Join us  

दोन हजारांच्या नोटांचा पुरवठा बंद; पाचशेच्या नोटांची छपाई पाचपट वाढवणार, केंद्रीय अर्थ सचिवांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:25 AM

नोटाबंदीच्या घोषणेनंतर प्रथमच चलनात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा पुरवठाच आता बंद करण्यात आला असून, त्यांची छपाईही थांबवली आहे. त्याऐवजी आता कमी मूल्याच्या नोटा चलनात आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या घोषणेनंतर प्रथमच चलनात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा पुरवठाच आता बंद करण्यात आला असून, त्यांची छपाईही थांबवली आहे. त्याऐवजी आता कमी मूल्याच्या नोटा चलनात आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी मंगळवारी स्पष्ट केले.देशात अनेक शहरांमध्ये नोटांची टंचाई जाणवू लागल्यानंतर गर्ग यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेत पर्याप्त चलन उपलब्ध आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून नोटांची चणचण भासू लागली आहे. लोकांनी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केल्याने हे घडले असल्याची शक्यता आहे.आधी सरासरी १९ हजार ते २० हजार कोटी रुपये मूल्याच्या चलनाची मागणी होती. आता ही मागणी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिलच्या १३ दिवसांत मागणी ४५ हजार कोटींवर पोहोचली. पण जेवढी मागणी वाढली आहे तेवढ्याच प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडून पुरवठा होत असल्याचा दावा गर्ग यांनी केला आहे. सध्या निर्माण झालेल्या तुटवड्यातून मार्ग काढण्यासाठी अडचण येणार नाही, कारण सध्या दोन लाख कोटी रुपयांचा स्टॉक बँकांकडे आहे, असेही गर्ग यांनी स्पष्ट केले.काळा पैसा साठवला जातोय का?लोकांना पुन्हा काळा पैसा साठवण्यास सुरुवात केली असल्याची शंका व्यक्त होत आहे. दोन हजार रुपयांच्या स्वरूपात लोक या नोटा साठवून ठेवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याबद्दल गर्ग म्हणाले की, केवळ दोन हजारांच्याच नाही तर इतर मूल्याच्या नोटाही बँकांमध्ये परत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र काळा पैशांच्या साठवणुकीबद्दल आपण काही सांगू शकत नाही.छपार्ई थांबवलीते म्हणाले की, सध्या दोन हजार रुपयांच्या ६.७० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात असून, त्या पुरेशा असल्याने दोन महिन्यांपासून २ हजारांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे.नोटाबंदीची आठवणएटीएममध्ये निर्माण झालेला खडखडाट नोटाबंदीच्या दिवसांची आठवण करुन देतो, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मोठ्याकिमतीच्या नोटाच उपलब्ध नाही. देशात वित्तीय आणीबाणी लागू केली आहे की काय असा सवालही त्यांनी केला आहे.

टॅग्स :बँक