ओटीपोटात सतत दुखतंय, गर्भाशयात गाठ तर नाही ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 05:00 AM2022-05-14T05:00:00+5:302022-05-14T05:00:41+5:30
साधारणत: ३० ते ४५ वयोगटातील काही महिलांना ओटीपोटीमध्ये दुखते. प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. काही महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यताही अधिक असते. कंबरदुखी, गर्भधारणेत अडचणी, अनियमित पाळी, गर्भपात हीदेखील गर्भाशयात गाठी असण्याची लक्षणे आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास निदान केले जाऊ शकते. यामध्ये दोन प्रकारचे उपचार करता येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बदलत्या जीवनशैलीमध्ये विविध आजारांचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यांतील एक आजार महिलांमध्ये ओटीपोटात सतत दुखल्याच्या तक्रारींचा आहे. बहुतेक वेळा गर्भाशयात गाठ असली तर त्याची बाह्यलक्षणे फारशी दिसत नाहीत. परिणामी काही महिला दुखणे अंगावर काढतात. मात्र जास्तच विलंब झाला तर गर्भशयातील गाठीचा आकार वाढून शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक महिलांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
साधारणत: ३० ते ४५ वयोगटातील काही महिलांना ओटीपोटीमध्ये दुखते. प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. काही महिलांच्या गर्भाशयात गाठी होण्याची शक्यताही अधिक असते. कंबरदुखी, गर्भधारणेत अडचणी, अनियमित पाळी, गर्भपात हीदेखील गर्भाशयात गाठी असण्याची लक्षणे आहेत. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास निदान केले जाऊ शकते. यामध्ये दोन प्रकारचे उपचार करता येतात. यात कमी स्वरूपाचा आजार असेल तर औषधांनी गाठ नष्ट करता येते आणि शस्त्रक्रिया करून गाठ काढता येते. त्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
साधारणत: लक्षणे काय?
गर्भाशयातील गाठीमुळे अंगावर भरपूर जाणे, ओटीपोटात सतत दुखणे आणि अनियमित पाळी, अशी लक्षणे आढळतात. गाठ मोठी असेल तर मूत्राशयावर दबाव येऊन वारंवार लघुशंकेला जावे लागते. सततची कंबरदुखी, वारंवार गर्भपात, गर्भधारणा होण्यास अडचण येते.
...तर कर्करोगाची शक्यता
गर्भाशयातील गाठींना फायब्राॅइड म्हणतात. वेळीच उपचार घेतले तर ठीक होते. मात्र, दुर्लक्ष करू नये. क्वचितप्रसंगी अशा गाठीचे रूपांतर कर्करोगात होते. गाठीमुळे होणारा त्रास हे गाठीच्या आकारावार व गर्भाशयातील स्थान कोणते यावर अवलंबून असते. अतिरक्तस्राव, पोट, कंबर दुखणे, वारंवार गर्भपात, गर्भधारणा न होणे या अडचणी येतात.
या वयातील महिलांना सर्वाधिक धोका
- ३० ते ४५ या वयोगटातील महिलांना या संदर्भातील सर्वाधिक धोका होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- ओटीपोटीतील त्रास नेमका किती गंभीर आहे, गर्भाशयात गाठ झाली का, हे लवकर लक्षात येत नाही.
- बऱ्याच वेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्यांचे लक्षण दिसत नाही. वैद्यकीय तपासणी केल्यास गर्भाशयात गाठ आहे, हे लक्षात येईल आणि लवकरात लवकर औषधोपचार सुरू करता येते.
वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणतात?
ओटीपोटीमध्ये सतत दुखणे, अनियमित पाळी असे काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आवश्यकता असल्यास सोनाग्राफी करून निदान करता येते. मात्र, कुणीही अंगावर दुखणे काढू नये. तपासणीमध्ये गर्भाशयात गाठ आहे, हे लक्षात आल्यानंतर औषधोपचाराने किंवा शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढता येते. वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. भारती सदानंद मोहितकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर