‘नांमका’त पाणी सोडण्यास नकार

By Admin | Updated: May 22, 2014 00:55 IST2014-05-22T00:39:44+5:302014-05-22T00:55:23+5:30

वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

Refuse to release water in 'Namka' | ‘नांमका’त पाणी सोडण्यास नकार

‘नांमका’त पाणी सोडण्यास नकार

 वैजापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यात पिण्याचे पाणी सोडण्यास नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी स्पष्ट नकार दिला आहे. औरंगाबादचे महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याची कोणतीही मागणी केली नसल्याने पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बाफना यांनी वैजापूर येथील शिष्टमंडळास सांगितले. दरम्यान, पाणी सोडण्यासंदर्भात औरंगाबादचे महसूल आयुक्त यांनीही बाफना यांच्याशी चर्चा केली; परंतु ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता नांमकाच्या पाण्यावरून नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून रबी हंगाम, पिण्यासाठी व उन्हाळी अशी एकूण तीन आवर्तने ३० दिवस सोडण्याचे नियोजन औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत करण्यात आले होते. या तीन आवर्तनाच्या माध्यमातून वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी ४३१८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार दोन आवर्तने फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात सोडण्यात आली, तर तिसरे आवर्तन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात आले; परंतु तिसरे आवर्तन सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी साधारणत: १२ दिवसांनंतर कालव्याचे पाणी अचानक बंद केले. पाणी अचानक बंद केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊन लाभक्षेत्रातील पिके धोक्यात आली. याशिवाय तालुक्यातील जवळपास ३० गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिली. औरंगाबादच्या आयुक्तांनी कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अरेरावीच्या धोरणामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, रमेश बोरनारे, अविनाश पाटील गलांडे, अंकुश हिंगे, कल्याण जगताप, सतीश खंडागळे, विलास थोरात, प्रभाकर थोरात, गणेश मोटे, रामचंद्र सावंत, राजू पवार, काकासाहेब दुशिंग, अण्णा दुशिंग, सुरेश सातुरे, अमोल पवार, रणजित चव्हाण, भाऊराव बोर्डे, उद्धव बहिरट यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली; मात्र कार्यकारी अभियंता एस.के. बाफना यांनी धरणातच पाणी नाही, तुम्हाला देणार कोठून, असे सांगितल्याने शिष्टमंडळ हतबल झाले. (वार्ताहर)दरम्यानच्या काळात औरंगाबादचे महसूल आयुक्त संजय जैस्वाल यांनी नांमकात पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या भागातील वीजपुरवठा खंडित न केल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला होता. त्यामुळे पुढील दोन दिवसांत वीज पुरवठा खंडित करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने १७ मे रोजी सांगितले होते; परंतु विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी हरताळ फासल्याचे बाबासाहेब जगताप यांनी सांगितले.

Web Title: Refuse to release water in 'Namka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.