उस्मानाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ११९ बैठी पथके निर्माण करण्यात आली आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीही नऊ भरारी पथकेही निर्माण केली आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने चार-पाच वर्षापासून कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत. या अभियानामुळे पहिल्या वर्षी निकालाचा टक्का घसरला. मात्र, त्यानंतर सातत्याने निकाल उंचावत आहे. तसेच परिक्षेदरम्यान, गैरप्रकार करणाऱ्यांची संख्याही कमी होवू लागली आहे. यंदाही दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, यासाठी जवळपास १४ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३७ केंद्रांवर त्यांच्या परिक्षेचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येकी एक या प्रमाणे केंद्रांवर ३७ बैठी पथके तळ ठोकून राहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतच प्र्राथमिक, माध्यमिक, निरंतर विभागचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षण अधिकारी, ‘डायट’चे प्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेट देतील. या परीक्षेदरम्यान कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एका बैठकीमध्ये दिले आहेत. दरम्यान, दहावीच्या परिक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. सदरील परिक्षेसाठी ८२ केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रांवरही ८२ बैठी पथके तैनात असतील. त्याचप्रमाणे नऊ भरारी पथकांचीही नजर असणार आहे. तसेच आवश्यक केंद्रांवर पोलिस कर्मचारीही दिले जाणार आहेत.बैठे पथकात तीन सदस्यपेपरला सुरूवात झाल्यापासून ते संपेपर्यंत सदरील बैठी पथके परीक्षा केंद्रांवर थांबणार आहेत. एका पथकामध्ये पथक प्रमुख, एक सहाय्यक आणि एका महिला अधिकारी वा कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
119 बैठे पथकांची परीक्षेवर नजर
By admin | Updated: February 20, 2015 00:07 IST