औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात यशस्वी झालो आहोत. यात पुढचा टप्पा म्हणजे लसीकरण होय. लसीकरणाची मोहीम प्रशासन आणि सर्व डॉक्टरांच्या समन्वयाने यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. महानगरपालिकेने कोरोना लसीकरणासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी कार्यशाळा आयोजित केली होती. आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाढे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्ता कदम यांच्यासह फिजिशियन असोसिएशन डॉक्टर, तसेच शहरातील डॉक्टरांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मार्च २०२० पासून सर्व जण कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी लढत आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला थोपविण्यात आपण यशस्वी झालो आहोत. म्हणूनच आज जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के झाले आहे. यात जिल्ह्यातील सर्वच डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तसेच संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. आता लसीकरणाची ही मोहीम परिश्रमाने यशस्वी करावयाची आहे. यासाठी सर्व डॉक्टरांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. कोरोनाविरुद्धच्या या लढाईमध्ये न घाबरता सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
लसीकरणाची दिली माहिती
कार्यशाळेच्या प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी कोरोना लसीकरण म्हणजे काय, लसीचे प्रकार, लस देताना घ्यावयाची काळजी, नोंदणी कशी करावी. ऑनलाइन प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदीसंदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.