१ कोटी ३८ लाख रुपये खर्चून होणार शाळांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:31 PM2021-01-23T12:31:01+5:302021-01-23T12:31:22+5:30
Chandrapur News राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेकरिता स्पेशल निधी म्हणून १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला सुपुर्द केले आहेत.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दरम्यान, २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या किमान ७५० शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा तसेच वर्गखोल्यांची स्वच्छता कशी करायची ही चिंता शिक्षकांना सतावत असतानाच राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेकरिता स्पेशल निधी म्हणून १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला सुपुर्द केले आहेत. या माध्यमातून शाळांची स्वच्छता तसेच इतर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी शाळा स्वच्छतेची शिक्षकांची चिंता मिटली आहे.
नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मागील अनेक महिन्यांपासून वर्गखोल्या बंद अवस्थेत असल्यामुळे त्या स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे. शाळांची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिक्षकांनाच हातात झाडू घेण्याची वेळ आली होती. मात्र राज्य शासनाने स्पेशल निधीमधील १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाला पाठविली आहे. या निधीमधून शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, हॅण्ड वाॅश, साबण आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी शिक्षकांची शाळा स्वच्छतेची चिंता दूर झाली आहे.
शासनाने जिल्हा परिषद शाळांना सादील खर्चासाठी निधी पाठविला आहे. यातून शाळांची स्वच्छता तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, हॅण्ड वाॅश, साबण आदींची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
- दीपेंद्र लोखंडे,
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर
पालकांची घ्यावी लागणार संमती
५ ते ८ वीच्या शाळा सुरू होणार असल्या तरी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. यासाठी एक अर्ज भरून घ्यावा लागणार आहे. संमतीपत्राअभावी जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्यासाठी सध्या सुरू असलेले ऑनलाइन शिक्षण पुढेही सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात एकूण विद्यार्थी
१ लाख २५ हजार ५६२