औरंगाबाद : स्वाईन फ्लूच्या साथीचा उद्रेक थांबत नसल्याचे दिसून आले आहे. गत सप्ताहात स्वाईन फ्लूने पाच जणांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आज सोमवारी दुपारी आणखी एका महिलेचा उपचार सुरू असताना घाटीत मृत्यू झाला. जिल्ह्यातील स्वाईन फ्लू बळींची संख्या आता ८ झाली आहे. जयश्री विनोद पाटील (३५, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जि.जळगाव) असे स्वाईन फ्लूने मरण पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. जयश्री यांना सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप इ. लक्षणे होती. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना २७ फेब्रुवारी रोजी घाटीत दाखल केले होते. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्या स्वॅबचा नमुना पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविला होता. संस्थेने पाठविलेल्या अहवालात जयश्री यांना स्वाईन फ्लू असल्याचे नमूद केले होते. त्या दाखल झाल्यापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांना त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही आणि सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने स्वाईन फ्लू मेहरूणसारख्या लहान गावापर्यंत पसरला असल्याचे निष्पन्न झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शहरातील एका बँक कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूने बळी घेतला होता. तेव्हापासून बळींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या मंगळवारी एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. तर खाजगी रुग्णालयातही एका रुग्णाचा बळी गेल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा आरोग्य विभागाकडून मिळत नाही. असे असले तरी आतापर्यंत स्वाईन फ्लूने आठ जणांचे बळी घेतले आहेत.
स्वाईन फ्लूने घेतला जळगावच्या महिलेचा बळी
By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST