पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:23 PM2019-08-15T15:23:59+5:302019-08-15T15:41:20+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे.

Water reservoir movement will be launched in five years to make the district water efficient - Sudhir Mungantiwar | पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार

Next

चंद्रपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न  दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन विशेष सहाय्य, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा 72 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार  सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर विधानसभाचे आमदार  नानाभाऊ श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकरव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, शाहिदांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल  कलश आपल्या हाती दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला काय अधिकार मिळाले याचा विचार न करता भारत निर्माण करिता कर्तव्याचा विचार करणे आवश्यक आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशात स्वतःचा परिचय भारत देशाच्या नावाने द्यायचा महत्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास येथील जनतेने जिल्हा पुढे जावा याकरिता भरपूर प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या असून  बीपीएल मध्ये नाव नसेल तरीही 2 रुपये 3 रुपये किलो अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त व धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवलेले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात  राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यावेळी घोषित करू इच्छितो की येत्या आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा गॅस युक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल.

जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध सिंचन योजना पूर्णत्वास आल्या असून यामध्ये चीचडोह प्रकल्पामुळे चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार आहे. सोबतच कोटगल, पळसगाव-आमडी, चिंचाळा प्रकल्पही पूर्णत्वास आले आहे. मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याचे काम या जिल्ह्यात सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षात पाणीदार व्हावा याकरिता संकल्प केला असून 4 ऑगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला असून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील निराधार, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता महिलांचे अनुदान 600 रुपयेहुन  1000 रुपये व दोन मुले असल्यास 1200 रुपये पर्यंत वाढवले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे हे शंभरावे जयंती वर्ष असून त्यांच्या नावाने भारतीय डाक विभागाशी  प्रयत्नपूर्वक  संपर्क करून डाक तिकीट सुरू केले आहे. त्यांचं प्रसिद्ध असणारे वाक्य हे आझादी झुठी है देश कि जनता भुकी है उच्चारले होते. त्यांच्या जयंतीचे शंभरावे वर्ष साजरा करताना आपल्या जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये. याकरिता सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सोबतच महात्मा गांधींचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. 1923 मध्ये महात्मा गांधी या जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी होते. त्यावेळी त्यांनी नागविदर्भ चरखा  समिती सोबतच देशात स्वदेशी चळवळ राबविण्याकरिता अनेक उपक्रम सुरू केले. महाराष्ट्र सरकारने सोलर चरख्याकरिता 8 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यूपीएससी एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी पास होऊन आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस व्हावेत याकरिता मिशन सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच जिल्ह्यातील युवकांनी 2024 मधील ऑलिंपिक मध्ये पदक मिळावे याकरिता मिशन शक्ती अभियान सुरू केले आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. जिल्ह्यात मिशन मंथनची सुरुवात करण्यात येणार असून या माध्यमातून आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक इन्कम टॅक्स भरतील. मिशन सक्षम महिला या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांसाठी  विविध योजना राबविण्यात येत आहे. माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला, तर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा दिला. तर आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असा नारा दिला आहे. याला अनुसरून देशात विविध अनुसंधान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रात दोन अनुसंधान केंद्र यवतमाळ व चंद्रपूर येथे स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार करण्यात आला असून 189 कोटी रुपये या अनुसंधान केंद्रासाठी टाटा ट्रस्टने दिले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

चंद्रपूर जिल्हा प्रत्येक जाती-धर्माचा सन्मान करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू झाली असून भविष्यातील आर्मीचीफ व लष्कराच्या वरिष्ठ पदावर असलेला अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत शिकलेला असेल, तेव्हा आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल. जागतिक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी वनअकादमी निर्माण करण्यात आली आहे. बीआरटीसीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल तयार करण्यात येणार येत आहे. बांबू हँडीक्राफ्ट आर्ट युनिटच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प सुरू केलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कारण जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा तेव्हाच देशात जिल्ह्याचा गौरव वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियोजन विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुजीब शेख, अशोक राऊत, ज्ञानू लवटे, अजय राठोड तसेच शंभर टक्केपेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अनुप हंडा, भारवी जिवने, आशिष राठोड, रमेश गुज्जनवार, पौर्णिमा उईके, गजानन भुरसे, भगवान रणदिवे, अरविंद डाहुले, सूर्यकांत ढाकणे, प्रफुल्ल चिडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीमा मामीडवार छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत उथळपेठ, आठवीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववे स्थान संपादन केल्याबाबत वेदांत येरेकर, आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सूर्यकांत बाबर, डॉ. जिनी पटेल, डॉ. उल्हास सरोदे, संवर्ग विकास अधिकारी श्री. बागडी, डॉ. संदीप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, छाया पाटील, केंद्र शासनाचे गृह विभागाकडून उत्तम जीवन रक्षा पदक प्राप्त डॉ. चरणजीतसिंग सलुजा, पोलीस विभागामार्फत शेखर देशमुख, हृदयनारायण यादव, प्रकाश कोकाटे, स्वप्निल धुळे, दीपक गोतमारे, किसन शेळके, विठ्ठल मुत्यमवार, धर्मेंद्र जोशी, ए. एम. सय्यद, महेश कोंडावार, महेंद्र आंभोरे, प्रशांत केदार, विकास मुंडे, नीलेश वाघमारे, संदीप कापडे, संदीप मिश्रा, दिलीप लोखंडे, आकाशकुमार  साखरे, तीर्थराज निंबेकर, सुधीर बंडावार, कुणाल रामटेके यांना विशेष सेवा पदक तर भीमा वाकडे, रमेश पढाल, एस. खैरकर यांना महासंचालक यांचे विशेष सन्मान चिन्ह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यालयीन कामाकरिता विवेक कोहळे तसेच आपत्ती निवारणाकरिता शोध व बचाव पथकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये  सुनील नागतोडे,  शरद बनकर,  गजानन पांडे,  अजय यादव,  राहुल पाटील,  विपिन निंबाळकर,  मयूर चहारे,  मोरेश्वर भरडकर,  निळकंठ चौधरी,  राष्ट्रपाल नाईक,  पुंडलिक ताकसांडे, टी.डी. मेश्राम,  इन्द्रपाल बैस, के.  एम. वलेकर, व्ही. एन. ढुमणे यांचा समावेश आहे.

चांदा- कृषी मोबाईल अॅपचे उद्घाटन

ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर कृषी ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्यावतीने चांदा कृषी मोबाईल ॲप सुरू करण्यात आले. या ॲपच्या मार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना तसेच लाभार्थ्यांची माहिती, कृषी विषयक सल्ला, शेतकऱ्यांनी साकारलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा याबाबतची माहिती या ॲप मार्फत दिली जाणार आहे.

पालकमंत्री यांनी कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना शासकीय नव्हे मानवीय दृष्टिकोनातून काम करावे, असे आवाहन केले. कृषी ॲप हा दीर्घकाळ चालावा व यावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक सेवा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे  यांची उपस्थिती होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली तसेच वृक्षारोपण करून रुग्णवाहिकेचा लोकार्पणसोहळा पार पाडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, महानगरपालिका सदस्य विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Water reservoir movement will be launched in five years to make the district water efficient - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.