कोरोना संसर्गाचा उद्रेक हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 05:00 AM2021-04-10T05:00:00+5:302021-04-10T05:00:41+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० झाली आहे. सध्या चार हजार २२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ५०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ५८ हजार ६६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ तासात ३२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात ७८४ नवे पॉझिटिव्ह आढळले तर नऊ बाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोना संसर्गाची स्थिती आता उद्रेकाच्या मार्गावर जाऊ लागली आहे. संसर्गाचा स्प्रेड असाच कायम राहिला तर स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० झाली आहे. सध्या चार हजार २२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ५०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ५८ हजार ६६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ तासात ३२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील ५२ वर्षीय पुरूष व वरोरा येथील ७८ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला व ५९ वर्षीय महिला, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरूष, दुर्गापूर चंद्रपूर येथील ४९ वर्षीय पुरूष व ६४ वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील ६८ वर्षीय महिला, ब्रह्मपूरी येथील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४२२, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्वांनी जवळच्या केंद्रावरून लस घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
एकाच ठिकाणी आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आठ मृतदेहांवर आज चंद्रपूर महानगर पालिकेच्या पथकाने नियमांचे पालन करून एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार केले.