कोरोनाने घेतला 16 वर्षीय तरुणीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:00 AM2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:47+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५१३ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९७ झाली आहे. सध्या २१८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १२ हजार १६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ८६ हजार ७८६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर वरोरा तालुक्यातील एका १६ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५१३ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९७ झाली आहे. सध्या २१८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १२ हजार १६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ८६ हजार ७८६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्यांमध्ये वरोरा तालुक्यातील १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९८ बाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली१८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या ४२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १६, बल्लारपूर दोन, भद्रावती सहा, मूल एक, राजुरा चार व वरोरा येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. दरम्यान प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी धाड टाकणे सुरु केले असून दंड वसुल केला जात आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा -जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना टास्क समितीच्या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता बंडू रामटेके, म.न.पा.चे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर जास्त प्रमाणात आहे, त्या भागात विशेष चमूद्वारे सर्वेक्षण करून कोरोनासदृश्य लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या वाढविल्यास कोरोनाचा फैलाव रोखता येईल व वेळीच रुग्णाची ओळख पटल्याने औषधोपचाराद्वारे कोरोना मृत्यूचा संभाव्य धोकादेखील टाळता येईल. दुसरा सिरो सर्व्हे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
तयारीला लागा
१ मार्चपासून ४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे निर्देश असून याबाबत आरोग्य यंत्रणेने तयारी पूर्ण करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.