कोरोनाने आतापर्यंत रोखला 401 जणांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:00 AM2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:52+5:30
शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने या नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर भिक मागून खाणारे अनेक घटकांतील नागरिकही वंचित राहू शकतात. जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात ४०१ रुग्णांचा श्वास कोरोनाने रोखला आहे. सध्यास्थितीत ७७३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे, सध्यास्थितीत बरे होणाऱ्यांपेक्षा कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पटच्या वर गेले आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाची दहशत कायम आहे. मागील २४ तासामध्ये ९६ रुग्णांची भर पडली असून कोरोनावर मात केल्याने २२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफीकीरी न करता कोरोनाला मनावर घेणे आता अत्यावश्यक आहे.
मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होती. मात्र मध्यंतरी यामध्ये झपाट्याने वाढ झाली. एवढेच नाही तर मत्यूसंख्याही वाढली. दिवाळीनंतर हा आकडा कमी झाला. आता पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
गुरुवारी बाधित आलेल्या ९६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २९, चंद्रपूर तालुका ११, बल्लारपूर एक, भद्रावती चार, ब्रम्हपुरी १८, नागभीड दोन, मूल एक, सावली एक राजूरा पाच, वरोरा २३ व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ४८१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ३०७ झाली आहे. सध्या ७७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २७ हजार ३०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ७७६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
लसीकरणापासून अनेकजण राहणार वंचित
शासनाच्या आदेशानुसार आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करूनच कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. परंतु जिल्ह्यात बहुतांश नागरिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने या नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: रस्त्यावर भिक मागून खाणारे अनेक घटकांतील नागरिकही वंचित राहू शकतात. जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सुविधा कर्मचारी तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील सर्व नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहेत. या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी काही खासगी रुग्णालयांमध्ये आधारकार्ड घेऊन गेल्यानंतर तिथेही ऑनलाईन नोंदणी करून दिली जात आहे. मात्र आधार कार्ड अत्यावश्यक आहे.