०नंतर कानपूर येथे एका डावात पाच विकेट्स घेणारा टीम साऊदी हा पहिलाच परदेशी जलदगती गोलंदाज ठरला