गोवरीवासीयांनी तिसऱ्यांदा रोखला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 05:00 AM2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:57+5:30
वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : बल्लारपूर वेकोलीअंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी २ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले होते. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.
गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोली अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, विकास पिंपळकर यांच्या नेतृत्त्वातील गावकऱ्यांनी चक्का जाम केले. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चक्का जाम आंदोलनात वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य रस्त्यावर पाणी मारण्याचे लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, काही दिवसांपासून टँकरने पाणी मारणे बंद आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा गावकऱ्यांनी कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन वेकोली अधिकाऱ्यांनी दिले. वेकोलीने या मार्गावर चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही, असा इशारा भास्कर जूनघरी यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिलेला आहे.
या समस्यांनी नागरिक वैतागले
रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, वेकोलीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपे जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गोवरी, पोवनी, साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. रस्त्यावर प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत.