वाहनचालकांचा जीव ‘खड्ड्यात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:44 IST2016-07-22T00:03:21+5:302016-07-22T00:44:24+5:30
औरंगाबाद : शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून, जीवघेणे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. त्या रस्त्यांवरून वाहने चालविणे नागरिकांना त्रासदायक ठरते आहे.

वाहनचालकांचा जीव ‘खड्ड्यात’
औरंगाबाद : शहरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून, जीवघेणे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. त्या रस्त्यांवरून वाहने चालविणे नागरिकांना त्रासदायक ठरते आहे. पालिका, बांधकाम विभाग, एमएसआरडीसीकडे सध्या तरी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी, खड्डे बुजविण्यासाठी काहीही योजना दिसत नाही. नागरिकांना याचा त्रास कायम आहे. जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलावर दोन दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार महिला खड्ड्यांमुळे पडली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. एका नागरिकाने त्या महिलेला एमजीएममध्ये उपचारासाठी दाखल केले. अशा अनेक घटना शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे घडत आहेत. याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे.
पंचवटी चौक, सूतगिरणी चौक, रिलायन्स मॉलसमोरील रोड, गजानन महाराज मंदिर ते स्व.पुंडलिक राऊत चौक, पुंडलिकनगर, विशालनगर ते सूतगिरणी, जयभवानीनगर ते सिडको बसस्थानक हे रस्ते उखडले आहेत. रोशनगेट ते चंपाचौक, शहागंज या रस्त्यांची चाळणी झालेली आहे. रंगारगल्ली, दशमेशनगर, उस्मानपुरा, काल्डा कॉर्नर, संत एकनाथ रंगमंदिर, जालना रोडवर खड्डे पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे २१ कि़ मी. चे रस्ते शहरात आहेत. त्याउलट मनपाचे १३०० कि़ मी. चे रस्ते शहरात आहेत. मनपाने बांधकाम विभागाचे रस्ते उखडल्याचा दावा केला आहे; परंतु बांधकाम विभागाकडील जालना रोड सध्या खड्ड्यात गेला आहे. उर्वरित रस्ते सध्या बरे आहेत; परंतु मनपाने बांधलेले रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्याकडे पालिका लक्ष देण्यास तयार नाही.
रोपळेकर चौकातील पेव्हिंग ब्लॉक उखडत आहेत. तसेच अमरप्रीत ते शहानूरवाडी हा रस्ता एमएसआरडीसीने बांधला आहे. त्या रस्त्यावर आता खड्डे पडू लागले आहेत. मोंढानाका उड्डाणपुलाचा पान सेंटर कॉर्नरच्या समोरील रोडवर मोठा खड्डा पडला आहे. तर गजानन महाराज मंदिर रोडवरील रिलायन्स मॉलसमोरील रोडवर गुरुवारी मनपाने मुरूम आणून टाकला. त्यामध्ये मोठे दगड असून तो मुरूम रस्त्यावर न पसरविताच पालिकेचे कर्मचारी निघून गेले. परिणामी त्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू झाली आहे. उड्डाणपुलावर खड्डे...
शहरातील सेव्हन हिल आणि रेल्वेस्टेशन, क्रांतीचौक या उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघात होत आहेत. रेल्वेस्टेशनचा उड्डाणपूल खड्ड्यांमुळे जंपिंग जॅकप्रमाणे झाला आहे. तर सेव्हन हिलचा पूल अपघाताला आमंत्रण देत आहे.
या दोन्ही पुलांवरून जाताना दुचाकीस्वार घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षांपूर्वी सेव्हन हिल उड्डाणपुलावरील खड्डे मास्टिक तंत्राने बुजविण्यात आले होते. शुद्ध डांबराचा लेअर त्या तंत्रात होता. मास्टिक तंत्राद्वारे टाकण्यात आलेली डांबरी चादर रहदारी आणि वाहतुकीमुळे उखडून चालली असून, खड्डे पडण्यात सुरुवात झाली आहे. राज्य रस्ते महामंडळाने सेव्हन हिल पुलावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च केला होता. तर रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरील खड्डे थातुरमातुर बुजविले. याप्रकरणी एमएसआरडीसीचे अभियंता विक्रम जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.