चंद्रपूरकरांना हवा आमुलाग्र विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:00 AM2021-10-10T05:00:00+5:302021-10-10T05:00:31+5:30
कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. हे शहर आता खूप बदलले. कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे. मंचावर खासदार बाळू धानोकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व आयोजक रामू तिवारी, पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, इको प्रोचे बंडू धोतरे, प्रा. श्याम हेडाऊ व अन्य उपस्थित होते.
अतिक्रमणाकडे वेधले लक्ष
- शुद्ध पाण्याचा शहराचा इतिहास आहे. मात्र, आज पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. युरोपातील नद्या बघण्यासाठी नागरिक जातात. मात्र, अजूनही येथील नद्यांचे शुद्धीकरण झाले नाही. रामाळा तलावाचे संवर्धन व्हावे, अतिक्रमण हटवावे व त्यावर उपाययोजना शोधावी. सोलरला प्राधान्य देत सायकल सीटीसाठी पुढाकार घ्यावा, याकडे प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे यांनी लक्ष वेधले.
सर्व राजकीय पक्षांनी तयार करावा अजेंडा
प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र सुरु करावे, अग्निशमन वाहने जाण्याएवढे रस्ते तयार करावे, आदी सूचना बंडू धोतरे यांनी केल्या. मकसूद शेख यांनी वडगाव व तुकूम प्रभागात स्मशानभूमीची मागणी केली. प्रा. श्याम हेडाऊ यांनी सर्व राजकीय पक्षांनी शहराचा पंचवार्षिक आराखडा तयार करावा, असे आवाहन केले.
यांनी मांडले विकासाचे व्हिजन...
चंद्रपूरच्या विकासासाठी नियोजन कसे असावे, याबाबत भाविक येरगुडे, विजय खनके, शैलेश जुमडे, मनोहर रामटेके, प्रमोद बोरीकर, दामोदर सारडा, वनश्री मेश्राम, राकेश मार्कंडेवार, अजय दुबे, मकसूद खान, सुनीता अग्रवाल, अलका मोटघरे, निमेश मानकर आदींनी व्हिजन मांडले.
काय व्हायला पाहिजे ?
- पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. वाहतूक समस्या दूर करावी, मिनी बससेवा, किल्ल्यांभोवती रिंगरोड, विविध ठिकाणी बाजाराची सुविधा, वृक्षलागवड, भूमिगत वीज वाहिनी व वास्तू संग्रहालयाची आवश्यकता आहे. सर्वांनी एकत्रित आल्यास स्थिती बदलेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.